धार्मिक दंगलींत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांचेही एक स्मारक असावे

अयोध्या निकालाच्या निमित्ताने 

openthemagazine.com

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर माझ्या वयाच्या अनेक भारतीयांच्या मनात या घटनेशी संबंधित जुन्या पण बऱ्याचशा कटू आठवणी उफाळून आल्या. अयोध्येतील बाबरी मशीद पाडून तेथे भगवान रामाचे मंदिर बांधण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मंडळींनी केलेल्या हिंसेचा आणि रक्तपाताचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्यामुळे, त्या घटना माझ्या नजरेसमोरून तरळून गेल्या. आजपासून बरोबर 30 वर्षांपूर्वी, म्हणजे नोव्हेंबर 1989 मध्ये भागलपूर आणि आसपासच्या प्रदेशात या हिंसक चकमकी घडल्या होत्या.

लालकृष्ण अडवाणी यांनी सप्टेंबर- ऑक्टोबर 1990 मध्ये काढलेल्या रथयात्रेच्या दरम्यान झालेल्या बहुतांश हिंसक घटनांची नोंद या विवादाचा अभ्यास करणाऱ्या इतिहासकारांनी केली आहे. या रथयात्रामुळे प्रचंड रक्तपात झाला असला तरी हिंसेला सुरुवात या घटनेमुळे झाली नव्हती. त्याचे अपश्रेय जाते ते यात्रेच्या एक वर्ष आधी हाती घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमाकडे.

हा कार्यक्रम म्हणजे विश्व हिंदू परिषदेने सप्टेंबर 1989 मध्ये सुरू केलेले राम शिळांचे (विटांचे) पूजन. अयोध्येतील मशीद पाडण्याची पूर्वतयारी म्हणून विहिपंने देशभरात गाव-खेड्यांतून शिळा (विटा) पूजन महोत्सव आयोजित करण्यात आले. देशभरातील विविध ठिकाणच्या या विटा केंद्रीय गोदामात एकत्रित करण्यात येणार होत्या, पुढे यातूनच अयोध्येत राम मंदिर बांधण्यात येणार होते.

शिळापूजनाचा कार्यक्रमाची कल्पना हुशारीची असली तरी राक्षसी महत्वकांक्षा ठेवणारी होती. शिळापूजनामुळे देशभरातील हिंदू लोक या मंदिर निर्माण प्रकल्पाशी जोडले जातील आणि मंदिराविषयी त्यांच्या मनात आत्मीयता निर्माण होईल ही या कार्यक्रमामागची  कल्पना होती. मात्र देशात असेही अनेक रामभक्त होते जे आपल्या धार्मिक किंवा राजकीय विचारधारेमुळे या कार्यक्रमाचे समर्थक नव्हते. ज्या ठिकाणी अन्य धर्मियांचे प्रार्थनास्थळ आधीपासूनच अस्तित्वात आहे, तिथे कुठल्याही मंदिर निर्माणाच्या ते विरोधात होते.

मात्र या शिळापूजन कार्यक्रमामुळे शहरात अतिशय वेगाने वैचारिक ध्रुवीकरण घडून आले व सामाजिक जीवनही ढवळून निघाले. ऑक्टोबर 1989 मध्ये बिहारमधील भागलपूर येथे भीषण दंगल उसळली. राम शिळा पूजन आणि शिया मुस्लिमांचा मोहर्रम सण एकाच वेळी आले. दोहोंच्या रस्त्यावरून मिरवणुका निघाल्या. त्यात सामील झालेल्या लोकांची सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली, पुढे तलवारी आणि दगडांनी दंगल सुरू झाली. हिंसा वाढली आणि ती खेड्यांतही पोहोचली. या दंगलीत हिंदूंपेक्षा मुस्लिमांची जास्त वाताहत झाली. कारण त्यांच्या बाजूने लोकही कमी होते, शास्त्रास्त्रेही कमी होती आणि सगळ्यांत महत्वाचे म्हणजे स्थानिक पोलिसांवर समाजाचा विशेष प्रभाव नव्हता.

हिंदू मुस्लिम यांच्यातील सर्वांत भीषण संघर्ष म्हणून भागलपूर दंगल कायम स्मरणात राहील. 1947 मध्ये देश विभाजनाच्यावेळी उसळलेल्या दंगलीनंतरची ही सगळ्यात भीषण दंगल होती. या दंगलीत हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. दंगल घडल्यानंतर काहीच दिवसांनी दिल्ली विद्यापीठातील अभ्यासकांच्या एका समूहाने भागलपूर येथे जाऊन सत्यशोधन करण्याचा निर्णय घेतला. त्या समितीत मला सामील होण्यासाठी विचारण्यात आले, आणि मी सामील झालो.

मी भागलपूरला भेट दिली त्याला आता तीस वर्षे झाली आहेत. त्यावेळी तेथे मी जे काही पाहिले त्यांच्या नोंदी ठेवल्या नसल्या तरी काही आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्यापैकी एक आठवण आहे मुस्लिम विणकारांच्या खेड्याची. या खेड्यातील अर्ध्याहून अधिक घरे जाळून टाकण्यात आली होती आणि सगळी हातमाग यंत्रे मोडून टाकण्यात आली होती. तो भयानक हिंसाचार शहारे आणणारा होता आणि त्याचे कर्तेकरविते होते हिंदू, माझे हिंदू बांधव. बिहार पोलिसांवर भरोसा नसल्याने या गावाच्या रक्षणासाठी सेनेला पाचारण करण्यात आले होते. गावातील बहुतेक लोक जिवाच्या भीतीने पळून गेले होते, तर शिल्लक राहिलेले काहीजण  आपापल्या उरल्या सुरलेल्या सामानाची शोधाशोध करत होते.

या दंगलीची दुसरी आठवण आहे भागलपूर गावातील एका श्रीमंत   मुस्लिम रेशीम व्यापाऱ्याच्या घराची. त्या घरात अनेक खोल्या होत्या आणि घराच्या मागे पुढे हिरवळ, लिचीची झाडे आणि भोवती कंपाऊंडही होते. दंगलीनंतर त्या बंगल्यात अनेक डझन पीडित आश्रयाला होते. तर काही लोक बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये तंबू ठोकून आश्रयाला होते. नोव्हेंबर संपून डिसेंबरही आला होता. त्या कडाक्याच्या थंडीत बिचाऱ्या आश्रितांकडे आपल्या धर्मबांधवांनी दिलेले ब्लॅंकेट आणि डोक्यावर तंबूचे कापड यांचाच आधार होता.

त्या श्रीमंत व्यापाऱ्याचे नाव खान होते. प्रशासनाने दंगलग्रस्थांना काडीचीही मदत केली नाही असे त्याने आम्हाला सांगितले. जमियत या धार्मिक संस्थेने आपल्या इमारतीत पीडितांची राहण्याची सोय केली होती, तर येथे ते स्वतः उरलेल्यांची काळजी घेत होते. राज्याने केलेल्या दुर्लक्ष्याबद्दल ते अतिशय दुःखी आणि हतबल असले तरी त्यात राग नव्हता.

दंगलीनंतर लालकृष्ण अडवाणी यांनी भागलपूरला भेट दिली की नाही, हे मला माहीत नाही. जरी भेट दिली नसली तरी त्यांनी या दंगलीविषयी ऐकले, वाचले असणार हे मात्र नक्की. काही का असेना, या घटनेनंतर एक वर्षांनी टोयोटा व्हॅनवर स्वार होऊन त्यांनी सोमनाथ येथून आपल्या रथयात्रेला सुरुवात केली. आणि या यात्रेद्वारे ध्रुवीकरणाला हातभार लावत समाजात विष पसरविण्याचे काम केले. गंतव्याच्या, म्हणजेच अयोध्येच्या अलीकडेच त्यांची रथयात्रा थांबविण्यात आली असली तरी, या यात्रेमुळे जे अराजक पसरायचे होते, ते पसरलेच होते. अडवणींच्या या साहसी उपद्व्यापामुळे हजारो निष्पाप भारतीयांना, विशेषतः मुस्लिमांना आपल्या प्राणास मुकावे लागले होते. कदाचित यामुळेच एका राजकीय विश्लेषकाने अडवणींच्या रथयात्रेला 'रक्तयात्रा' म्हटले होते. त्यानंतर दोनच वर्षांनी बाबरी मशीद उध्वस्त करण्यात आली. परिणामी, आधीपेक्षाही मोठ्या स्वरूपात जातीय हिंसेचा उद्रेक झाला. या हिंसेचे लोण अयोध्येपासून मुंबईपर्यंत पोहोचले आणि सगळीकडे हाहाकार माजला.

बाबरी विध्वंसाच्या काही आठवड्यांनंतर धार्मिक सद्भावासाठी दिल्लीत काढण्यात आलेल्या शांतता मोर्चात मी सहभागी झालो होतो.  समाजशास्त्रज्ञ शिव विश्वनाथनही माझ्यासोबत या यात्रेत चालत होते. या यात्रेचे नेतृत्व मंत्रनाद करत चालणारे दोन बौद्ध भिक्खू करत होते. या यात्रेत कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी किंवा फलक नव्हते. पहिल्या महायुद्धात शाहिद झालेल्या जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या इंडिया गेट स्मारकाजवळ आम्ही पोहोचलो तेव्हा शिव विश्वनाथन मला म्हणाले, ' या क्षणी सर्वाधिक गरज कशाची असेल तर, अनाम नागरिकांच्या स्मारकाची'

पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांची नावे दिल्लीतील इंडिया गेटवर गोंदवण्यात आली आहेत. याच स्वरूपाची स्मारके युरोप आणि उत्तर अमेरिकेतही आहेत. मात्र तरीही पहिल्या  महायुद्धात मृत्युमुखी पडलेल्या अनेक सैनिकांची नावे अज्ञातच राहिल्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 1921 मध्ये वॉशिंग्टन डीसी जवळील अर्लिंग्टन येथे एक स्मारक उभारण्यात आले. 1914-18 या दरम्यान झालेल्या पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या अनाम सैनिकांची याद्वारे स्मृति जतन करण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर भारतीय प्रजासत्ताकातही अनाम नागरिकांच्या स्मारकाची गरज असल्याचे शिव विश्वनाथन सांगत होते. कारण, ज्याप्रमाणे असहाय सैनिक आपल्या राजकीय नेत्यांच्या लोभीपणा आणि षडयंत्रांमुळे उद्भवलेल्या युद्धाचे बळी ठरतात, अगदी त्याचमुळे उद्भवलेल्या धार्मिक दंगलींत अनेक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडतात. 1989 च्या भागलपूर दंगलींपासून ते 2002 च्या गुजरात हत्याकांडापर्यंत, असे हजारो निष्पाप नागरिक मारले गेले आहेत, ज्यांचा अयोध्येतील जमीन विवादाशी काडीचाही संबंध नव्हता.  इतकी प्रचंड जीवितहानी करणारा भारताच्या किंवा जगाच्या इतिहासातही असा कुठलाच जमीन मालकीचा वाद (टायटल सूट)  नसेल.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हजारांहून अधिक पानांचा निकाल इतिहास आणि पुरातत्व यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत असला तरी, या विवादामुळे उदभवलेल्या असंख्य दंगलींकडे कानाडोळाच करतो.माननीय न्यायमूर्तींनी आपल्या निकालात वारंवार 'न्याय, विवेक व समता' यांची अनिवार्यता पटवून दिली असली तरी, हा निकाल न्याय आणि समता या तत्वांवर खरा उतरतो का याचा निर्णय मी या क्षेत्रातील जाणकारांवरच सोडतो. 

याठिकाणी निकालातील तिसऱ्या तत्वाकडे, म्हणजेच विवेकाकडे आपले लक्ष वेधु इच्छितो. भारतीय प्रजासत्ताकाचा सद्सद्विवेक आपल्याला  बाबरी मशिदीशी काहीही संबंध नसणाऱ्या आणि तरीही त्यामुळे मारल्या गेलेल्या हजारो स्त्री, पुरुष आणि स्त्रियांच्या स्मृती जगविण्यासाठी आणि त्यांचा आदर करण्यासाठी बाध्य करतो. मात्र आता आपण या निष्पापांसाठी काय करू शकतो? शिव विश्वनाथन यांनी पाव शतकाआधी सुचवलेल्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देऊन आपण त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त करू शकतो.

असो. तर अयोध्येत हिंदूंना भव्य मंदिर उभारू द्या, मुस्लिमांना अयोध्येत किंवा त्याबाहेर भव्य मशीद उभारू द्या. मात्र या धार्मिक इमारतींपेक्षाही न्याय आणि मानवतेसाठी आज अधिक गरज आहे ती अनाम नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक स्मारक उभारण्याची. सर्वोच्च न्यायालयाने मन मोठे करत असे स्मारक उभारण्याचाही आदेश दयायला हवा होता असे मला वाटते.

- रामचंद्र गुहा, बेंगळूरू
(अनुवाद: समीर शेख)

 

Tags: Translation Babri Masjid Ram Mandir Ayodhya Rath Yatra बाबरी मशीद राम मंदिर रामचंद्र गुहा रथयात्रा अनुवाद Load More Tags

Comments:

लतिका जाधव

हिंसामुक्त जग हा विचार व आचार अंमलात आला पाहिजे.

उगावकर

या अनाम निष्पांप लोकासाठी पुण्यामुबंई कडील लोकांनी पुढाकार घेऊन मंबईत स्मारक का करू नये?

Ravi Jagtap

मानवतेसाठी, द्वेषभावना नाहीशी करण्यासाठी हे स्मारक उभारलेच पाहिजे

Haridas Tammewar

भारतामध्ये कुठेतरी स्मारक व्हायलाच हवे,जे स्मारक भूतकाळातील चुकीच्या घटनांची जाणिव करुन देईल आणि नव्या विचाराकडे अंगुलीनिर्देश करेल.

Rahul Ramesh Gudadhe

आगदी रास्त अशीच ही अपेक्षा आहे की स्मारक व्हावे. पण आपल्या देशात असे नाही की अन्याय हा फक्त मुस्लिमांवर च झालंय देशाचे तुकडे होत अस्तनी कित्येक हिंदू पण मारले गेले कापले गेले. तसेच असेही नाही की राममंदिर जागेवरून झालेल्या जीवित हानीचा मला खेद नाही .

Add Comment