व्यक्तिनिष्ठ पंथांचा संक्षिप्त इतिहास

असे भरभराटीस आलेले पंथ त्या देशासाठी कायमच घातक ठरत आलेले आहेत

‘व्यक्तिनिष्ठ पंथ’ (cult of personality) ही संज्ञा सर्वप्रथम वापरण्यात आली सोव्हिएत हुकुमशहा जोसेफ स्टॅलिन याच्या संदर्भात. दोन दशकांहून अधिक काळ सत्ता उपभोगल्यानंतर 1953 मध्ये स्टॅलिनचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन वर्षांनी, सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या 20 व्या अधिवेशनात बोलताना ‘स्टॅलिनच्या भोवती रचण्यात आलेल्या व्यक्तिनिष्ठ पंथामुळे पक्षाचे आणि देशाचे कशा पद्धतीने नुकसान झाले’ याचा उहापोह स्टॅलिनचे उत्तराधिकारी निकिता क्रुश्चेव्ह यांनी केला होता. क्रुश्चेव्ह यांनी तेव्हा केलेली टिप्पणी अशी होती, ‘एखाद्या व्यक्तीला प्रचंड उंचीवर नेऊन, त्याचे देवाप्रमाणे अतिमानवी शक्ती लाभलेल्या सुपरमॅनमध्ये रुपांतर करणे, मार्क्सवाद किंवा लेनिनवाद यांच्या संकल्पनेत अस्वीकारहार्य आणि अकल्पनीय आहे. अशी व्यक्ती सर्वज्ञानी आहे, सर्वसाक्षी आहे, सर्वांचा विचार करणारी आहे, सर्वकाही करू शकणारी आहे आणि ती कधीही चुकत नाही, असे समजले जाते.’   

व्यक्तिनिष्ठ पंथ ही संज्ञा 1956 मध्ये शब्दकोशात दाखल झाली असली तरी स्टॅलिनच्या पूर्वीदेखील व्यक्तिनिष्ठ पंथ अस्तित्वात होतेच. त्यामध्ये इटलीचा मुसोलिनी व जर्मनीचा हिटलर यांचा समावेश होतो. या नेत्यांनीही प्रचारकी तंत्र (propaganda) आणि देशाची संसाधने वापरून पक्षातील इतर सहकारी आणि सामान्य जनता यांपेक्षा स्वतःची प्रतिमा उत्तुंग केली, आणि देवत्वाचा दर्जा मिळवला. मुसोलिनी व हिटलर यांनी देखील अनिर्बंध सत्तेचा उपभोग घेतला आणि त्यांच्या मर्जीसमोर इतरांनी संपूर्ण शरणागती पत्करावी अशी मागणी केली (आणि ती पूर्णदेखील करून घेतली). 

स्टॅलिनच्या आधीचे व्यक्तिनिष्ठ पंथ हे बहुतकरून उजव्या विचारसरणीच्या हुकुमशाहांचे होते. स्टॅलिननंतर अस्तित्वात आलेले पंथ (सर्वच नव्हे) मात्र बहुतकरून डाव्या विचारसरणीच्या हुकुमशहांचेचे होते. त्यामध्ये क्युबा मधील फिडेल कॅस्ट्रोचा पंथ, व्हिएतनाम मधील हो ची मिन्हचा पंथ, व्हेनुझूएला मधील हुगो चावेझचा पंथ, आणि या सर्वांवर कडी करणारा चीनमधील माओ झेडॉंगचा पंथ, यांचा समावेश होतो. इतर पंथाच्या तुलनेत माओचा पंथाचा, त्याच्या देशाच्या आकारामुळे प्रचंड पगडा होता. कोट्यवधी चिनी नागरिकांना माओ समोर अपार आदराने मान तुकवावी लागत होती आणि त्याच्या तोंडून येणाऱ्या प्रत्येक शब्दाला ते दैववाणीच समजत होते. (चीनी सेनेचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या) पेकिंगमधील ‘लिबरेशन आर्मी डेली’च्या 13 ऑगस्ट 1967 रोजीच्या अंकात करण्यात आलेल्या दाव्याप्रमाणे:

'चेअरमन माओ हे अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले जगातील सर्वांत विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी मांडलेला विचार हा चीन आणि उर्वरित जगातील कामगारा वर्गाच्या संघर्षाचा सार आहे आणि तेच अटळ सत्य आहे. चेअरमन माओ यांचे निर्देश अमलात आणताना ते समजले आहेत अथवा नाहीत याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केले पाहिजे. क्रांती संघर्षांच्या अनुभवांतून आपल्याला हे पुरते लक्षात आलेच आहे की, चेअरमन माओ यांचे अनेक निर्देश सुरवातीला पूर्णपणे वा काही प्रमाणात समजत नाहीत, मात्र त्यांवर अंमलबजावणी करताना, अंमलबजावणी करून झाल्यानंतर किंवा कधीकधी त्यानंतर अनेक वर्षांनी हळूहळू आपल्याला ते समजत जातात. म्हणूनच आपल्याला समजलेले तसेच तात्पुरते न समजलेले चेअरमन माओ यांचे निर्देश आपण अत्यंत दृढपणे अंमलात आणले पाहिजेत.' 

स्टॅलिनच्या व्यक्तिनिष्ठ पंथामुळे रशियाच्या झालेल्या नुकासानीविषयी क्रुश्चेव्ह बोलले त्याच्या सात वर्षे आधी बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांच्या व्यक्तीपूजक मानसिकतेविषयी इशारा दिला होता. आपले संविधान अंमलात येत असताना आंबेडकरांनी काढलेले हे उद्गार आठवा: ‘धर्मामध्ये भक्ती हा मोक्षाचा मार्ग ठरू शकतो. मात्र राजकारणामध्ये भक्ती किंवा व्यक्तिपूजा हमखास अधोगतीच्या मार्गावर नेते आणि शेवटी हुकुमशाहीपर्यंत घेऊन जाते.’

1970 चे दशक येईपर्यंत आंबेडकरांनी दिलेला हा इशारा भारतीय विसरून गेले. एव्हाना त्यांनी आपल्या निष्ठा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पायाशी ठेवल्या होत्या आणि देशातील संस्था नष्ट करण्याएवढी ताकद त्यांनी इंदिराजींना विश्वासाने प्रदान केलेली होती. त्यावेळी आपल्या नेत्याचे  लांगूलचालन करताना कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वतःविषयीच नव्हे लाखो भारतीयांच्या विषयी बोलताना म्हणाले होते, ‘इंदिरा म्हणजे इंडिया आणि इंडिया म्हणजे इंदिरा'. आंबेडकरांनी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे राजकारणातील भक्तीचा हा प्रचार स्वाभाविकपणे अधोगतीकडे आणि शेवटी हुकुमशाहीपर्यंत घेऊन गेला. 

हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन आणि माओ यांनी त्यांच्या मृत्युपर्यंत निर्विवाद सत्ता उपभोगली. परंतु भारतीय हुकुमशहा इंदिरा गांधीनी मात्र दोन वर्षे राष्ट्रीय पातळीवर एकहाती सत्ता उपभोगल्यानंतर, स्वतःच लादलेली आणीबाणी संपवली आणि नव्याने निवडणुकांची घोषणा केली, ज्यामध्ये त्या आणि त्यांचा पक्ष पराभूत झाले. येणाऱ्या दशकांत त्यांनी पोखरून ठेवलेल्या संस्थांनी आपले स्वातंत्र्य हळूहळू परत मिळवायला सुरवात केली. म्हणजे, पत्रकारिता पूर्वीपेक्षा अधिक स्वतंत्र झाली, न्यायसंस्था अधिक स्वायत्त झाली, तर नागरी समाजाची वाढ आणि भरभराट झाली. 

आणीबाणी नंतर साधारणत: 20 वर्षांनी मी ‘इंडिया आफ्टर गांधी’ या माझ्या पुस्तकावर काम करायला सुरवात केली. 2007 मध्ये ते पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा मला वाटले की भारताला ‘50-50 लोकशाही’ म्हणणे अधिक योग्य ठरेल. त्यानंतर सात वर्षांनी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि आपल्या लोकशाहीची विश्वासार्हता पुन्हा नाहीशी होऊ लागली. त्यांच्या शासनाने पत्रकारितेची मुस्कटदाबी करून आणि त्यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले. सोबतच न्यायसंस्थेची ताकद कमी करण्याचे आणि स्वतंत्र नागरी समाज संस्थांचा छळ करत त्यांना धमकावण्यास सुरवात केली. पूर्वीपासून अभिमानाने स्वायत्त राहिलेल्या आणि ज्यांना इंदिरा गांधीही आपल्या इच्छेप्रमाणे वाकवू शकल्या नाहीत अशा सैन्यदल, निवडणूक आयोग, आणि भारतीय रिजर्व्ह बँक यांसारख्या सार्वजनिक संस्था आता सत्ताधारी पक्षाच्या आणि पंतप्रधानांच्या हातातील साधन बनताना दिसू लागल्या. 

संस्थांच्या वाढत्या अधोगतीला साथ मिळाली ती वाढत्या व्यक्तिनिष्ठ पंथाची. मे 2014 पासून, प्रत्येक कार्यक्रम-उपक्रम, प्रत्येक जाहिरात आणि पोस्टर यांमध्ये पंतप्रधानांना उत्सवमूर्ती बनवण्यामध्ये सरकारची संसाधने मोठ्या प्रमाणात खर्ची पडू लागली. तेव्हापासून भारतीय जनता पक्षातील प्रत्येकाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे ‘मोदी म्हणजे इंडिया आणि इंडिया म्हणजे मोदी’ हाच मंत्र राहिलेला आहे, मग ती व्यक्ती मंत्री असो, आमदार असो किंवा पक्षाचा एखादा कार्यकर्ता असो. इंदिरा गांधींच्या वेळी झाले, तसे यावेळीही तथाकथित राष्ट्रीय माध्यमांनी या दैवतीकरणामध्ये अतिउत्साहाने हातभार लावला. पंतप्रधानांची ‘सर्वज्ञानी आणि कधीही चूक न करणारा’ अशी प्रतिमानिर्मिती करण्यासाठी काही भारतीय माध्यमांवर दबाव टाकला गेला तर काहींचे ‘मतपरिवर्तन’ करण्यात आले.  

COVID-19 भारतात येऊन धडकले तेव्हा या संकटाचा उपयोग (पंतप्रधानांचा) व्यक्तिनिष्ठ पंथ आणखी वाढवण्याची संधी म्हणून केला गेला. त्यांची सुनियोजित भाषणे हे त्याचेच एक उदाहरण  आहे. ‘इंडियन प्रीमिअर लीग च्या अंतिम लढतीपेक्षा पंतप्रधानांचे भाषण ऐकायला अधिक लोकांनी टीव्ही लावला’ असे तांत्रिकदृष्ट्या स्वतंत्र असलेली सार्वजनिक प्रसारक संस्था, प्रसार भारतीद्वारे बढाई मारत उद्धटपणे सांगितले जात होते. 

दुसरे आणि बहुदा अधिक घातक उदाहरण म्हणजे पीएम-केअर्स नावाने सुरु केलेला नवीन निधी.1948 पासून पंतप्रधान सहाय्यता निधी अस्तित्वात आहे. युद्ध, पूर, भूकंप, वादळे, आणि महामारी यांसारख्या संकटांमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी नागरिकांकडून निधी गोळा करण्याची त्यात सोय आहे. कोरोना महामारीने भारतात प्रवेश केला तेव्हा या निधीमध्ये साधारण 8 हजार कोटी रुपये इतकी रक्कम शिल्लक होती. याच धर्तीवर प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीदेखील आहे.   

यापूर्वीचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आजवर याच सहाय्यता निधीचा उपयोगी करत आले आहेत. मात्र तरीही नरेंद्र मोदींनी एक नवा आणि व्यक्तिगत स्वरूपाचा निधी तयार करायचे ठरवले. आणि त्याचे नावही अत्यंत शिताफीने Prime Minister Citizens Assistance and Relief in Emergency Situations (आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांसाठी मदत) असे रचले जेणेकरून याची अद्याक्षरे जोडली असता PM-CARES (पीएम- केअर्स) तयार होते. 

पीएम केअर्सच्या वेबसाईटवर मोदींचा फोटो प्रामुख्याने ठसवण्यात आला. या निधीच्या प्रसिद्धी व जाहिराती यांच्याबाबतही हेच झाले. आता या निधीद्वारे केल्या जाणाऱ्या वैद्यकीय व इतर मदतींच्या वेष्टनांवरही मोदींचे फोटो असण्याची दाट शक्यता आहे. अशा पद्धतीने एक राष्ट्रीय संकट ‘ब्रँड मोदी’ला प्रभावी करण्याचे आणखी एक माध्यम बनले.

‘पक्ष, नागरिक आणि देश यांसाठी जन्माला आलेला अवतार’ अशी नेत्याची प्रतिमा निर्माण करण्याची वैशिष्ठ्ये पाहता नरेंद्र मोदींचा पंथ (Cult) स्टॅलिनशी साधर्म्य राखणारा आहे. आपल्या नेत्याची अचूकता आणि हुशारी यांचा प्रचार करण्यासाठी सरकारी माध्यमांचा विशेषकरून वापर करण्यामध्ये नरेंद्र मोदींचा व्यक्तिनिष्ठ पंथ हिटलर आणि मुसोलिनी यांच्या पंथाचा कित्ता गिरवतो. मात्र पूर्वसुरींचा विचार करता मोदींचा पंथ माओ झेडॉंगच्या पंथाशी सर्वाधिक साधर्म्य राखणारा आहे. मोदींनी चालवलेल्या अर्थव्यवस्थेच्या हेतुपुरस्सर नाशाचा विचार करता, नोटबंदीचा निर्णय हा माओच्या ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’शी मेळ खाणारा होता, ज्यामध्ये लोकांना घराच्या मागच्या अंगणात भट्टी तयार करून त्यात घरातील सर्व लोखंडाच्या वस्तू वितळवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. माओप्रमाणेच मोदीदेखील त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना बाजूला सारत त्यांच्या सर्वांत समर्पित अनुयायांशी, म्हणजे बेरोजगार तरुणांशी थेट संवाद साधत आलेले आहेत. माओप्रमाणेच मोदींसुद्धा सरकार आणि पक्ष यांची प्रचारयंत्रणा वापरून स्वतःला सर्वज्ञ आणि अचूक व्यक्ती म्हणून प्रस्तुत करतात. माओप्रमाणेच मोदींचे निर्देशही नागरिक निमूटपणे पाळतात, भले ते त्यांना समजले नसले तरी. 

व्यक्तीला देवत्व प्रदान करणे हे मार्क्सवाद-लेनिनवाद यांच्या तत्त्वात बसणारे नाही, हे क्रुश्चेव्ह यांचे म्हणणे योग्य होते की नाही याविषयी वेगवेगळे मतप्रवाह असले तरी, अशी व्यक्तिपूजा भारतीय जनता पक्षाच्या इतिहासाच्या विरोधात जाणारी आहे हे नक्की. व्यक्तिपूजेला भाजपने नेहमीच विरोध केलेला आहे. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नंतर सोनिया गांधी यांच्या लहरी आणि इच्छा यांच्यापुढे कॉंग्रेसने कायमच पक्षाला आणि देशालाही दुय्यम स्थान दिले, असे आरोप भाजप कायमच करत आला आहे. पंतप्रधानपदी असताना अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांवर कधीही वर्चस्व गाजवले नाही. पक्षाच्या दृष्टीने ते तीन मुख्य नेत्यांच्या त्रिमूर्तीमधील एक होते ज्याचे उर्वरित दोन चेहरे होते लाल कृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी. हे तीनही मोठे नेते एकाचवेळी केंद्रात कार्यरत होते. दुसरीकडे, भाजपकडे ताकदवान आणि स्वतंत्र विचारांचे मुख्यमंत्रीदेखील होते. त्यांना या त्रिमूर्तीकडून कायमच आदराची वागणूक मिळत असे. आता हे चित्र पूर्णपणे बदललेले आहे. एकेकाळी स्टॅलिनचे त्याच्या सिपिएसयु आणि पोलिटब्युरोमध्ये जे स्थान होते, तेच स्थान भाजप आणि सरकार यांमध्ये मोदींना आहे.

मोदींना सुपरमॅन करणारा आत्ताचा पंथ किंवा इंदिरा गांधीना सुपरवूमन बनवणारा तेव्हाचा पंथ या दोहोंचे उदाहरण पाहता, ‘हिंदू धर्मातील भक्ती आणि आंधळी व्यक्तिपूजा भारतीय लोकशाहीसाठी घातक ठरू शकते’ ही आंबेडकरांनी व्यक्त केलेली चिंता किती रास्त होती हे लक्षात येते. 

'मसीहा आणि बदला घेणारा देवदूत' अशी मोदींची प्रतिमा उभी करण्यासाठी सत्ताधारी पक्षाने टाकलेले बीज इथे अगदीच सुपीक जमनीवर पडलेले आहे. वस्तुतः एखाद्या स्वतंत्र देशातील नागरिकांनी एका जिवंत व्यक्तीला अशाप्रकारे पूजने अपेक्षित नाही, पण दुर्दैवाने तसे घडते आहे. 

व्यक्तिनिष्ठ पंथाचा इतिहास आपल्याला सांगतो की असे भरभराटीस आलेले पंथ त्या देशासाठी कायमच घातक ठरत आलेले आहेत. एक दिवस नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान नसतील, मात्र त्यांच्या पंथाने देशाची अर्थव्यवस्था, संस्था, सामाजिक जीवन आणि नैतिक रचना इत्यादींची जी दुरवस्था केलेली आहे ती कधी भरून येईल की नाही हे देवच जाणे.
    
(अनुवाद- मृदगंधा दीक्षित)

- रामचंद्र गुहा, बेंगळूरू

(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)

Tags: रामचंद्र गुहा मृदगंधा दीक्षित व्यक्तिनिष्ठ पंथ जोसेफ स्टॅलिन स्टॅलिन सोव्हिएत युनियन निकिता क्रुश्चेव्ह मुसोलिनी हिटलर माओ झेडॉंग इंदिरा गांधी नरेंद्र मोदी पीएम केअर्स बाबासाहेब आंबेडकर Ramchandra Guha cult of personality Josef Stalin Stalin Soviet Union Nikita Khrushchev Leninism - Marxism Mussolini Hitler Mao Zedong B. R. Ambedkar Indira Gandhi Narendra Modi PM-CARES Load More Tags

Comments:

संजय लडगे

आंबेडकर यांचा इशारा गांधी व नेहरू यांच्या प्रतिमा देशापेक्षा मोठ्या करण्यात आल्या होत्या ,त्याविरूध्द होता. वरील लेखात नेहरूचां उल्लेख का केला गेला नाही.

संजय लडगे

आंबेडकर यांचा इशारा गांधी व नेहरू यांच्या प्रतिमा देशापेक्षा मोठ्या करण्यात आल्या होत्या ,त्याविरूध्द होता. वरील लेखात नेहरूचां उल्लेख का केला गेला नाही.

Vishnu Salunkhe

Very thought provoking and enlightening observation that may guide the nation quite timely and properly.

SHIVAJI V PITALEWAD

वाचताना खूप वाईट वाटत.पण साधारण माणूस म्हणून शक्य आहे ते करण्याची इच्छा बळावत आहे.

Add Comment