कोरोनाची दुसरी लाट आणि न संपणाऱ्या प्रश्नांची मालिका 

प्रयत्नपूर्वक आणि निर्धारानं या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं मिळवायला हवीत

फोटो सौजन्य: newindianexpress.com

अलीकडच्या दोनतीन वर्षांत भारतातील बहुसंख्य जनतेला वारंवार मोठ्या संकटांना आणि त्यामुळे होणाऱ्या हालअपेष्टांना तोंड द्यावं लागतंय. आधी नोटबंदीमुळं नोटा बदलून घेण्यासाठी लागलेल्या मोठ्या रांगांत, भर उन्हात तिष्ठत उभे राहावं लागल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. ज्यांना हे शक्य झालं नाही, त्यांचं तर सर्वस्व गेल्यागत झालं. 

पुष्कळ लोकांना आपले उद्योगधंदे बंद करावे लागले. परिणामी असंख्यांचे रोजगार बुडाले. दोन वेळचे तर सोडा पण निदान दोन घास कसे मिळवायचे ही चिंता त्यांना पडली पण प्रत्यक्षात त्यांना मिळालं काय... तर केवळ पोकळ वल्गना आणि कोरड्या घोषणा करण्याचा बडेजाव. या निर्णयानं काळा पैसा नाहीसा झाला, दहशतवाद्यांच्या कारवाया बंद झाल्या. नक्षलवाद्यांना आता पैसा मिळणार नाही. अर्थात त्यांच्या कारवाया बंद पडल्यातच जमा आहेत इत्यादी वल्गना. या सगळ्यातला फोलपण लवकरच साऱ्यांच्या ध्यानात आला. 

नंतर आली साऱ्या जगताला हादरवून टाकणारी कोविड-19ची भयानक वेगानं पसरलेली साथ. तेव्हाही आगाऊ सूचना मिळूनही आपल्या महान नेत्यानं काही केलं नाही. मित्रराष्ट्राच्या आपल्याच (हेकेखोर) स्वभावाच्या अध्यक्षाचं भव्य, जगाला दिपवून टाकणारं स्वागत करायचं होतं त्यांना. नंतर मध्य प्रदेशात गलिच्छ कारवाया करून आपल्या पक्षाचं सरकार आणायचं होतं शिवाय एका जमातीच्या छोट्या मेळाव्यावर साऱ्याचं खापर फोडायचं होतं. यातून वेळ कसा मिळणार? त्यानंतर एकदाची जाग आल्यावर केलं काय तर टाळाबंदी! परिणामी अनेकांच्या हालअपेष्टांत भरच पडली. कालची परिस्थिती जास्त वाईट की सध्याची असा विचार त्यांच्या मनात येत असणार. 

अनेकांना रोजीरोटीचा भरवसा राहिला नाही म्हणून गावाकडे जाण्याची ओढ लागली आणि प्रवासाची सारी साधनं बंद असल्यानं त्यांना पायीच शेकडो मैलांचा प्रवास करायला लागला. त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले कारण मनाची उभारी असली तरी पोटाला अन्नच नसल्यानं शरीराची साथ नव्हती. त्यात भर म्हणून अनेकांचे अपघाती मृत्यू झाले आणि गावी पोहोचल्यावर तर झक मारली आणि एवढा खटाटोप केला असंच वाटण्याची वेळ त्यांच्यावर आली... कारण त्यांना गावात प्रवेश बंद. वाळीत टाकलेल्यांपेक्षाही त्यांचे हाल होत होते आणि त्यामुळं त्यांची मनंही खचून, भंगून गेली होती. ज्याच्या पोकळ आश्वासनांवर आपण विश्वास टाकला आणि त्यांना सत्ता दिली त्यानंच आपल्यावर ही वेळ आणली हे त्यांना कसं कळलं नाही... त्यांचं त्यांनाच ठाऊक.

अलीकडच्या काळात एक गोष्ट तुमच्या ध्यानात आली आहे का? अनेक लोक आता पूर्वीप्रमाणे दिसत, वागत, बोलत नाहीत. अचानक ते खूपच बदलून गेल्यासारखे वाटतात. नाही, बदलूनच गेले आहेत. अगदी मोजके अपवाद सोडले तर बाकीचे सारे जण सतत कोणत्या-ना-कोणत्या काळजीत असतात, कशानं तरी घाबरलेले वाटतात, कोणत्या तरी अनामिक भीतीचं सावट त्यांच्यावर पडल्यासारखे. आता ते सावट म्हणजे अर्थातच गेल्या वर्षीपासून जगावर आलेला कोविड-19चं. त्याचाच धसका या साऱ्यांनी घेतलाय. 

नोटबंदीच्या जखमा अजूनही ताज्याच असताना... आणि सव्वा वर्ष होऊन गेलं पण कोविड-19 तर अजूनही जायला तयार नाही. काही देशांमध्ये त्याचा प्रभाव कमी कमी होत आहे ही तशी समाधानकारक आणि उत्साहवर्धक बाब वाटायला हवी पण तरीही ती तशी वाटत नाही... कारण लंकेत सोन्याच्या विटा तसं काहीसं म्हणजे आपल्याकडे गेल्या दीडेक महिन्यांपासून या महामारीची दुसरी लाट आली आहे आणि तिचा जोर पूर्वीपेक्षाही जास्त आहे. 

खरंतर गेल्या वर्षअखेरपासून आपल्याकडं पहिल्या लाटेचा जोर कमी होत होता. तरीही कोविड-19 पुरता  ओसरला नव्हता पण जानेवारीत लस आली आणि राज्यकर्त्यांवरील अंधविश्वासाने सर्वसामान्य माणसांनाही वाटलं की, वाह! सुटलोच की आता आपण या तडाख्यातून. या साथीच्या सुरुवातीपासूनच कमी प्रमाणात पाळले जाणारे नियम आणि बंधनं यांना ते (राज्यकर्त्यांप्रमाणेच) जुमानेनासे झाले. जणू काही लस आली म्हणजे आता कसलीच काळजी नाही. सामान्य माणसांचं सोडा पण राज्यकर्त्यांचीही खरोखरच तशी ठाम समजूत झाली असावी... कारण ते त्यासाठी आपलीच पाठ थोपटून घेण्यात मग्न म्हणूनच जाणकार तज्ज्ञ दुसऱ्या लाटेचा इशारा देत असूनही त्याकडं सोयीस्करपणानं दुर्लक्ष करून राज्यकर्त्या पक्षातर्फे त्यांच्या नेत्याच्या ‘विजयी वीराच्या’ अभिनंदनाचा ठरावही केला गेला. जणू काही आपण ही लढाई जिंकली! असाच साऱ्या भक्तगणांचा जल्लोश होता.  नेत्यानंच तसं म्हटलं होतं ना!

...आणि नेत्यांना तर आता पाच राज्यांतील निवडणुकांचे वेध लागलेले त्यामुळं तज्ज्ञांच्या इशाऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ तरी कुणाला होता? कधी एकदा सारा भारत पादाक्रांत करतो या आवेशात ते होते म्हणून मोठमोठ्या सभा, प्रचंड रोड-शो आणि विविध कारणांनी निघणाऱ्या मोठ्या मिरवणुका यांत त्यांचा उत्साह दांडगा होता आणि हे सारं होत होतं आवश्यक ते आरोग्यविषयक सारे नियम पायदळी तुडवून. 

अशा वेळी प्रतिस्पर्धी काय करणार? त्यांच्यापैकी कुणी काही चांगलं सांगितलं तर त्याची टवाळी करायची हे भक्तगणांच्या नेत्याला खूश करण्यासाठी घेतलेलं व्रतच होतं. खरं म्हणजे ते माहीत असूनही जनतेचे हाल कमी व्हावेत म्हणून खरोखरच अमलात आणल्या असत्या तर ज्या उपयुक्त ठरल्या असत्या अशा सूचना विरोधी नेते आणि जाणकार-तज्ज्ञ करत होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी केलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि त्यांचं योग्य प्रकारे पालन झालं असतं तर देशाला काही प्रमाणात तरी या संकटातून बाहेर पडायला मदत झाली असती... पण या उपयुक्त सूचनांचीही भक्तगणांकडून, टर उडवली गेली आणि विरोधकांची टर उडवण्याच्या भरात ते एवढे वाहवत गेले होते की, बऱ्याच मौलिक सूचना करणारे तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि संशोधक तर त्यांच्या जणू खिजगणतीतही नव्हते. आमचा नेता सर्वज्ञ आहे; त्याला सांगणारे, शिकवणारे हे कोण असाच त्या साऱ्या भक्तगणांचा आणि अनुयायांचा आविर्भाव होता. 

तसं पाहता यंदाच्या मार्च महिन्याला सुरुवात झाल्यापासूनच कोविड-19 बाधितांमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली होती पण तिच्याकडं साफ दुर्लक्ष करून स्वतःचा बडेजाव मिरवण्याकडं, विश्वनेतेपदाकडं आपली वाटचाल सुरू आहे हे लोकांना पटवून देण्याकडंच शासनाचा कल होता. वाढत्या रुग्णसंख्येकडे दुर्लक्ष केलं जात होतं. त्यांच्यासाठी लोकांचे जीव नाही तर काही राज्यांतल्या निवडणुका महत्त्वाच्या होत्या. इतकंच नाही तर भावी काळासाठी (पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीच्या वेळी) आपले मतदार दुखावले जाऊ नयेत म्हणून उत्तराखंडमधल्या लाखोंच्या कुंभमेळ्यालाही परवानगी देण्यात आली. (त्यांच्या ज्या मुख्यमंत्र्यानं परवानगी देणार नाही असं जाहीरपणे सांगितलं होतं त्याची हकालपट्टी करण्यात आली.) 

या राज्याचे नवे मुख्यमंत्री तर वावदूक बोलण्यासाठी प्रसिद्ध. त्यांच्या अगाध ज्ञानाचे नुमने वारंवार प्रसिद्ध झाले आहेतच. तर त्यांनी ‘गंगामैयाच्या आशीर्वादानं कुणालाही या रोगाची बाधा होणार नाही.’ असं जाहीर करून, आमच्या राज्यात करोना नाहीच असं म्हटलं होतं पण एकीकडे निवडणुकांचे टप्पे पार पडत होते तर दुसरीकडे साऱ्या देशात या साथीचं चित्र अधिक भयकारी होत होतं. आता तर दिवसाला बाधित होणाऱ्यांची संख्या तीन लाखांपार गेली आहे (कुणी सांगावं, कदाचित हाही जागतिक विक्रम आहे म्हणूनही पाठ थोपटून घेतली जाईल!) आणि याहूनही गंभीर बाब म्हणजे काहींच्या मते ही केवळ चाचणी झालेल्यांची संख्या आहे. प्रत्यक्षात ती खूपच जास्त असण्याची शक्यता आहे.

आता मात्र कशी कोण जाणे मोठ्या नेत्यांच्या डोळ्यांवरची झापड आता बाजूला गेल्यासारखं वाटतंय. त्यांचा सूरही बदलला आहे पण तोही नेहमीप्रमाणेच... म्हणजे राज्यांनी आणि लोकांनी काय करायचं ते करावं. आम्ही मदत करतोच आहोत असं ते म्हणतात पण किती आणि कशा प्रकारे हे सांगत नाहीत. (तिच्या तुटपुंजेपणाची चर्चा नको!) 

प्रत्यक्षात राज्याराज्यांमध्ये आपले आणि इतर असा भेदभाव केलेला स्पष्ट दिसतो आहे आणि त्यामागंही तिथली विरोधी सरकारं कशी नेस्तनाबूत करता येतील याच विचारानं सारं चालल्यासारखं आहे हे स्पष्ट दिसतंय. एकीकडं राज्यांना बोल लावायचे पण अतिशय महत्त्वाच्या यंत्रणा स्वतःकडं ठेवायच्या आणि राखून पुरवठा करायचा हे लसी, इंजेक्शनं आणि ऑक्सिजन यांच्या पुरवठ्यावरून कळतंच आहे. ऑक्टोबर महिन्यात निविदा काढून 160पेक्षा जास्त जणांना ऑक्सिजन प्लांट्सना मंजुरी दिली खरी... पण पुढं काय केलं ते सांगितलं जात नाहीय. 

आता अर्ध्या वर्षानंतर त्यांपैकी केवळ 33 प्लांट्सच सुरू झाले आहेत. उद्योगांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कोविड-19वर उपचाराकडे वळवण्यात आला आहे. त्या केंद्रांकडून आणि हॉस्पिटल्सकडं वळवायचा हे समजण्यासाठीही बराच काळ जावा लागला. दरम्यान रुणांची आणि मृतांची वाढती संख्या चार राज्यांपुरती मर्यादित न राहता बहुतेक सर्व राज्यांत वाढत गेली आहे. अजून तरी तिला उतार पडलेला नाही.

...आणि सुरुवातीला या साथीबाबत बेफिकिरी दाखवणाऱ्यांसकट आता सर्वांच्याच मनात अनामिक भीती दाटून राहिली आहे. अगदी लस घेतलेल्यांपैकी अनेक जणही त्यांत आहेत. ही भीती शरीर पोखरते हे वेगळं सांगायला नको. उलट प्रसन्न, हसतखेळत राहिलं तर तुमची प्रतिकारशक्ती वाढेल हे सर्वांना सतत बजावत राहिलं पाहिजे. केवळ भीतीच्या आहारी गेलात तर नुकसान तुमचंच आहे हे लोकांना पटवून द्यायला हवं आणि त्यांनीही ते मनोमन समजून घेतलं पाहिजे. 

प्रख्यात शास्त्रज्ञ मेरी क्यूरी यांनी म्हटलं होतं की, जगण्यामध्ये भय बाळगावं असं काहीही नाही, फक्त ते नीट जाणून घ्यायला हवं. आता हीच वेळ आहे अधिक समजून घेण्याची म्हणजे तुम्हाला कमी भीती वाटेल. (Nothing in life is to be feared, it is only to be understood. Now is the time to understand and more. So that we may fear less. – Marie Curie) आता समजून घ्यायचं म्हणजे काय... तर सुरुवातीपासून जे काही सांगितलं जात आहे ते नीटपणे आत्मसात करून त्यानुसार वागायचं म्हणजे मास्क, शारीरिक अंतर इत्यादी. तसं केलं तर भीतीपासून चटकन दूर जाणं शक्य होईल.

या दृष्टीने आपण विचार केला तर सध्या लोकांची अवस्था कशी आहे? तर असं दिसतं की, ती जलाल-अद-दिन अर-रूमी यांनी म्हटल्याप्रमाणे, आपण किती विचित्र आहोत की नुसते अंधाराच्या गर्तेच्या तळाला बसलेले असतानाही आपल्याला आपल्या अमरत्व-चिरंतनपणाचीच भीती वाटते. (What Strange beings we are, that sitting at the bottom of the dark, we are afraid of our own immortality. Jalal-ad-Din ar-Rumi.) आता यात काही आश्चर्य नाही की, जसजसे आपण आपल्या जिवलगांचे, मित्रांचे, आजूबाजूच्या लोकांचे हाल पाहत आहोत; त्यांच्या दुःखाकडं आणि अनेकदा जणू काही नरकयातनाच म्हणाल असे त्यांचे होणारे हाल पाहून आपण सर्वच जण गोंधळलो आहोत, हवालदिल आहोत आणि कित्येकदा भयंकर संतापही येतोय असं वाटतंय. हे असं का व्हावं; हे सारं कुणामुळं झालं, होतंय; याला जबाबदार कोण; याला अंत आहे की नाही असे अनेकविध प्रश्न सर्वांच्याच मनात गर्दी करत आहेत. 

इतिहासातलं कदाचित सर्वात मोठं आव्हान आपल्यापुढं आहे आणि ते म्हणजे आपण सत्याला सामोरं जाऊ शकतो का? ते पचवता येईल का? सत्य मान्य करण्याचं धाडस आपल्याकडं आहे का? त्यात आपली भूमिका आहे काय? आणि याचं उत्तर होकारार्थी असेल तर आपण आपली जबाबदारी मान्य करायला हवी. आपल्याला हे उमगायला हवं की, आपण स्वतःमध्ये बदल केला तर आपण परिस्थितीही बदलू शकू यावर विश्वास हवा. आपल्या अनाठायी श्रद्धा, रुजलेल्या किंवा प्रयत्नपूर्वक रुजवण्यात आलेल्या समजुती, द्वेषभाव, समाज दुभंगण्यासाठी सतत करण्यात येणारे प्रयत्न आणि त्यामुळं अनेकांना वाटणारी भीती यांमुळं आपण आपल्या शरीराचा आणि आपल्या लहानशा जगताचा नाश वेगानं ओढवून घेत आहोत.

यावर सोपा उपाय आहे. तो म्हणजे आपण सत्याच्या शोधासाठी ज्या प्रकारे विचार करतो त्या धाटणीमध्ये थोडा बदल करायचा. महान सत्य हे आहे की, आपणच आपल्या अनुभवाचे शिल्पकार आहोत हे मान्य करायचं. असं केल्यामुळं खरोखरच आपल्या जगण्यात आणि भविष्यात काही बदल होईल का हा प्रश्न आहे आणि आपण तो स्वतःला वारंवार विचारायला हवा. आपल्या देशात हे असं का होतंय याचा विचार करायला हवा. त्याबरोबरच इतरही अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं शोधण्याचीही आवश्यकता आहे. तरच आपल्याला न घाबरता मेरी क्युरीबाईंनी म्हटल्याप्रमाणे जीवन समजून घेता येईल... पण त्यासाठी जनसामान्यांना पडणाऱ्या, पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत म्हणजेच सत्य शोधायला हवं. (पण ते किती जणांच्या पचनी पडेल?) निदान तसा प्रयत्न गंभीरपणे करायला हवा. 

तर ते प्रश्न...

आपल्याकडं सध्याच्या काळात ज्यांनी सत्य सांगायला हवं त्यांच्याकडूनच ते लपवण्याचा प्रयत्न सतत का केला जातो? कुणी सत्य सांगितलं तर त्याच्यावर भयानक, अगदी जीवघेणी प्रतिक्रिया, त्याला देशद्रोही ठरवण्यापासून ते थेट जीवे मारण्यापर्यंत धमकी का दिली जाते? आपली चूक मान्य करण्याचा मोठेपणा दाखवू नये एवढे हे महान महनीय नेते कोते आहेत का? सत्तेवर आल्यापासून नागरिकांच्या मूलभूत गरजांकडं दुर्लक्ष नाही... डोळेझाक करून केवळ पुतळे, मंदिरं, उत्सव आणि स्वतःचंच कौतुक करून घेऊन खरोखरच काय साधायचंय यांना? लोकांच्या सुरक्षिततेहून निवडणुका अधिक महत्त्वाच्या आहेत का? लसीकरणाला सुरुवात करतानाच त्याबाबत काटेकोर नियोजन करण्यात आलं असतं तर ती मोहीम सुरू असतानाच लसीच्या उपलब्धतेतच खंड पडण्याच्या घटना का घडताहेत? राज्यांनी जास्त दरात लसी कराव्यात असं सांगण्याची आवश्यकता काय होती... कारण केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ज्या रकमेची तरतूद यासाठी करून ठेवली आहे त्यातील निम्मी रक्कमच या धोरणामुळे वापरली जाईल. मग उरलेल्या रकमेचं काय? 

विषाणूंचं बदलतं रूप आणि जीन सिक्वेंन्सिंग यांसाठी पैसे द्यायला उशीर का झाला? (की करण्यात आला)? आधी मंजूर केलेल्या ऑक्सिजन प्लांट्‌सपैकी केवळ 33 कार्यान्वित झालेले असताना आता आणखी 550 प्लांट्स सुरू करण्यास मान्यता देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. प्रत्यक्षात यांतले किती प्लांट्‌स सुरू होतील आणि केव्हा? लसीच्या आयातीला परवानगी द्यायला एवढा उशीर का लावण्यात आला? अत्यंत गंभीर परिस्थितीबाबत पंतप्रधानांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान निवडणूक प्रचारात गर्क असल्यानं उपलब्ध नाहीत असं सांगितलं जातं तेव्हा यातून काय अर्थ काढायचा? सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे स्पष्ट व सर्वसमावेशक धोरण जाहीर करण्याबाबत केंद्र सरकार गंभीर आहे का? राष्ट्रीय आराखडा तयार करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करायची इच्छाशक्ती केंद्राकडे आहे का? परदेशी वृत्तपत्रांच्या आणि नियतकालिकांच्या भारतातल्या स्थितीच्या माहितीकडे दुर्लक्ष केलं जाईल की ती सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल?

खरंतर न संपणाऱ्या प्रश्नांची ही मालिका आहे आणि दिवसेंदिवस त्यांत भरच पडत चालली आहे. नुसते हे प्रश्नच अस्वस्थता निर्माण करायला कारणीभूत आहेत. प्रयत्नपूर्वक आणि निर्धारानं त्यांची खरीखुरी उत्तरं मिळवायला हवीत मग ती कितीही अप्रिय वाटणारी असोत. केवळ त्यांतूनच योग्य निर्णय घेऊन धोरण आखता येऊ शकेल पण पुन्हा एक प्रश्न मेंदू पोखरतो. तो म्हणजे खरंच का हे होईल?

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: आ श्री केतकर कोरोना आरोग्य नोटबंदी लॉकडाऊन आरोग्य व्यवस्था राजकारण केंद्र सरकार प्रशासन A S Ketkar Corona Health Demonetization Politics Administration Load More Tags

Comments:

Suresh Pund

अतिशय परखड विवेचन.

Akshay Kharche

The 10000 ventilator purchased under PM care of very poor quality. They are not useful. Today’s news of these ventilators in Sassoon is reality. They can not be used as non medical grade turbines and electronic used

Sudam Gopal Sutar

Nice

Add Comment