भाजपसाठी सेक्युलॅरिझम म्हणजे सिक्युलॅरिझम आहे!

सेक्युलॅरिझम आणि भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व यांचे व्यस्त समीकरण

https://edtimes.in/

भाजपच्या पाठीराख्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर ‘सेक्युलर’ या शब्दाचा ‘सिक्युलर’ असाच वापर करून, सगळे सेक्युलर म्हणजे सेक्युलॅरिझमला पाठिंबा देणारे लोक हे सिक म्हणजे आजारीच आहेत, असे सांगण्याचा प्रयत्न केला. कारण सेक्युलॅरिझम ही कल्पनाच त्यांच्या दृष्टीने एक आजार आहे. ज्यावेळी सेक्युलर या शब्दावर असे डाग पडले नव्हते, तेव्हां भाजपच्या लोकांनी आपण स्वतःच खरेखुरे सेक्युलर आहोत, असा दावा केला होता.

‘सेक्युलॅरिझम’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा नेहमीच नावडता विषय राहिला आहे. त्यामुळेच त्यांनी घटनेमधूनही सोशॅलिझम आणि सेक्युलॅरिझम हे शब्द वगळण्याचा (अयशस्वी) प्रयत्न केला होता. पण आता नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान झगड्यानंतर मोदी आणि त्यांचे पाठीराखे यांना सेक्युलॅरिझमबाबत बरेच काही शिकता येण्यासारखे आहे. परंतु मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे, ते हे शिकतील, समजतील आणि आचरणात आणतील का? कारण भाजप आणि ज्या संस्थेतून त्यांचा (प्रथम जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पार्टीचा) जन्म झाला तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, म्हणजे आरएसएस, यांना प्रथमपासूनच सेक्युलॅरिझम, म्हणजे धर्मनिरपेक्षता, या शब्दाचेच वावडे आहे. कारण त्यांच्या तत्त्वप्रणालीतच सेक्युलॅरिझमला स्थान नाही. पण आज त्यांची ही विचारधारा पराभूत झाली आहे. देशातील सामान्य लोकांनीच ती पराभूत केली आहे. त्याबरोबरच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची राष्ट्रभावनाही हरली आहे. 

“भारत हा पाकिस्तानच्या वरचढ आहे तो आता खरोखरच हिंदूराष्ट्र बनला आहे, म्हणून नाही, तर त्याच्या राज्यघटनेतच सेक्युलॅरिझम ही संकल्पना समाविष्ट आहे म्हणून,” असे भारत-पाकिस्तानच्या तूर्त थांबलेल्या झगड्याबाबत वृत्तपत्रांना निवेदन देणारी, भारतीय लष्कराची प्रवक्ता कर्नल सोफिया कुरेशी म्हणाली. तिचे हे सांगणे सध्याच्या राजकीय आस्थापनेच्या भावनांच्या आणि विचारधारेच्या बरोबर विरुद्ध होते. सोफिया कुरेशीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी हे स्पष्ट करू इच्छिते की, भारत हा सेक्युलर आहे आणि त्याचे लष्कर म्हणजे राज्यघटनेतील मूल्यांचे सुंदर प्रतिबिंब आहे”. नुकत्याच झालेल्या युद्धविरामानंतर आता सगळा गदारोळ शांत झाला असला, तरी हे शब्द सर्वांच्या कानात मोठ्या आवाजात दीर्घकाळ घुमत राहतील. हे शब्द झगडा सुरू असताना बोलल्या गेलेल्या अगणित बोलांपेक्षा अधिक लक्षणीय आहेत. आता काही काळानंतर हा खणखणीत आवाज गप्प करण्याचा आक्रमक, हिंसक आणि कर्कश प्रयत्न भाजपचे नेते नक्की करतील.

आता दोन्ही देशांच्या फौजा आपापल्या जागी परतल्यामुळे, तूर्त तरी युद्ध टळले आहे असे दिसते. तरीही एक प्रश्न कायम डोके वर काढत आहे - कोण जिंकले आणि कोण हरले? दोन्ही देशांचे नेते आपल्या जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की आपणच विजयी झालो. आणि जनतेने त्यांना विनाअट भक्कम पाठिंबा दिल्यामुळे आता ते जो दावा करतील, तो मान्य करणे जनतेला भाग आहे. पण वस्तुस्थिती मात्र त्यांना लाजिरवाणे वाटायला लावणारी आहे. एक युद्ध असे असते की, जे शस्त्रांच्या सहाय्याने लढले जाते आणि दुसरे युद्ध मात्र भाषेच्या मदतीने. ज्यावेळी दोन देश एक-दुसऱ्याबरोबर लढू शकत नाहीत, तेव्हां ते शस्त्रांच्या युद्धाचे शाब्दिक युद्धात करतात. ‘आमच्या कल्पनेचा विजय झाला तर साऱ्या जगाचेच कोटकल्याण होईल’ असा दोन्ही बाजूंचा दावा असतो. 

रशियाने जेव्हां युक्रेनवर हल्ला केला, तेव्हा त्यांना आवर्जून सांगावे लागले की, ‘युक्रेन हा देश नाझी विचारसरणीला खतपाणी देत आहे.’ आता प्रश्न असा विचारला जातो की, ‘कोणता देश धर्माचे प्रतिनिधित्व करतो आणि कोणता देश अधर्माची तळी उचलतो?’ त्यामुळे आजच्या काळात धर्म म्हणजे काय आणि अधर्म म्हणजे तरी काय? हाही एक प्रश्न आहे. पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या निर्घृण हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला. नंतरच्या दहा दिवसांच्या शस्त्रांचे आणि शब्दांचेही युद्ध खेळले जात होते. त्या काळात भारताच्या वतीने लष्कर बोलत होते. भारताच्या राजकीय आस्थापनाने मात्र त्या काळात गप्प राहणेच पसंत केले. (सर्वपक्षीय बैठक स्वतः पंतप्रधानांनी बोलावली होती, ते स्वतः मात्र त्या बैठकीला हजर राहिले नाहीत. हेही त्यांच्या धाटणीला साजेसेच. कारण त्यांना कुणीही प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. कारण त्याला उत्तर देणे भाग असते. म्हणूनच ते पत्रकार परिषद घेत नाहीत. अमेरिकेत नाइलाजाने त्यांना संयुक्त पत्रकार परिषदेला उपस्थित राहावे लागले. पण तेथेही जो प्रश्न विचारला गेला, त्याला उत्तर न देता, भलतेच काहीतरी बोलून वेळ साजरी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही हे जगाला कळले.) पण परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि भारतीय लष्कराच्या प्रवक्त्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकारांना माहिती देताना जी भाषा वापरली, ती मात्र, आपले राजकीय आस्थापनातील लोक २२ एप्रिलच्या अगोदर आणि नंतरदेखील जी भाषा वापरत होते, तिच्याहून अगदी निराळी होती. 

हा झगडा सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी, “भारताने मशिदींना लक्ष्य केले आहे,” असा आरोप पाकिस्तानने केल्यानंतर, कर्नल सोफिया कुरेशीने, पाकिस्तानचा आवाज बंद करताना सांगितले की “भारत हा सेक्युलर देश आहे.” हे उत्तर अगदी चोख होते. तिला असे म्हणायचे होते की, भारत कोणत्याही धार्मिक प्रतिकाला लक्ष्य करत नाही. तो कोणत्याही धर्माचा अपमान करत नाही. हे वाक्य केवळ पाकिस्तानसाठीच होते. परंतु आपले पंतप्रधान आणि भाजपच्या इतर नेत्यांनी हे वारंवार ऐकायला हवे. केवळ त्यांनीच नाही, तर त्यांना पाठिंबा देऊन निवडून देणाऱ्यांनीही! या भाजपच्या पाठीराख्यांनी हे ध्यानात ठेवायला हवे. याचे कारण असे की, त्यांनीच या नेत्यांना निवडून दिले होते. तेही या अपेक्षेने की, हे त्यांचे आवडते नेते भारताची ‘सेक्युलर’ म्हणून असलेली ओळख एकदम बदलून टाकतील आणि आपल्या देशाला चक्क ‘हिंदू राष्ट्र’ बनवतील म्हणून. 

भाजपच्या कार्यकर्त्यांना २०१९ सालच्या निवडणुकीतील मोठ्या यशानंतर संबोधताना, नरेंद्र मोदी यांनी मोठ्या गर्वाने सांगितले होते की, ‘सेक्युलॅरिझम’ हा शब्द संविधानातून २०१४ नंतर काढून टाकण्यात आला आहे. २०१९ मधील लांकसभा निवडणुकीनंतर, स्वतःची पाठ थोपटून घेत ते म्हणाले होते की, “यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला सेक्युलॅरिझमचा मुखवटा चढवून लोकांची दिशाभूल करण्यात यश आलेले नाही”. मोदींच्या खालोखाल भाजपमध्ये लोकप्रिय असलेले नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तर २०१७ मध्येच म्हणाले होते की, “सेक्युलर’ हा शब्द हेच सर्वात मोठे असत्य-खोटेपणा आहे. २०२३ साली भाजपने संसदेमध्ये वाटलेल्या आपल्या राज्यघटनेच्या प्रतींमध्ये ‘सोशॅलिझम’ आणि ‘सेक्युलॅरिझम’ हे शब्दच वगळून टाकण्यात आले होते. तसे पाहिले तर आपली राज्यघटनाच बदलून टाकण्याचा भाजपचा विचार लपून राहिलेला नाही, आणि गतसालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांच्याच एका नेत्याने ‘आम्ही निवडून आलो की घटना बदलून टाकू,’ असे स्पष्टपणे सांगितले होते. नंतर भाजपच्या नेत्यांनी कितीही ओरडून सांगितले की, ‘आम्हाला तसे काहाही करायचे नाहीय.’ तरी दरम्यान जायचा तो संदेश अगदी मतदारांपर्यंत गेला होता. त्यामुळेच त्यांनी भाजपला अपेक्षित ४०० जागा तर मिळू दिल्या नाहीतच, शिवाय त्यांची संख्याही त्यांना अन्य पक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागतील अशा २३० वर आणून ठेवली. 

उप-राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अनेकदा सांगितले आहे की, ‘आपल्या राज्यघटनेची मूलतत्त्वे, ज्यांवर घटना आधारलेली आहे, ती मुळीच पवित्र नाहीत आणि ती बदलली जाऊ शकतात.’ मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, ‘संसदेने कोणताही ठराव मंजूर केला, तरी संसदेच्या मूलतत्त्वाच्या विरोधात ते जाऊ शकत नाहीत. 
सेक्युलॅरिझम हे घटनेच्या घडणीचे एक आवश्यक मूलतत्त्व आहे. धनकर यांना मात्र ते मूलतत्त्वच काढून टाकायचे आहे. त्यांच्या पालक संस्थेला म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तर ‘सेक्युलॅरिझम’ या शब्दाचाच तिटकारा आहे. भाजप आणि संघ हे दोघेही नेहरुंचाद्वेष करतात, कारण त्यांनीच भारताला ‘सेक्युलर प्रजासत्ताक’ बनवले. येथे आठवण होते की, महाराष्ट्रात ज्यावेळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबरची युती तोडून सरकार स्थापनेसाठी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी त्यांची खिल्ली उडवताना म्हटले होते की, ‘उद्धव ठाकरे आता सेक्युलर झाले आहेत.’ महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी तिरकसपणे म्हटले होते की, ‘उद्धव ठाकरे यांना सेक्युलर व्हायचे आहे.’ भाजपचे पाठीराखे तर सेक्युलर हा शब्द सर्रास शिवीप्रमाणेच वापरतात. 

भाजपच्या पाठीराख्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ‘सेक्युलर’ या शब्दाचा ‘सिक्युलर’ असाच वापर करून, सगळे सेक्युलर म्हणजे सेक्युलॅरिझमला पाठिंबा देणारे लोक हे सिक म्हणजे आजारीच आहेत, असे सांगण्याचा प्रयत्न केला. कारण सेक्युलॅरिझम ही कल्पनाच त्यांच्या दृष्टीने एक आजार आहे. ज्यावेळी सेक्युलर या शब्दावर असे डाग पडले नव्हते, तेव्हां भाजपच्या लोकांनी आपण स्वतःच खरेखुरे सेक्युलर आहोत, असा दावा केला होता. त्यांचे नेते लालकृष्ण आडवानी यांनी ‘स्युडो सेक्युलर’ हा (‘pseudo-secular) शब्द तयार केला होता. जे कुणी अल्पसंख्याकांच्या हक्कांचा पुरस्कार करत, त्यांच्यासाठी ‘स्युडो सेक्युलर’ हा शब्द वापरला. त्यांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी वारंवार सेक्युलॅरिझम या शब्दाची टिंगल केली आणि त्याबरोबरच सेक्युलॅरिझम या शब्दाला विकृत रूप देण्याचा, त्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला.

मोदींनी दावा केला की, त्यांच्या सर्व योजना या सर्वांसाठी फायद्याच्या आहेत म्हणजे ते स्वतःच खरे सेक्युलर आहेत! असे करणे म्हणजे या शब्दाचा आत्माच नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. खरे तर सेक्युलॅरिझम म्हणजे सर्वांसाठी राजकीय हक्कांतील समानता. सर्व धर्माचे लोक, मग त्यांची संख्या कितीही असो, त्यांना समान राजकीय हक्क असणे म्हणजे सेक्युलॅरिझम. सेक्युलॅरिझमचा एक अर्थ असाही आहे की, प्रत्येक धर्माच्या आणि पंथाच्या सर्व लोकांना राजकारणात समान पातळीवर सामील होता येणे. यामुळे कोणत्याही धर्माच्या लोकांना किंवा समुदायाला यामुळे आपणही देशाचे प्रतिनिधी बनू शकतो, हा विश्वास येतो. 

पण आजकाल समान वागणूक सोडाच, पण अल्पसंख्याकांवर वारंवार कोणत्यातरी कथित कारणांवरून हल्ले करण्यात येत आहेत, त्यांना ठार केले जात आहे. मुख्य म्हणजे हल्ले करणारे सहीसलामत सुटत आहेत. समजा त्यांना शिक्षा झाली तरी ते सुटल्यानंतर त्यांना सत्कार करून गौरवण्यात येत आहे. जसे बिल्किस बानूवर अत्याचार करणाऱ्यांबाबत केले गेले. त्यांच्यावर जणू काही अन्यायच झाला आहे, असे लोकांना वाटावे म्हणून असे प्रयत्न केले जाताहेत. अनेकदा या गुन्हेगारांना पुराव्याअभावी सोडले जात आहे किंवा जामीन दिला जात आहे. पोलिसांवर दडपण असल्याशिवाय असे होण शक्य नाही हे सर्वजण जाणून आहेत.

दिल्लीत निषेधासाठी शाहीन बागेत ठिय्या दिलेल्या मुस्लिम महिलांना कशी वागणूक दिली गेली आणि भाजपच्याच एका खासदाराने पिस्तुल दाखवून, ‘गोली मारो सालोंको,’ अशी गर्जना केली, तेव्हा त्याचे भाजपच्या लोकांनी किती कौतुक केले हेही लोकांनी पाहिले आहे. कोणालाही गोमांस नेत असल्याच्या संशयावरून जीवघेणी मारहाण केली जाते आणि पोलीस निष्क्रिय राहून ते सारे पाहतात. खासदारांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत कोणीही अपशब्द वापरून अल्पसंख्याकांची टिंगल करतात. त्यांनी जाब विचारला तर अर्थातच त्यांना मारहाण सहन करावी लागते. या प्रकारची अनेक उदाहरणे आहेत, वाचकांनाही ती माहीत असतीलच. 


हेही ऐका - निधर्मी समाजातील धर्माचे स्थान (एस. एम. जोशी)


आता अल्पसंख्याकांची कोणतीही वास्तू बेकायदा आहे, असे म्हणून ती उदध्वस्त करण्याची जणू काही रीतच झाली आहे. तिला मोठ्या अभिमानाने ‘बुलडोझर न्याय’ म्हणण्यात येत होते. पण आता सर्वोच्च न्यायालयानेच असे काही करण्याआधी पंधरा दिवसांची नोटीस देणे बंधनकारक केले आहे. अर्थात भाजपवाले न्यायालयाला किती जुमानतात हे त्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे, त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा कितपत परिणाम होईल, याविषयी शंकाच वाटते. 

आता एक नवी टूम निघाली आहे. वर्षानुवर्षे मंदिरांसाठी मूर्तीचे कपडे, हार, दागिने इ. पुरवणाऱ्यांना अल्पसंख्याकांना मंदिरांजवळून काढून टाका, त्यांची दुकाने तेथून हलवा, त्यांच्याकडून खरेदी करू नका, असे फतवे काढले जाताहेत. याबाबत कुणी आवाज उठवलेला नसला, तरी वृंदावन येथील पुजाऱ्यांनी मात्र ठामपणे ते लोक देवाचेच काम करत आहेत आणि हे त्यांच्या अनेक पिढ्या करत आल्या आहेत. आम्हीत्यांच्या बाबतचे तुमचे कोणतेही आदेश मानणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे. हा एक आशेचा किरण आहे. त्याचा उजेड सर्वत्र पडायला हवा. 

भाजपचे प्रमुख विचारवंत दीनदयाळ उपाध्याय आणि त्यांच्या आधी मा. स. गोळवलकर यांना भारतात मुस्लीम आणि ख्रिश्चनांना राजकीय हक्क मिळायला नको होते. गुजरातमध्ये प्रचार करताना, नरेंद्र मोदी यांनी, काँग्रेस सत्तेवर आली तर अहमद पटेल हे मुख्यमंत्री बनतील असे सांगितले होते. याद्वारे त्यांना हिंदूंच्या मनात भीती निर्माण करायची होती. पण त्यावेळी कुणीही, अगदी काँग्रेसनेही, असे विचारले नाही की, पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनण्याचा अधिकार का असू नये. त्याचप्रमाणे आसाममध्येही हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना असे सांगितले गेले की, भाजपला बहुमत मिळाले नाही, तर बदुद्दिन अहमद हे मुख्यमंत्री होतील. पण केवळ ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा हक्क नाही काय ? 

मोदी नेहमीच राहुल गांधी यांना ‘शहजादा’ म्हणून त्यांची टिंगल करतात. त्याआधी त्याआधी मुलायम सिंग यादव यांनाही भाजपकडून ‘मौलाना मुलायम’ असे संबोधण्यात येत होते. त्यानंतर मोदी यांनी मुख्यमंत्री लिंगडो (ह) यांचा धर्म उघड करण्यासाठी जाणून बुजून त्यांचे संपूर्ण नाव घेऊन, ‘जेम्स मायकेल लिंगडो (ह)’ असा उल्लेख केला होता. जणू काही ते ख्रिश्चन असल्यामुळेच त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या होत्या, असे भासवण्याचा प्रयत्न केला होता. सोनिया गांधींनाही त्या ख्रिश्चन असल्यामुळे वारंवार या प्रकारच्या शाब्दिक हल्ल्यांना सामोरे जावे लागते. 

खरे तर देशातील राजकारणात सहभागी होण्याचा प्रत्येकाला समान हक्क नसेल, तर सेक्युलॅरिझम या शब्दाला काही अर्थच राहात नाही. भाजप आणि त्यांची पितृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी याबाबत आपले विचार कधीच लपवलेले नाहीत. त्यामुळेच गेल्या अकरा वर्षांत देशात, जे काही मुसलमानांचे, ते सारेच बदलून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शाळेच्या पुस्तकांतून मुस्लिमांचा ठसा पुसून टाकला जातो आहे; शहरे, गावे आणि रस्त्यांची नावेही बदलण्यात येताहेत. सेक्युलॅरिझम नाहीसा करण्यासाठी सेक्युलॅरिझम ही कल्पनाच परकीय आहे असेही वारंवार सांगितले जाते आहे. 

पण आज मात्र तोच सेक्युलॅरिझम देशाची वैचारिक ढाल बनला आहे. ज्यांना कुणाला मोदींची भाषा ही आदर्श वाटते त्यांना विचारले पाहिजे की, मोदींनी सेक्युलॅरिझमच्या मुखवट्यामागे लपण्याचा कितीही प्रयत्न केला, मोदीकी प्रेमपूर्वक भेट असे सांगत गरीब अल्पसंख्याकांना भेटी दिल्या तरी त्यांचा वाईट आणि तिरस्करणीय बहुमतवादी दृष्टिकोन त्यामुळे लपून राहू शकेल का ? 

सर्वांनीच याचा नीटपणे विचार करायला हवा! 

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

 

Tags: भाजप secularism धर्मनिरपेक्षता निधर्मीवाद सेक्युलॅरिझम हिंदुत्ववाद हिंदुत्व मोदी Load More Tags

Comments:

Anup Priolkar

Nice to read good article referring to the word secularism .

जॉन कोलासो

परखड, वस्तुनिष्ठ लेख.

Dattu Narayankar

वास्तव आहे

Madhurata Deshmukh

खुप छान लेख. पण शहण्याला शब्दांचा मार व मुर्खांना चालकाचा हे च आज खरं आहे. कितीही आपण बोललो तरी मुस्लिम द्वेष जाणार नाही, इतका तो RSS मध्ये भरलेला आहे.

Kadir Inamdar

फार सुंदर लेख, सडेतोड विश्लेषण, अविचारी लोकांना विचार करण्यास बाध्य करनारा लेख...

Add Comment

संबंधित लेख

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/ https://ojsstikesbanyuwangi.com/ https://ejournal-uniqbu.ac.id/ https://revistas.uca.es/index.php/hachetetepe https://revistas.uepg.br/index.php/olhardeprofessor https://cdc.uwp.ac.id/profile https://ftk.unbara.ac.id/faq/ https://news.staidapayakumbuh.ac.id/halal-bihalal-stai-darul-quran-payakumbuh-memperkuat-ukhuwah-di-objek-wisata-syariah-torang-sari-bulan/ https://stftws.ac.id/