राहुल- राजीव, चुकीची कबुली द्यायला हवी !

फोटो: कर्तव्य साधना

14 ते 16 एप्रिल या तीन दिवसांच्या काळात, मराठी वृत्तवाहिनीवर एक बातमी आणि ती देणाऱ्या पत्रकाराला अटक व जामिनावर सुटका असे एक छोटेसे थरारनाट्य घडून आले. त्यामुळे राज्यातील व काही प्रमाणात राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारितेच्या क्षेत्रातही खळबळ उडाली. त्यावर बरेच चर्चामंथन घडून आले आहे. तर त्या नाट्यामधील मूलभूत मुद्द्यांकडे लक्ष वेधणारा आणि पत्रकारितेच्या मूलतत्वांचा आग्रह धरणारा हा एक लेख...

15 एप्रिलच्या पहाटे एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीचे उस्मानाबाद येथील प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना अटक करून त्याच दिवशी दुपारी वांद्रे, मुंबई येथील पोलिस मुख्यालयात चौकशीसाठी पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे सोडण्यात आले. ही अटक व चौकशी कशामुळे, तर 14 एप्रिलच्या सकाळी राहुल यांनी, परप्रांतीय लोकांसाठी रेल्वे गाड्या सोडल्या जाणार असल्याची एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरून दिलेली बातमी एका उद्रेकाला कारणीभूत ठरली, असा पोलिसांचा आरोप. म्हणजे त्या दिवशी सायंकाळी वांद्रे रेल्वे स्टेशनजवळ काही हजार परप्रांतीय लोक एकत्र आले आणि रेल्वे सोडा अशी मागणी करू लागले; त्याची दोन कारणे पोलिसांसमोर प्रथमदर्शनी आली. एक मुंबईत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय लोकांच्या संघटनेच्या विनय दुबे या नेत्याने तो जमाव संघटित करण्यासाठी सोशल मीडियावरून केलेला प्रचार; दुसरे एबीपी माझावरून राहुल कुलकर्णी यांनी दिलेली बातमी. 

विनय दुबे यांच्या अटकेचे स्वागतच झाले, कारण इतक्या बेजबाबदारपणे या माणसाने जमाव संघटित होण्यासाठी चिथावणी कशी दिली असा तो मुद्दा होता. मात्र राहुल यांच्या अटकेबाबत उलट सुलट चर्चा दोन दिवस चालत राहिली. कारण एबीपी माझा ही वृत्तवाहिनी मागील दीड दशक तरी मराठीत पहिल्या तीन क्रमांकामध्येच मानली जाते (बातम्यांचा / कार्यक्रमांचा दर्जा व प्रेक्षक संख्या या दोन्ही बाबतीत.), आणि राहुल हा मराठी वृत्तवाहिन्यांवरील पहिल्या दहा वार्ताहर - पत्रकारांपैकी (गुणवत्ता व विश्वासार्हता या दोन्ही बाबतीत) मानला जातो.

या मोठ्या वृत्तवाहिनीचे व या प्रसिद्ध पत्रकाराचे पाठीराखे वा चाहते  भरपूर आहेत, तसे काही टीकाकारही आहेत. असे चाहते व टीकाकार काही व्यक्तिगत राग-लोभ आणि काही प्रमाणात वैचारिक भूमिकांमधील साम्य-भेद या दोन कारणांमुळे आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आवेशपूर्ण वक्तव्ये, प्रतिक्रिया व लेख येणे साहजिक होते. परिणामी या दोन्ही बाजूंच्या लोकांकडून काही प्रमाणात मूळ मुद्दे सोडून चर्चा झाली, विपर्यास केला गेला, विषयांतर केले गेले, भलतेच तर्क लढवले गेले. अर्थात असे काही सनसनाटी घडते तेव्हा अशा प्रकारची चर्चा कळत वा नकळत घडणे साहजिक होते. मात्र फार थोड्या ज्येष्ठ पत्रकार संपादकांनी मूळ मुद्दा काय आहे, याकडे लक्ष वेधून त्यावरच टीका टिप्पणी केली, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. 

राहुलने उस्मानाबाद येथून दिलेली माहिती व एबीपी माझाचा मुंबई कार्यालयातील निवेदक, या दोघांनी मिळून दिलेल्या त्या दोन-अडीच मिनिटांच्या बातमीची ध्वनीचित्रफित उपलब्ध आहे. शिवाय, रेल्वे प्रशासनाच्या ज्या पत्राच्या आधारे ती बातमी दिली गेली, ते पत्र राहुलने स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर टाकले आहे. त्यामुळे, ते पत्र काळजीपूर्वक वाचले आणि त्या बातमीची ध्वनीचित्रफीत काळजीपूर्वक ऐकली व पाहिली तर दोन प्रश्न मनात येतात. एक- ही बातमी वांद्रे येथे काही हजारांचा जमाव निर्माण होण्यास कारणीभूत ठरली का? दुसरा प्रश्न- ही बातमी रेल्वे गाड्या सुरू होण्याबाबत लोकांच्या मनात काही गोंधळ वा संभ्रम निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकेल अशी होती का? 

यातील पहिल्या प्रश्नाचे खरे उत्तर फक्त पोलिसांकडे मिळू शकेल. त्यांच्याकडे काय स्वरूपाचे रिपोर्ट आले, ते किती खरे-खोटे होते, यावर ते अवलंबून असेल. त्याबाबत ते किती चौकशी करू शकतील, न्यायालयात हे प्रकरण किती लावून धरू शकतील, हे सध्या तरी बाहेरच्यांना सांगता येणार नाही. मात्र त्यात फार तथ्य नसेल तर, राज्य सरकार व त्यातील तीन घटकपक्ष हा विषय लावून धरायला फारसे इच्छुक नसतील (राहुल, वा त्याची वृत्तवाहिनी यांच्यावर सरकारमधील कोणाचा रोष असेल तर ती शक्यता वेगळी). शिवाय, या वृत्तवाहिनीचे चालक-मालक व संपादक यांचे सरकार दरबारी असलेले वजन लक्षात घेता, त्यांनी ठरवले तर ते हे प्रकरण सहज मिटवू शकतात (या घटनेचा आपल्या वृत्तवाहिनीला फायदाही उचलता येईल, असा विचार व्यवस्थापनाने केला तर ती शक्यता वेगळी.) पण सामान्यतः दिसते असे की, वांद्रे येथील तो उद्रेक ताबडतोब शमवता आला आणि त्यातून मोठे म्हणावे असे काही नुकसान झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणावर लवकरच पडदा पडणार आणि ते विस्मृतीतही जाणार! 

मात्र दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर पत्रकारितेत मूल्यांचा आग्रह धरणारे व त्यासाठी यथाशक्ती कार्यरत असणाऱ्यांनी स्वतः पुरते तरी शोधायला हवे. हा विषय सोडून देणे किंवा त्यावर भाष्य न करणे हा एक पर्याय असू शकतो. पण तसे करणे म्हणजे जबाबदारी टाळणे. तर या संदर्भात आम्हाला दिसते ते असे... 

21 दिवस देशभर लागू असलेला लॉकडाऊनचा कालखंड 14 एप्रिल रोजी संपणार होता, पण त्याच्या आदल्याच दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तो कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती आणि त्याबाबत आणखी काही वा अंतिम निर्णय 14 एप्रिलच्या सकाळी 10 वाजता पंतप्रधान त्यांच्या भाषणात जाहीर करणार होते. त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष (भीती की सुटका अशा संमिश्र भावनेने) लागले होते. म्हणजे देशात काय चालू होणार आणि काय बंद राहणार, याबाबतचे स्पष्टीकरण त्या भाषणातून येणार हे उघड होते. असे असताना, त्या दिवशी सकाळी 9 वाजता एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीवरून, परप्रांतीयांसाठी रेल्वेगाड्या सोडल्या जाणार असल्याची बातमी देण्याचे कारण काय होते? आम्हाला अधिक काही exclusive हाती  लागले आहे, हे एक तास आधी दाखवणे यापलिकडे त्यातून काय साध्य होणार होते? बरे, तसे काही exclusive सांगायचे असेल तर त्याची खात्री का करून घेतली नाही?

रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत चालू असलेली चर्चा-सूचना करणारे जे पत्र कोणातरी अतिउत्साही अधिकाऱ्याने राहुलकडे दिले ते 13 तारखेचे होते. मुळात ते पत्र पत्रकारांना माहिती देण्यासाठी लिहिले गेलेले नव्हते, म्हणजे प्रशासनातील कोणी तरी अर्धवट माणसाने त्या पत्राची नक्कल (चोरून?) राहुलकडे पाठवली असणार. ठीक आहे, बातमी हाती लागते आहे तर ती करावी, पत्रकारितेचा तो धर्मच आहे. पण मग त्या पत्रानंतर जे काही बारा-पंधरा तास उलटले, त्या काळात त्या पत्रातील प्रस्तावाबाबत रेल्वे प्रशासनाने काही निर्णय घेतला का, ही विचारपूस तरी बातमी देताना राहुलने करायला हवी होती. म्हणजे तो निर्णय पक्का झालाय, रद्द झालाय की त्यात काही बदल झालाय, याची खातरजमा करायला हवी होती. शिवाय, त्या पत्रातील माहितीची योग्य ती तपासणी एबीपी माझाच्या संपादकीय विभागानेही करायला हवी होती. 

हे खरे आहे की, एक दीड-दशक आपल्या वृत्तवाहिनीत कार्यरत असलेला अभ्यासू , अनुभवी व  विश्वासू असा पत्रकार बातमी देतोय म्हटल्यावर तशी गरज संपादकीय विभागात कार्यरत असणाऱ्यांना वाटली नसणार. हेही खरे आहे की, स्पर्धात्मक वातावरण व आम्हीच सर्वांत पुढे हे दाखवण्याची गरज यामुळे ती बातमी चुकीची ठरली तर काय, हा प्रश्न त्यावेळी कोणाला पडला नसणार. आणि हेही खरेच आहे की, पंतप्रधानांच्या भाषणानंतर (रेल्वे सुरू होण्याची घोषणा झाली नाही म्हणून) ती बातमी एबीपी माझाने पुन्हा दाखवली नाही. तरीही मूळ मुद्दा उरतोच की ती बातमी अतिउत्साह व अर्धवट माहितीच्या आधारावर दिली गेली की नाही? तर होय! पण एबीपी माझाचे सर्व लोक (संपादक राजीव खांडेकर यांच्यासह) म्हणताहेत की, त्या बातमीत आम्ही तारीख व वेळ सांगितली नाही, ठिकाण सांगितले नाही, अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी रेल्वे गाड्या सोडण्याचा विचार सरकार करीत आहे, इत्यादी तपशील तेवढे दिलेत. बरोबर आहे.

मात्र मूळ बातमी ऐकली व पाहिली तर, काय मिळते. निवेदकाचे पहिलेच वाक्य असे आहे, "सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. मजूर अडकले आहेत, त्यांना गावी परत पाठवण्यासाठी प्रत्येक डीविजनमधून ट्रेन धावणार आहेत." त्याचवेळी स्क्रीन वर वाक्य येते, "रेल्वे सुरू करण्याचा विचार?" पुढे प्रतिनिधी राहुल माहिती देतात, "पत्र इशू करण्यात आलं आहे, तपशील गेले आहेत. रेल्वे सुरू करायच्या आहेत. वेगळा प्लॅन बनलेला आहे." बातमीच्या शेवटाला पुन्हा एकदा, राहूल "मजूर, कामगार यांना त्यांच्या गावाकडे पाठवण्यासाठी रेल्वे सुरू केल्या जाणार आहेत" 

ही बातमी काहींना खात्री देणारी, काहींना आशा निर्माण करणारी, काहींना आवराआवरी करीत धावपळ करायला लावणारी आणि काहींच्या मनात संदिग्धता निर्माण करणारी आहेच आहे! आणि कोरोनामुळे हवालदिल झालेल्या, टीव्हीकडे डोळे लावून बसलेल्या, सरकारकडून काय निर्णय येतोय यांच्याकडे कान लावून बसलेल्या, मजूर व कामगार वर्गात गोंधळ माजवण्याची क्षमता असणारी अशीही आहेच! अर्थात, कोणत्याही वृत्तवाहिनीत एकामागोमाग ब्रेकिंग न्यूज ज्या गतीने येतात आणि दिल्या जातात ते पाहता, त्यावेळी राहुल व एबीपी माझा मधील कोणालाही त्याचे भान न येणे किंवा गांभीर्य लक्षात न येणे सहज शक्य आहे. आणि म्हणून ते क्षम्यही आहे.

पण खरा आक्षेपार्ह मुद्दा पुढचा आहे, 'ती बातमी देण्यात आम्ही काहीच चूक केलेली नाही, आम्ही त्यावर ठाम आहोत', असे या वृत्तवाहिनीतील सर्वजण म्हणत आहेत. याचा अर्थ आत्मपरीक्षण करायला ते तयार नाहीत. आमच्याकडून अतिउत्साहाच्या भरात किंवा अजाणतेपणी किंवा अनवधानाने एक छोटी चूक झाली, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे म्हणण्याची हिम्मत त्यांच्यापैकी कोणीही दाखवलेली नाही. हे आश्चर्यकारक आहे आणि धक्कादायकही! 

आणि म्हणूनच मग पोलिसांनी केलेल्या कारवाई संदर्भात आक्षेप घेण्याचा फार मोठा नैतिक अधिकार एबीपी माझाला राहणार नाही. पोलिसांनी वांद्रे येथील घटनेसाठी ती बातमी जबाबदार आहे की नाही याचा नीट तपास केला नाही, आधी नोटीस का बजावली नाही, त्यांनी इतक्या तातडीने व इतक्या धोकादायक परिस्थितीत राहुलला मुंबईला का नेले, इत्यादी प्रश्न मग कसे विचारता येतील? अर्धवट वा अपुऱ्या वा अधिकृतपणे न आलेल्या माहितीवर आधारित, सर्वांत महत्वाची बातमी (पंतप्रधानांच्या राष्ट्राला उद्देशून होणाऱ्या भाषणाच्या एक तास आधी) देण्यासाठी तुम्ही जर अधीर झालेला असाल; तर पोलिसांनी त्यांना मिळालेल्या अर्धवट वा अपुऱ्या वा सांगोवांगीच्या माहितीचा आधार घेऊन केलेल्या कारवाईला तुम्ही आम्ही विरोध कसा करू शकणार? तो कितपत समर्थनीय मानला जाणार? 'आम्ही आमचे जनहिताचे कर्तव्य पार पाडण्यासाठी अशा बातम्या देतो', असा लंगडा युक्तीवाद तुम्ही करणार असाल तर, पोलिसांकडूनही तसाच युक्तीवाद येणार यात विशेष ते काय! त्यांना तर बिचाऱ्यांना (?) मोठा काही अनर्थ ओढवला गेला की, तातडीने त्यासाठी जबाबदार ठरलेल्या घटकांचा खरा खोटा शोध घेऊन किंवा संशयित म्हणून पकडून वरिष्ठांकडे, सरकारकडे आणि न्यायालयाकडे सादर करावे लागते. असो. 

तर मूळ मुद्दा असा आहे की, ज्या प्रकारे बातमी दिली गेली ते चूक होते आणि ज्या प्रकारे राहुलला अटक केली गेली तेही चूक होते. पोलिस व सरकार अशी चूक सहसा मान्य करीत नाहीत. ते एकवेळ आरोपपत्र मुद्दाम कच्चे ठेवतील, पुरावे अर्धवट देतील, पळवाटा मोकळ्या ठेवतील आणि आरोपीला सुटून जाण्यास मदत करतील; पण 'आमची चूक झाली', असे कधी म्हणणार नाहीत. कारण त्या व्यवस्थेला ते परवडत नाही. पण पत्रकारिता हा केवळ अंगीकृत व्यवसाय नाही, तो पेशा आहे, तेथे काही प्रमाणात तरी ध्येयवाद अपेक्षित आहे. त्यामुळे, झालेली चूक कबूल करणे हा पत्रकारितेत गुण मानला जातो. गुणवत्ता व विश्वासार्हता असलेल्या माणसांनी तशी चूक कबूल केली तर त्यांचा मोठेपणा वाढीस लागतो. तसा मोठेपणा राहुल, राजीव यांनी मिळवावा अशी इच्छा त्यांच्या अनेक (आम्हीही त्यातलेच) हितचिंतकांची आहे! अर्थात, एबीपी माझाच्या व्यवस्थापनाला हा असा 'व्यवहार' कितपत झेपणार आहे, हे मात्र त्यांचे त्यांना माहीत! 

ताजा कलम : 
प्रिंट व इलेक्ट्रॉनिक या दोन्ही माध्यमांतील राजीव खांडेकर यांच्या कर्तृत्वाविषयी कोणालाही नव्याने सांगण्याची गरज नाही. पण ज्यांना कोणाला राहुलच्या क्षमतेविषयी पुरेशी माहिती नसेल त्यांनी, त्याचा साधना दिवाळी अंक 2016 मधील 'माझी दुष्काळ डायरी' हा 30 पानांचा मर्मभेदी लेख वाचावा.

- विनोद शिरसाठ
editor@kartavyasadhana.in

(वाचा 'माझी दुष्काळ डायरी' हा राहुल कुलकर्णी यांचा लेख साधना अर्काईव्हवर किंवा पीडीएफ स्वरुपात)

Tags: लॉकडाऊन महाराष्ट्र राहुल कुलकर्णी एबीपी माझा राजीव खांडेकर विनोद शिरसाठ पत्रकारिता Corona Lockdown Maharashtra Rahul Kulkarni ABP Majha Rajiv Khandekar Vinod Shirsath Journalism Load More Tags

Comments: Show All Comments

Vijay

हे मात्र नक्की झालं....शोध पत्रकारिता,पत्रकारीतेतील विश्वास हर्ता पार लयाला गैली....मी पणात...मीच पुढे...बातम्यात वार्तांकनापेक्षा मेकप दिसने...यावर जास्त भर दिला जातो...हा चौथा आधारस्तंभ म्हणायचा का

Daniel M

संयमित तरीही ठाम भूमिका...मलाही काहीसे असेच वाटते...

PRAMOD BADDE

श्री. खांडेकर हे खूपच उर्मट वाटतात.

Ramesh Patil

मुळात रेल्वे ही आखील भारतीय सेवा आहे व तिचे मुख्य कार्यालय व मंत्रालय दिल्लीत आहे . अशा वेळेस सिकंदराबाद येथील रेल्वेचे एक दुय्यम कार्यालय असा काही निर्णय ना सुचवू शकते ना घेऊ शकते. तेव्हा जरी एखादे पत्र हाती लागले तरी त्याला किती महत्व द्यावे व प्रसिद्धी द्यावी याचा सारासार विचार आधी पत्रकार राहूल कुलकर्णी व अंतिमतः वृत संपादकाने करायला हवा होता. दूसरा मुद्दा या बातमी मुळे गर्दी जमली का ?तर ते नाही असे वाटते कारण बातमीत गाड्या कुठून व कधी सुटणार याचा काहीच ऊल्लेख नसल्यामुळे बांद-यालाच व अमुक वेळेला जमायचे हे कोणी ठरवले ? तसेच मजूर ज्या भागात जाऊ इच्छीत होते त्या गाड्या बांद-याहून सुटत नाहीत. मग तिथेच लोक एका विशिष्ट वेळेला कसे जमले ? याचे ऊतर घटने नंतर ज्या वाचाळवीर नेत्यांनी काही बाष्कळ वक्तव्य केली त्यातून कदाचित मिळू शकेल.

संजीवनी खेर

मला तुमचे विश्लेषण प्तले.एक पाऊल पुढे ह्या नादात पावला खाली काय आहे हे पहिले पाहिजे ना? आपली घाई,चूक कबूल करून विश्वासार्हता कायम ठेवत आली असती. व्हिज्युअल मीडियाने जबाबदारी जाणली. पाहिजे.लोकांचा विश्वास कायम ठेवला पाहिजे.

प्रशांत खुंटे

बातमीदाराने पुर्वी चांगले काम केलेय हे मान्य. त्यासाठी त्यांचे अभिनंदन व धन्यवाद! पण सध्याच्या आणीबाणीच्या काळात वृत्तवाहिन्या जबाबदारीने काम करताहेत असं म्हणायला धाडसच लागेल. ही मंडळी राजरोसपणे धार्मिक दरी वाढवत आहेत. या पार्श्वभूमीवर एखादा बातमीदार चांगला आहे, किंवा संपादक सन्मानीय आहेत म्हणून झाल्या गोष्टिवर पडदा टाकणे अजिबात गैर ठरेल. साधना ने या गैरप्रकारावर टिप्पणी केली याबद्दल आभार!

गिरीश काशिद

योग्य मांडणी.

कविंद्र साळुंके

राहुलने उतावीळपणा केला. राजीव खांडेकर यांनी आपल्या प्रतिनिधीच्या चुकीचे समर्थन करणे अयोग्य आहे.

Arvind p jadhav

रेल्वेने 14-4-2020 नंतर चे आॅनलाईन बुकिंग केले होते त्या अर्थी रेल्वे गाडी सुटतील असा समज होणे अपरिहार्य आहे. हा मुद्दा आपण का वगळला?, हे लक्षात आले नाही. अशा अनेक खोट्या बातम्या दिल्या गेल्याचे वाचनात आले आहे, त्याचे बाबत आपण मौन बाळगले आहे

Satish Deshpande

लेख आवडला . एबीपी माझा ने दिलगिरी व्यक्त केली असती तर वाहिनीवरील लोकांचा विश्वास आणखी वाढला असता.

Hira janardan.

लोकशाहीचा चौथा स्तंभ ,त्याचे नवे नाव 'गोदी मिडिया' (अपवाद सोडून ) ब्रीदवाक्य "मोडणार नाही की वाकणार नाही"

milind deshmukh

वकील काय सल्ला देतील व मालक काय ठरवतील यावरच बरेच निर्णय ठरतात.

Anand Musale

वस्तुनिष्ठ व परखड विश्लेषण

Shyam

काय झालं की आपलीकडे लोकशाहीत मर्यादा असतात हे काही जणांच्या लक्षात येत नाही आज सर्वात जास्त प्रभाव इलेक्ट्रॉनिक मीडिया चा आहे त्यातही स्पर्धात्मक मीडिया मुळे काही गोष्टी चे मीडिया वाले भान राखत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकशाहीत मीडिया म्हणजे अंतिम काही नाही .आणि अडचणींच्या काळात थोडेसे सजग होऊनच काम केले जायला हवे याला मीडिया ही अपवाद असू शकत नाही.

Pro. Bhagwat Shinde

खर आहे . वास्तवदर्शी मांडणी आवडली'

SHIVAJI PITALEWAD

खर आहे. शेवटी तो कुलकर्णी आहे. त्याची गुणवत्ता चांगली असणारच.कायदा फक्त असंघटित व असहाय लोकांसाठी वापरायला हवा तो संघटीत पत्रकारांसाठी तर कसा शक्य आहे? शिवाय पत्रकार काही पुण्यप्रसुन बाजपेयी सारखा नाही. किंवा आनंद तेलतुंबडे... चला इतरांसारखे साधनाने सहानुभूती दाखवली व "हे ही खरे आणि ते ही" अशी मिळमिळीत भूमिका घेतली. बर झाल बिचारे कामगारांची चेंगराचेंगरी झाली नाही शेवटी त्यांच्या जिवाची पर्वा तरी कोणाला आहे म्हणा

Kirtivardhan Tayde

खूपच छान सर ह्या प्रकारणातीक विस्तृत पाने एक एक मुद्द्यांची माहिती मिळाली.

प्रफुल्ल पवार

खोट्या, खोडसाळ, अर्धवट बातम्या देण्यासाठी ABP माझा प्रसिद्ध आहे. UPSC ने परिक्षा रद्द केल्याचीही चुकीची बातमी त्यांनी या प्रकरणा नंतर लगेचच दिली होती. आपली चूक ते कधीही मान्य करत नाहीत. २६/११ हल्ल्याचे थेट प्रसारण केल्याने इलेक्ट्रॉनिक मिडीयाला जेंव्हा लोकांनी धारेवर धरले होते त्याचेही खांडेकरांनी तोकडे समर्थन केल्याचे आपण वाचलेच असेल. भाजपला सहाय्यभूत ठरतील अशा बातम्या देण्यामुळे लोक त्यांना आता BJP माझा म्हणू लागलेत.

डॉ. दिलीप शिंदे

तटस्थ आणि परखड विश्लेषण... ' चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत आणि वाईटाला वाईट म्हणण्याचे धाडस आपल्याला दाखवता यायला हवे ' हे प्राचार्य पी बी पाटलांचे वाक्य आठवले.

डॉ.द. तु. पाटील

तुमचा लेख आवडला. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. चूक झाली असेल तर माफी मागितली पाहिजे. राहूल हे अभ्यासू आणि सामाजिक बांधिलकी मानणारे पत्रकार आहेत.

शिरीष पाटील

प्रश्न आहे तोआपले विवेचन चुकीचे आहे किंवा नाही हा नाही. वांद्रे पश्चिम लोकल स्टेशनात गर्दी का झाली? तेथुन कोणत्याच मेल एक्सप्रेस जात नाहीत.

Sanjay bagal

बरोबर किंवा चूक शोधण्यापेक्षा मजुरांचा उद्रेक उसळला असतात तर काहीही घडले असते. बातमी देताना दोन बाजू शोधून द्याव्यात.

ASHOK MULAY

बहिष्कार

Satish Shirsath

असे तटस्थ स्पष्टीकरण हवे. पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी विशेष

Bhagyashree Pethkar

अत्यंत संतुलित लेख.

Sandeep Patil

अचूक आणि तटस्थ विश्लेषण सर, या वाहिनीला चूक मान्य नाही परंतु आमचा कोणी कोणी समर्थन केले याचे ते दाखले देत होते. पत्रकार स्वभावाने चांगला, बातम्या चांगल्या देतो म्हणून एवढ्या मोठ्या केलेल्या चुकीला माफ केले पाहिजे असा काही जणांचा युक्तिवाद होता तो अतिशय अतार्तिक होता.

Mayur nandkishor patare

अगदीच वास्तवदर्शी सर, एखाद्या व्यक्तीची कारकिर्द कितीही प्रशंसनीय असेल तरीही... त्याच्या एका चुकीमुळे अनेकांच्या जिवावर बेतत असेल तर ती चूक नजरअंदाज करणे चुकीचेच.. आणि त्याचे समर्थन तर अयोग्यच...

Kumar Bobade

अगदी अचूक मुद्दे मांडलेत.राहुल सारख्या चांगल्या पत्रकाराने अशी चूक करावी याचे आश्चर्य वाटते. राहुलने 13 तारखेलाच ती बातमी पाठविली आणि वृत्तवाहिनीने 14 ला सकाळी 8 वाजता ती दाखवली, असे तर झाले नाही ना? असे असेल तर यामागे नक्कीच कोणाचे तरी कारस्थान असू शकते आणि कारस्थानी व्यक्ती प्रभावी असावा त्यामुळे आपली चूक मान्य करायला संपादक महाशय तयार नाहीत, असे दिसते.

R.P. Donde

You have in general spoken highly about ABP Maza channel and it's staff. I feel a little differently. Yesterday, government spokesperson, speaking about corona spread, told that rate of increase in of number of corona patients has come down by 40 per cent. However this channel was giving a news that number of corona patients has come down by 40 per cent ! Again about press conference by Reserve Bank Governor, he, among many other steps Reserve Bank proposes to take said that Bank has reduced reverse repo rate by .25 per cent. Reporting this ABP Maza announced interest rates on bank credit has become cheaper ! The channel is also giving news about corona spread in a frightening way.

Achyut Godbole

Very good article

Anup Priolkar

Thanks for good analysis of newes.it should be first priority of print & electronic media to maintain dignity of each sentence and word before sending to the public specially during such panic situation in the minds of every citizen. Because of your impartial analysis about the news and reacting by home department we are being updated about such incidence. Thanks

samir Gandhi

Balanced analysis of all sides.

डॉ अनिल खांडेकर

1. लेख नेहमी प्रमाणे संयमित शब्दांत लिहिला आहे. 2. आशयाशी सहमत .

Add Comment