वास्तवाला भिडणारा आशावादी चित्रपट

'आता थांबायचं नाय!' चित्रपटाचे परीक्षण

या चित्रपटाबरोबर एक हिंदी, एक दक्षिणात्य व एक ‘ट्रेंड’मधला मराठी असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. अजय देवगणच्या चित्रपटाबरोबर चित्रपट प्रदर्शित करणे हे अत्यंत धाडसाचे काम आहे. पण आपल्या कलाकृतीच्या दर्जावर आणि सुजाण प्रेक्षकांच्या अभिरुचीवर विश्वास असल्यानेच बहुतेक चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे धाडस केले असावे. प्रेक्षकांनी हा विश्वास सार्थ ठरवलेला आहे. साधारणपणे मराठी चित्रपटाला जिथे चित्रपटगृह 25-30 टक्के भरलेले असते, तिथे हा चित्रपट प्रेक्षागृहात क्षमतेच्या 75 टक्के गर्दी गोळा करतो आहे. 

तसं पाहायला गेलं तर मराठी चित्रपटांना चांगले दिवस आहेतही आणि नाहीतही. चांगले दिवस यासाठी की, प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांची संख्या खूप आहे पण त्याचवेळी दर्जात्मक, कलात्मक व अभिजातता जपणारे मराठी चित्रपट खूप कमी व अपवादाने येत आहेत. दक्षिणात्य चित्रपटांचा विचार केला तर ही कलासक्तीची उणीव प्रकर्षाने जाणवते. तशातच मराठी चित्रपटसृष्टीचा ‘ट्रेंड’ तयार झालेला आहे तो म्हणजे लग्न व त्या अनुषंगाने येणाऱ्या घटना दाखवणे, एकाच बाजाच्या ग्रामीण प्रेमकथा दाखवणे किंवा परदेशातल्या नयनरम्य ठिकाणी चित्रीकरण करून त्याला अनुरूप कथासूत्र रचून तिथे होणारी धमालमस्ती दाखवणे. विनोद हा आवश्यकच असतो पण त्याचे हास्यास्पद प्रदर्शन झाले तर चित्रपट नावाच्या माध्यमाकडे गांभीर्याने पाहणे कमी होत जाते. 

‘आता थांबायचं नाय’ हा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा एकाच वेळी ‘ट्रेंड ब्रेकर’ आणि ‘ट्रेंड सेटर’ आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. सन 2016 मध्ये मुंबई महापालिकेच्या 23 चतुर्थ श्रेणी (जास्त करून सफाई, नाले सफाई करणारे) कर्मचाऱ्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली ही घटना मध्यवर्ती ठेवून त्या अनुषंगाने घडलेल्या, घडणाऱ्या घटना दाखवून त्या घटनांचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, मानवी आयाम लक्षात घेऊन त्यावर परखड भाष्य करणारा हा चित्रपट आहे. 

चित्रपटाची सुरवात होते तेव्हा प्रेक्षकांना manhole च्या कट्ट्यावर बसलेले सफाई कर्मचारी दिसतात; पण manhole च्या आतून. आपण कायम या कर्मचाऱ्यांना manhole च्या आत कट्ट्यावरून किंवा रस्त्यावर उभे राहून पाहिलेले असते, त्यांना काम करताना, दारू पिताना पाहून मध्यमवर्गीय सुस्कारादेखील सोडलेला असतो. (उच्च मध्यमवर्गीय/श्रीमंत लोकांना सुस्कारा सोडण्या इतकादेखील वेळ नाही) इथे जागा विरुद्ध होतात. आपण manhole मधून या कर्मचाऱ्यांना पाहतो आणि पहिल्याच दृश्यातून मधमवर्गीय जाणीवांना तडाखा बसतो. हे ड्रेनेज तुंबलेले असते आणि ते कशामुळे तुंबले असेल यावर या कर्मचाऱ्यांची चर्चा चाललेली असते. एक अनुभवी कर्मचारी सांगतो की, एखाद्या गोलाकार वस्तूमुळे ड्रेनेज तुंबले आहे. त्यांची पैजसुद्धा लागते. त्याच वेळी बाजूच्या उच्चभ्रू सोसायटीचा झेंडावंदनाचा कार्यक्रम या तुंबलेल्या ड्रेनेजमुळे रखडलेला असतो. त्यामुळे या दोन ‘वर्गां’मध्ये हुज्जतदेखील होते.

या दृश्यात्मकतेतून काय दिसते, तर समाजातील आहे रे – नाही रे वर्गांतील दरी, भारत – इंडिया यातील विरोधाभास, अभिजनांचे एकारलेपण आणि समाजापासूनचे तुटलेपण, त्यांचे संवेदनाहीन असणे,पण प्रतीकात्मकतेत अडकलेले असणे.

चित्रपट पुढे सरकतो.

या चित्रपटाला एकच नायक किंवा नायिका नाही. मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी याचे सामूहिक नायक/नायिका आहेत. हे कर्मचारी ज्या विभागात कार्यरत आहेत, त्या विभागात एक कर्तव्यदक्ष, संवेदनशील सहायक आयुक्त आहे. त्यांच्या लक्षात येते की आपले कर्मचारी दहावी पास नाहीत. त्यामुळे तो अशा काही कर्मचाऱ्यांची यादी करून त्यांच्यासाठी रात्रशाळेची व्यवस्था करतो व त्यांना दहावी उत्तीर्ण करण्याचे फर्मान सोडतो. 

या आदेशामुळे या कर्मचाऱ्यांचा रोजच्या जगण्याचा जो संघर्ष सुरु असतो त्यात आणखी एका नवीन आघाडीवरचा संघर्ष सुरु होतो. हा संघर्ष ते कसा करतात, त्यांना काय अडचणी येतात? त्यावर ते कशी मात करतात हे पडद्यावर पाहणे योग्य ठरेल. 

सुरुवातीला केवळ साहेबांच्या आदेशामुळे किंवा मिळणाऱ्या अतिरिक्त भत्त्यामुळे शिकण्यास नाखुशीने  तयार झालेले हे सफाई कर्मचारी शिक्षणाचे महत्व कसे ओळखतात, त्यांचे आत्मभान कसे जागृत होते, त्यांच्या नीरस, कंटाळवाण्या जगण्याला एक ध्येय जोडले गेल्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय परिवर्तन होते, त्या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांना मिळालेल्या तरुण ध्येयवादी शिक्षकाची, त्यांच्या कुटुंबियांची भूमिका काय असते, त्यांच्यामध्ये बंध कसे निर्माण होतात हे दाखवण्यासाठी निवडलेल्या घटना व त्यांची गुंफण विलक्षण आहे.

विषयाला एक प्रकारे वर्गसंघर्षाचा देखील आयाम आहे. तरीही या चित्रपटात आक्रमकता, अतिरंजितता, अतिभावनिकता, मोठमोठे उपदेशाचे डोस असलेले संवाद येत नाहीत. छोट्या छोट्या प्रसंगांतून चित्रपट प्रेक्षकाच्या विचार प्रक्रियेला चालना देत राहतो. उदाहरणार्थ  एका प्रसंगात शाळेमध्ये नालेसफाई कर्मचाऱ्याच्या हातात नवे कोरे शालेय पुस्तक येते. तो त्या पुस्तकाचा कोरा करकरीत वास घेतो आणि त्याच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव उमटतात. सदैव मैलापाण्याचा वास घेणे ही जगण्यातील अपरिहार्यता ठरलेल्या या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आशेचा एक किरण आलेला असतो. जो आशय मांडायला स्क्रिप्टची एक-दोन पाने, 20-25 संवाद आणि साधारण पाच मिनिटे लागू शकतील तो आशय हे केवळ पाच सेकंदाचे दृश्य परिणामकारकपणे मांडते.  

दुसऱ्या एका दृश्यात मुंबई महापालिकेचा जपानच्या कंपनीशी सहकार्य करार होत असतो. त्या कंपनीच्या सफाई मशीनचा ‘डेमो’ सुरू असतो. तेव्हा एक नालेसफाई कर्मचारी सहायक आयुक्तांच्या लक्षात आणून देतो कि ही मशीन जशीच्या तशी उपयोगात आणता येणार नाहीत कारण मुंबईची परिस्थिती भिन्न आहे, आणि हे विधान करताना त्याने तांत्रिक अभ्यास केलेला असतो. त्यावर आयुक्त तात्काळ प्रतिक्रिया देत नाहीत पण पुढच्याच दृश्यात मुंबई महापालिकेचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी जपानी कंपनीच्या सी.ई.ओ.बरोबर बरोबरीच्या नात्याने चर्चा करताना दिसतो. अतिशयोक्त न वाटणारा हा प्रसंग ज्या पद्धतीने चित्रित केला आहे त्याला तोड नाही. हा प्रसंग घडवून आणण्यामागची सहायक आयुक्तांची ‘माणसाच्या ज्ञानाला त्याची श्रेणी, वर्ग, वर्ण, स्तर या सर्व भेदांपासून मुक्त करून किंमत देण्याची’ भूमिकादेखील दिसते.

ही सत्यघटना असल्यामुळे, ‘हे कर्मचारी दहावी पास होणार’ हे प्रेक्षकाला माहीत असते पण तरी तो त्या दहावी पास होण्याच्या म्हणजेच आत्मभान जागृत होण्याच्या व ध्येयपूर्तीच्या प्रवासात सहभागी होतो. आणि एका क्षणी तो प्रवास त्या प्रेक्षकाचादेखील होऊन जातो. ध्येय महत्वाचे असतेच पण ध्येयपूर्तीसाठी केलेला प्रवास महत्वाचा असतो याचे सूचन हा चित्रपट करतो. 

या चित्रपटाचे तंत्राच्या, मांडणीच्या अंगाने विवेचन करताना असे म्हणावे लागेल की, या चित्रपटाचा बाज विनोदी आहे. पण हा बाज केवळ ट्रेंड म्हणून निवडलेला नाही. एखाद्या विषयावर गांभीर्याने भाष्य करण्याची ताकद विनोदात जेवढी असते तेवढी कशातच नसते. त्यामुळे हा विनोदी बाज परिणामकारतेमुळे निवडलेला आहे. हा विनोद कधी खुसखुशीत आहे, कधी उपरोधिक आहे, कधी निखळ आहे आणि मुख्य म्हणजे तो कसाही असो, अंतर्मुख करणारा आहे. 

या चित्रपटात आशुतोष गोवारीकर (सहायक आयुक्त), भरत जाधव (नाले सफाई कर्मचारी), सिद्धार्थ जाधव (पाणीपुरवठा कर्मचारी), ओम भुतकर (शिक्षक) अशा अनेक तगड्या कलाकारांची मांदियाळी आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची शैलीही भिन्न आहे. भरत जाधव व सिद्धार्थ जाधव यांना आपण विनोदी भूमिकांसाठी आणि कायिक अभिनयासाठी ओळखतो पण या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला विविध कंगोरे आहेत. परिस्थितीसमोर हतबल झालेले ते आत्मभान जागृत झालेले असा ग्राफ त्यांनी उत्तम साकारला आहे. आशुतोष गोवारीकर यांनी कर्तव्यदक्ष, सहृदय अधिकारी अचूकपणे साकारला आहे.


हेही वाचा - सामाजिक स्थित्यंतरे आणि हिंदी चित्रपट (मेघनाद कुळकर्णी)


सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. त्यात ओम भुतकरचा विशेष उल्लेख करावा लागेल. ध्येयवादी शिक्षक साकारताना त्याने आपल्या अभिनयाचा बाज, आवाजाचा पोत, संवादफेक, देहबोली यावर प्रचंड मेहनत घेतली आहे. ‘मुळशी पॅटर्न’ असो, ‘श्यामची  आई’ असो, की सुखनचे प्रयोग असोत, त्याच्या डोळ्यात कलाकार म्हणून कायम जो सच्चेपणा दिसतो तो या शिक्षकाच्या भूमिकेला साजेसा असाच आहे. दीपक शिर्के यांचा अभिनय हे सरप्राईझ पॅकेज आहे.

शिवराज वायचळ या तरुण व होतकरू कलाकाराचा हा पहिलाच दिग्दर्शकीय चित्रपट आहे. शिवराजने अभिनेता म्हणून मोजकेच पण चांगले काम केले आहे. ‘वेडिंगचा शिनेमा’चा नायक, ‘स्लम गोल्फ’ या वेबसीरीजमधील नकारात्मक छटा असलेली भूमिका, प्रायोगिक-व्यावसायिक नाटके, राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शन अशी त्याची कारकीर्द राहिलेली आहे. रंगभूमीची पार्श्वभूमी असलेल्या शिवराजसारख्या कलाकारांची तंत्रावर हुकूमत असते, मांडणीची दिशा स्पष्ट  असते आणि मुख्य म्हणजे, निर्मितीमूल्य उच्च दर्जाचे व कलेशी बांधिलकी प्रामाणिक असते त्यामुळेच त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न वाखाणण्या जोगा आहे. पहिल्याच चित्रपटासाठी one liner कथा निवडणे, आशुतोष गोवारीकरसारख्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व ऑस्करपर्यंत मजल मारलेल्या दिग्दर्शकाला पहिल्याच चित्रपटात ‘कास्ट’ करणे आणि ‘तिरंगा’सारख्या चित्रपटात गेंडास्वामीसारखी व्यक्तिरेखा केलेल्या दीपक शिर्केंकडून आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठिंबा  देणारा मनस्वी बाप साकार करून घेणे, या सर्वांसाठी कौशल्य व आत्मविश्वास दोन्ही आवश्यक असते.. 

दिग्दर्शकाला कथेचे प्रथम ‘दर्शन’ व्हावे लागते, मग त्याचे आकलन व्हावे लागते, त्यानंतर स्वत:मधील सर्जनशीलतेला आवाहन करावे लागते आणि हे सर्व झाल्यांनतरच दिग्दर्शनाचे आव्हान स्वीकारावे लागते.

वर उल्लेख केल्याप्रमाणे सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम होण्यात दिग्दर्शकाचा मोठा वाटा आहे. लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे शिवराजचे दिग्दर्शकीय कौशल्य असे आहे की, सर्व कलाकारांचा अभिनय परस्परपूरक ठरतो व कथासूत्राशी एकजिनसीपणे मिळून येतो.

या चित्रपटातील प्रत्येक पात्राची स्वतंत्र अशी कथा आहे. अशा वेळी अनेक चित्रपटांत अडचण अशी होते की, चित्रपट संथ होतो, पटकथा विस्कळीत होते व मुख्य कथासूत्रापासून चित्रपट भरकटत जाण्याची शक्यता निर्माण होते. पण इथे तसे झालेले नाही. प्रत्येक पात्राचा ग्राफ इतका अचूक आहे, पटकथा इतकी काटेकोर आहे की, प्रत्येक स्वतंत्र कथा नदीला ओहोळ जसे मिळतात त्याप्रमाणे स्वत:चे अस्तित्व राखतानाच मुख्य कथेशी एकजीव होऊन जाते. 

गेल्या काही वर्षांत दिग्दर्शकाची भूमिकाआमूलाग्र बदलली आहे. दिग्दर्शकाला चित्रपटाशी संबंधित विविध विभागांत समन्वय ठेवायचेदेखील काम करावे लागते. उदाहरणार्थ संकलक संकलन करतो पण ते कसे करावे हे दिग्दर्शक सांगत असतो, स्वत:च्या मनातील दृश्य पडद्यावर कसे दिसले पाहिजे याच्या योग्य सूचना त्याला छायाचित्रकाराला द्याव्या लागतात. या चित्रपटाचे कथा, पटकथा, छायाचित्रण, संकलन इतके सफाईदारपणे केलेले आहे की, शिवराजचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे यावर विश्वास बसत नाही.

सर्वच बाजू जमेच्या आहेत. फक्त चित्रपटाच्या संगीतावर अधिक लक्ष देता आले असते, असे वाटते, तसेच शिक्षकाची प्रेमकहाणी नसती तरी चालले असते असे वाटते.

या चित्रपटाबरोबर एक हिंदी, एक दक्षिणात्य व एक ‘ट्रेंड’मधला मराठी असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. अजय देवगणच्या चित्रपटाबरोबर चित्रपट प्रदर्शित करणे हे अत्यंत धाडसाचे काम आहे. पण आपल्या कलाकृतीच्या दर्जावर आणि सुजाण प्रेक्षकांच्या अभिरुचीवर विश्वास असल्यानेच बहुतेक चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे धाडस केले असावे. प्रेक्षकांनी हा विश्वास सार्थ ठरवलेला आहे. साधारणपणे मराठी चित्रपटाला जिथे चित्रपटगृह 25-30 टक्के भरलेले असते, तिथे हा चित्रपट प्रेक्षागृहात क्षमतेच्या 75 टक्के गर्दी गोळा करतो आहे.

एखादा चित्रपट चांगला आहे की नाही हे ठरवण्याचा अत्यंत साधारण निकष म्हणजे चित्रपट पाहताना वेळ कसा गेला हे कळते की  नाही. हा चित्रपट पाहताना वेळ कसा गेला हे समजत नाही. या चित्रपटाला मध्यांतर नसते तर (तिकीट काढताना ‘कॉम्बो मील बुकिंग’ केलेले प्रेक्षक सोडून) ते प्रेक्षकांच्या लक्षात देखील आले नसते इतकी जबरदस्त पकड हा चित्रपट पहिल्या दृश्यापासून घेतो. प्रेक्षकाला हसवत, दुखवत, अंतर्मुख करत खुर्चीला खिळवून ठेवतो. जर चित्रपट संपताना तुमच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या असतील तर ते तुमच्यातील माणूसपण जागृत असल्याचे लक्षण आहे.

2016मध्ये जेव्हा ही 23 कर्मचार्यांनी दहावी उत्तीर्ण होण्याची घटना घडली तेव्हा माध्यमांनी ‘Miracle 23’ असा मथळा दिला होता. सवंग लोकप्रियतेच्या आहारी गेलेल्या, प्रोपोगांडाप्रधान चित्रपटांच्या सध्याच्या वादळी भाऊगर्दीत वास्तवाशी फारकत न घेता जीवनाला भिडणारा हा चित्रपट अमनधपक्या आलेल्या थंड हवेच्या सुखद झुळूकेप्रमाणे एक miracle वाटतो.

मूल्यं व व्यवस्थेचा होत असलेला ऱ्हास, विविध कारणांमुळे माणसामाणसांत येणारे दुरावलेपण, समाजात निर्माण झालेली तेढ व दुभंग यांमुळे सध्याचा भवताल हा काळवंडलेला व निराशाजनक झालेला आहे. अशा वेळी माणसाची माणूस म्हणून प्रतिष्ठा महत्वाची असल्याचे सांगणारा, परस्परसहकार्य, बंधुभाव यांवर आधारित निकोप मानवी संबंधांची गरज प्रतिपादित करणारा, समता व सामाजिक न्याय हीच शाश्वत व चिरंतन मूल्ये आहेत आणि त्यांच्यावर कितीही आघात झाले, संकटे आली तरी ती मूल्ये नष्ट  होणारी नाहीत, असा आशावाद संयतपणे, पण भिडस्त वृत्तीने जागृत करणारा हा चित्रपट मैलाचा दगड (milestone) ठरतो.


आता थांबायचं नाय!
निर्मिती -
निधी परमार-हिरानंदानी, धरम वालिया, भावेश जानवलेकर, उमेशकुमार बंसल
दिग्दर्शन - शिवराज वायचळ
अभिनय - आशुतोष गोवारीकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, प्रवीण डाळिंबकर, दीपक शिर्के, पर्ण पेठे, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे


- मकरंद ग. दीक्षित
meetmak23@gmail.com

(लेखक, संगणक अभियंता असून ‘स्पार्क फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षण, रोजगार व जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)

 

Tags: marathi movie marathi movie review movie review ata thambaycha nay om bhutkar shivraj vaichal bharat jadhav siddharth jadhav ashutosh govarikar आशुतोष गोवारीकर सिद्धार्थ जाधव भारत जाधव ओम भुतकर शिवराज वायचळ भरत जाधव आता थांबायचं नाय सफाई कामगार मुंबई कामगार मुंबई महापालिका बृहन्मुंबई महानगरपालिका नालेसफाई सफाई दहावी परीक्षा miracle 23 मिरॅकल 23 शिक्षण रात्रशाळा Load More Tags

Add Comment

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/ https://ojsstikesbanyuwangi.com/ https://ejournal-uniqbu.ac.id/ https://revistas.uca.es/index.php/hachetetepe https://revistas.uepg.br/index.php/olhardeprofessor