खैरलांजी ते हाथरस व्हाया इंडियन आयडॉल...

अत्याचाराच्या अशा घटना शतकानुशतके होत आलेल्या आहेत.

फोटो सौजन्य: Shankar Narayan/HT PHOTO

सर्वाधिक टीआरपी असलेल्या एका प्रसिद्ध टीव्ही चॅनेलवरील, जगभरातून प्राधान्याने पाहिल्या जाणाऱ्या कार्यक्रमांपैकी एक म्हणजे इंडियन आयडॉल. या गायन स्पर्धेत देशभरातून लाखो युवकयुवती सहभागी होतात. त्यांची ऑडिशन घेतल्यानंतर त्यातून अगोदर 40 आणि त्या चाळीसमधून उत्तम 10 आणि नंतर त्या दहांमधून सर्वोत्तम तीन आणि शेवटी सर्वश्रेष्ठ नवोदित गायक अशी निवड केली जाते. यामध्ये परीक्षकांच्या पसंतीसह प्रेक्षकांची पसंतीही विचारात घेतली जाते. 2004पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा 2018मध्ये आलेला दहावा सीझन एका वेगळ्याच कारणासाठी गाजला होता. 

हाथरसच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या उत्तरप्रदेशातील लाखीमपूर खिरी या गावातून एक होतकरू मुलगा या स्पर्धेत सहभागी झाला होता. अत्यंत गोड गळा, खणखणीत आणि तितकाच श्रवणीय आवाज असलेल्या या मुलाची टॉप दहामधून अचानक गच्छंती झाली. परीक्षकांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला. इतका गोड आवाज असलेल्या या मुलाचा आवाज अचानक प्रेक्षकांना कडू वाटू लागला... त्याला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या पसंतीच्या मतात अचानक कमालीची घट झाली होती. आमिर खानसारख्या आघाडीच्या नायकासाठी गाणे गाऊ पाहणाऱ्या या पोराला आपले स्वप्न अर्ध्यावर सोडून आपल्या गावाला परतावे लागले. 

त्या मुलाचे नाव सौरभ वाल्मीकी! ‘तू गातोस उत्तम पण तुझ्यात आत्मविश्वासाची खूपच कमतरता आहे. इतके प्रयत्न करूनही तुझ्यात आम्हाला अपेक्षित बदल का दिसत नाहीत?’ असे परीक्षकांनी त्याला विचारल्यावरही तो गप्प राहायचा. पण एकदा त्याच्या आवडीचे गायक पाहुणे-परीक्षक म्हणून आल्यावर त्यांनाही ही बाब जाणवली आणि त्यांनीही याच विषयाला हात घातल्यावर मात्र त्याला त्याचे अश्रू रोखणे कठीण गेले आणि त्याने त्याच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आपली व्यथा मांडताना तो म्हणाला, ‘मी आमच्या गावातल्या शुद्रातिशूद्र जातीतला आहे. आमच्या गावात खूप भेदभाव आहेत. सवर्ण जाती आम्हाला खूप वाईट वागणूक देतात. आम्हांला शिवूनही घेत नाहीत. आजही आमच्यासाठी चहाची, जेवणाची वेगळी भांडी आहेत. आम्हाला सार्वजनिक पाणवठ्याला शिवण्याचा अधिकार नाही. पाणी न्यायचे असेल तर कुणीतरी सवर्ण पाणवठ्यावर आल्यावर त्याला वाटलं तर तो आमच्या भांड्यात वरून पाणी ओततो. चुकून स्पर्श झाला किंवा नियम मोडला तर मारहाण, शिवीगाळ होते. कलागुणांबाबत उजवा असूनही मला तशीच वागणूक मिळाली. आपली कलाकौशल्यं दाखवायचा प्रयत्न केला तरी मला माझ्या जातीची आठवण करून दिली जाते... त्यामुळे माझ्यात आत्मविश्वासाची खूप कमतरता आहे. इथं मात्र खूप चांगलं वातावरण आहे. सगळ्या जातिधर्मांचे स्पर्धक आहेत. कुणी माझ्याशी वाईट वागत नाही... पण अपमानाची इतकी सवय झालीय की, कुणी मान दिल्यावर अवघडल्यासारखं होतं.’  

साहजिकच सगळ्या स्पर्धकांच्या आणि परीक्षकांच्या डोळ्यांत पाणी आलं. यातील भावनिक राजकारणाचा आणि चॅनलच्या टीआरपीचा मुद्दा बाजूला ठेवला तर उत्तरप्रदेशातील आणि संपूर्ण देशातील जातवास्तव डोळ्यांसमोर उभे  राहते; जे नाकारणे अशक्य आहे... कारण त्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून त्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि त्यांची पसंती या दोन्हींत कमालीची घट झाली आणि त्याला किमान टॉप फाईवमध्ये बघणाऱ्या परीक्षकांना आश्चर्याचा धक्का देत सौरभ वाल्मीकी टॉप टेनमधूनच बाहेर फेकला गेला. यातील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे उत्तर प्रदेशाबरोबरच हिंदी पट्ट्यातील सर्व राज्यांसह ज्या शहराच्या नावाने मनोरंजन सृष्टी ओळखली जाते त्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून सौरभ वाल्मीकीला मिळणारी पसंतीची मते मोठ्या प्रमाणात घटली. 

सौरभ वाल्मीकीचे गाव म्हणजे लाखीमपूर खिरी... हे एक जिल्ह्याचे ठिकाण आहे. म्हणजे मोठे शहर आणि त्यातही तो उत्तरप्रदेशमधील अत्यंत प्रतिष्ठित आणि देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सतत चर्चेत असलेल्या लखनौ विभागात मोडणारा जिल्हा. साहजिकच इथे जरा काही खुट्ट झाले की  त्याचे पडसाद देशभर उमटतात. इंडियन आयडॉलमधून हा मुलगा घरी परतल्यानंतर देशाची, राज्याची, जिल्ह्याची आणि गावाची माफी मागणारा त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा एक व्हिडिओ प्रसारमाध्यमांनी प्रसारित केला. काही हिंदी वृत्तवाहिन्यांनी त्याचे थेट प्रसारण आणि वृत्तपत्रांनी वार्तांकनही केले. 

‘आमचा मुलगा टीव्हीवरील कार्यक्रमात जे काही बोलला ते खोटे होते. संबंधित वाहिनीने आपला टीआरपी वाढावा म्हणून त्याच्याकडून तसे वदवून घेतले.’ असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. आमच्याबाबत कधीही असे घडलेले नाही. आम्हाला गावात खूप चांगली आणि सन्मानाची वागणूक मिळते असे सांगून, आपला मुलगा जे काही बोलला त्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय असा आरोप त्याच्या परिजनांनी इतरांवर केला. नंतर या प्रकरणावर पडदा पडला आणि आमिर खानसारख्या अभिनेत्यासाठी कुमार शानू या प्रथितयश गायकासारखी उत्कृष्ट गाणी गाण्याच्या त्याच्या स्वप्नांचे काय झाले ते आजपर्यंत कोणाला कळलेले नाही. 

'आमच्या मुलाकडून चूक झाली आणि आता त्याने माफीही मागितली आहे. त्याला पसंतीची मते द्या.’ असे आवाहन त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी करूनही अपेक्षित परिणाम साधला गेला नाही. प्रत्येक घटनेकडे सहजतेने पाहणाऱ्यांना ही बाब कदाचित तितकी गंभीर वाटणार ही नाही... पण भारतातील जातवास्तव लक्षात घेऊन त्याबाबत विचार केल्यास त्याचे गांभीर्य जाणवते. अर्थात त्यासाठी माणूस म्हणून आपल्या जाणिवा तितक्या प्रगल्भ हव्यात.

त्याच प्रगल्भतेतून याकडे पाहिल्यास यामागची मानसिकता लक्षात यायला मेंदूवर फार जोर द्यायची गरज पडणार नाही... त्यामुळे 'आम्ही ठेवू तसेच राहायचे आणि त्याबाबत कोठेही 'ब्र' उच्चारायचा नाही. नाहीतर तुमची खैर नाही. तुम्हाला वाळीत टाकले जाईल, तुम्हांला मारहाण केली जाईल, तुमच्या आईबहिणीची आणि घरातील इतर स्त्रियांची अब्रू लुटली जाईल आणि तरीही तुम्ही नमला नाहीत तर तुमचा नियोजनबद्धरीत्या खून पाडला जाईल.' ही इथल्या वर्ण-जातव्यवस्थेने घालून दिलेली चाकोरी आहे. ती तोडू पाहिल्यास किंवा तिला आव्हान द्यायचा प्रयत्न केल्यास तुमचा जसा सौरभ वाल्मीकी होऊ शकतो तसेच तुम्ही स्त्री आणि त्यातही दलित असाल तर तुमची मनीषा वाल्मीकी होऊ शकते... मग तुमचे राज्य कोणतेही असो. 

अत्याचाराच्या अशा घटना शतकानुशतके होत आलेल्या आहेत. हाथरसच्या प्रकरणाने हे सगळे पुन्हा अधोरेखित केले आहे. या अत्याचारात बळी पडलेल्या मुलीला उपचारासाठी अगोदर ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेथील वैद्यकीय चाचणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा अहवाल त्या रुग्णालयाने दिला आणि तिची अवस्था आणखी बिकट झाल्यावर तिला तिथून तातडीच्या उपचारांसाठी दिल्ली येथील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. (एम्समध्ये उपचार मिळाले असते तर कदाचित ती वाचली असती.) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आयाम लाभलेल्या या शहराने हा अत्याचार चव्हाट्यावर आणला म्हणून त्याची दखल तरी घेतली गेली. अन्यथा संपूर्ण भारतभर महिलाअत्याचाराचे रोज असे कितीतरी गुन्हे घडतात ज्यांची नोंदही घेतली जात नाही. त्यातही अत्याचारग्रस्त महिला सवर्ण असेल तर दलित महिलेपेक्षा ती जरा सुदैवी असते. अत्याचारग्रस्त महिला कोणत्या जातीची किंवा धर्माची आहे हे पाहून अत्याचाराची दखल घेण्यातला हा जो फरक आहे तो आपण फूलनदेवी ते मनीषा वाल्मीकी व्हाया खैरलांजी-निर्भया-कोपर्डी अशा कितीतरी प्रकरणांमधून पाहिलेला आहे. 

'गुन्हेगाराला जात नसते' असे म्हणणारे अनेक जण गुन्हेगार आपल्या जातीचा आहे म्हटल्यावर बचावात्मक पवित्रा घेतात. त्यातच अजूनही जातपंचायतीत आणि टोळीयुद्धात अडकून पडलेल्या सरंजामशाहीचे प्रतीक असलेल्या या हिंदी पट्ट्याचे वैचारिक दारिद्र्य असे की, हाथरस अत्याचार प्रकरणातील चारही आरोपी सवर्ण आहेत म्हणून त्यांच्या सर्मथनार्थ मोर्चे काढण्याची तयारी, त्या गावातील आणि आसपासच्या गावातील सवर्ण जातींनी केली. त्यासाठी हाथरसच्या पंचक्रोशीमधील गावांतील सर्व सवर्ण जातींचे (ब्राह्मण, राजपूत आणि ठाकूर) लोक एकत्र आले. त्यांची स्थानिक माजी आमदाराच्या घरी सभा पार पडली आणि आरोपींना समर्थन द्यायचा निर्णय एकमुखाने झाला. 

याच्याअगोदर याच राज्यातील एका अत्याचार-प्रकरणात सवर्ण आरोपींना फाशीची शिक्षा देऊ नये म्हणून न्यायालयात शिक्षेची सुनावणी सुरू असताना न्यायालयाबाहेर संबंधित न्यायाधीशांविरुद्ध निदर्शने चालू होती. आरोपी ब्राह्मण असेल तर त्याला शिक्षा द्यायचा अधिकार न्यायालयाला नाही असे या निदर्शने करणाऱ्यांचे मत. या उदात्त (?) विचाराबरोबरच 'तरुण वयात मुलांकडून अशा चुका होतातच, मुलीच्या जातीने घराबाहेर पडू नये, पालकांनी मुलीला चांगले संस्कार द्यावेत, दलित मुली सवर्ण मुलांना बदनाम करण्यासाठी आणि सरकारकडून पैसे आणि इतर मदत मिळवण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करतात, मुलींनी पूर्ण कपडे घातले पाहिजेत, टंच कपडे घालू नयेत, रात्रीबेरात्री घराबाहेर पडू नये, दलित असेच असतात त्यामुळे त्यांना असेच वागवले पाहिजे', हे आणि यांसारखे कितीतरी भाकड नियम आणि युक्तिवाद याच पट्ट्यातील.

छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आणि आंबेडकर यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक सवर्ण गणंगांनाही संस्कृतीच्या नावाखाली अधूनमधून याची भुरळ पडते हेही तितकेच दुर्दैवी... म्हणून खर्डा, जवखेडा आणि खैरलांजी यांसारख्या व्यक्त-अव्यक्त प्रकरणांची मोठी यादी आजही इथे आपल्याला दिसून येते. 

हाथरस प्रकरणात नेहमीप्रमाणे शासनाची, प्रशासनाची आणि पोलिसांची बाजू संशयास्पद ठरत आहे. दलितांवरील अत्याचारांच्या प्रकरणांची दखलच घ्यायची नाही, दखल घ्यावीच लागली तर त्यात ॲट्रोसिटीची आणि फौजदारी गुन्ह्याची कलमे लागणार नाहीत याची खबरदारी सर्वांनी मिळून घ्यायची. अत्याचारग्रस्त माणसे चिवट संघर्ष करतील असे वाटले आणि गुन्हे दाखल करायची वेळ आलीच तर त्यांच्यावरही चोरीचे, खंडणीचे, दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल करायचे ही जुनी रीत थोड्याफार फरकाने भारतभर लागू आहे. त्यात उत्तरप्रदेशसारखे वैचारिक दारिद्र्य असलेले राज्य मागे असण्याची शक्यता अजिबात नाही. 

अत्याचाराचे एखादे प्रकरण आपल्या अंगलट येतेय याची जाणीव झाली की प्रत्येक सत्ताधारी करतो तेच योगी आदित्यनाथ यांनी केले. मुळात योग्याचा धर्म वैराग्याचा असतो... कोणत्याही सत्तेचा आणि आर्थिक बाबींचा मोह न बाळगता ऐहिक जीवनाचा त्याग करणे हे योगी जीवनाचे वैशिष्ट्य... पण या सगळ्या त्यागाचे वावडे असलेल्या या योगींची हिंदू युवा वाहिनी नावाची एक संघटनाही होती. हिंदुत्वाचा ठेका आमच्याकडेच आहे असे समजणाऱ्या अनेक संघटनांपैकी ही एक. उत्तरप्रदेशमध्ये भाजपला सत्ता मिळवून देण्यात आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्यात या संघटनेचा तितकाच मोठा वाटा. साहजिकच त्याची किंमत वसूल करण्याकरता निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होण्यासाठी योगींच्या या संघटनेने घातलेला धुडगूस बघून सर्व मौर्यवंशियांसह मोदीही चाट पडले आणि केशव प्रसाद मौर्यासारखा माणूस बाजूला सारून, विरक्त पुरुष म्हणवून घेणाऱ्या या योगींचा राज्याभिषेक मोदींना नाइलाजाने करावा लागला. 

योगींचा धार्मिक आक्रस्ताळेपणा इतका की, हिंदुत्वाबाबत त्यांनी मोदी, भाजप आणि संघ... तिन्हींवरही मात केली. त्यांच्या या संघटनेचा उच्छाद निवडणुकीत लाभदायक ठरल्यानंतर भविष्यात ती संघाला आव्हान देईल हे लक्षात आल्यावर, मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात ही संघटना योगींनी बंद करावी ही भाजपने योगींना घातलेली एकमेव अट. ती सध्यातरी त्यांनी पाळलेली दिसते, पण कार्यकर्ते अजूनही सक्रिय आहेत. मुस्लिमांचा आवाज दाबल्यानंतर हे आता दलित समाजाच्या मागे लागले आहेत... पण हा सगळा आक्रमकपणा आपल्याला महागात पडणार हे लक्षात आल्यावर सावध झालेल्या मोदींनी, आपल्या खुर्चीला यांनी आव्हान देऊ नये म्हणून गोरखपूर (हा योगींचा मतदारसंघ) आणि फुलपूर या हिंदुत्ववाद्यांचा गड असलेल्या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत (होय, मोदी-शहा, संघ, भाजप यांनीच) भाजपच्या या उमेदवाराचा दारुण पराभव घडवून आणला आणि योगींचे विमान जरा जमिनीवर आणले. 

अशा योगींना एका दलित मुलीच्या बाजूने संपूर्ण देश उभा राहिलेला थोडेच सहन होणार आहे... त्यातही आरोपी सवर्ण आणि योगींचे जातभाई. (एरवी मतांचे आणि धार्मिक राजकारणापुरते दलितांना हिंदू मानणाऱ्या संघासह एकाही हिंदुत्ववादी संघटनेने याबाबत चकार शब्द काढलेला नाही.) मग त्यांच्या हाताखालील प्रशासन आणि पोलीसयंत्रणा, दोन्ही पीडितेच्या आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या पाठीमागे हात धुऊन लागले. मुलीचे शव कुटुंबाच्या ताब्यात न देता अर्ध्या अंधाऱ्या रात्री पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार करून टाकले. (या घटनेची सुनावणी सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयात सुरु आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने या कृत्यासाठी योगी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.)

मुलीच्या कुटुंबाला पैसे हवे आहेत, त्यांना विरोधी पक्षाची फूस आहे, मुलीवर बलात्कार झालाच नाही, मुलीचे आरोपींशी अगोदर बोलणे सुरू होते असल्या कंडया पोलीसयंत्रणेने आणि तपास अधिकाऱ्यांनी पिकवायला सुरुवात केली. काही सरकारप्रेमी वृत्तवाहिन्यांनी त्याचे अहोरात्र प्रक्षेपण घडवून आणले. यामागची मानसिकता काय? तर दलित हे असेच असतात. त्यांना असेच वागवायचे असते. त्याचबरोबर स्त्रीचे... त्यातही दलित स्त्रीचे चारित्र्यहनन करणे फार सोपे असते... कारण असे झाले की संघर्ष करण्याची तिची उमेद संपते आणि लढाई कमजोर होते.

दलितांबाबत अशा घटना घडल्या की 'विरोध करणारे कोणी आहे का?' याची चाचपणी केली जाते. प्रकरण खूप तापणार आणि आपल्याला त्रासदायक ठरणार असे वाटले की, सत्ताधारी वर्ग आणि पुढारी जागे होतात. मग उरलेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करायची भाषा केली जाते. एखादी नोकरी, घर, त्या जातीची लोकसंख्या प्रभावी असेल तर दोनचार एकर जमीनही देण्याची भाषा केली जाते... म्हणजे तुम्हाला हे सगळे मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या आया-बहिणींची इज्जत पणाला लावावी लागेल असा याचा सरळ अर्थ. 

महाराष्ट्रातील खैरलांजी प्रकरणात गावातील सवर्णांनी भोतमांगे कुटुंबातील महिलांवर व मुलींवर बलात्कार करून, पाच जणांपैकी चार जणांची हत्या केल्यानंतरही महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आम्ही पाच एकर जमीन देऊन भोतमांगे कुटुंबाचे पुनर्वसन केले आहे असे जाहीरपणे सांगितले... पण भैय्यालाल भोतमांगे वगळता त्या कुटुंबातील कोणीच जिवंत राहिले नव्हते तर पुनर्वसन कोणाचे करणार? (त्यांचेही गेल्या वर्षी निधन झाले.) याच गावाला नंतर तंटामुक्त ग्रामचा राज्यस्तरीय पुरस्कार याच मुख्यमंत्र्यांच्या काळात जाहीर झाला. इतका या व्यवस्थेचा समतेवर आणि लोकशाहीवर विश्वास! असो... यातून प्रश्न हाच उरतो की, हे थांबणार कधी? आणि उच्चवर्णीय म्हणून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्यांना देशात खरेच समता आणि लोकशाही प्रस्थापित करायची आहे का?

- डॉ. के. राहुल  
srass229@gmail.com

(लेखक बारामती येथील महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

हा लेखही वाचा : 
हाथरस टेस्टमध्ये सगळे फेल  - अभिषेक भोसले 

Tags: के राहुल हाथरस दलित अत्याचार इंडियन आयडॉल योगी आदित्यनाथ खैरलांजी K Rahul Hathras Dalit Atrocities Khairlanji Yogi Aditynath Indian Idol Load More Tags

Comments: Show All Comments

Ajay Vasanta Khadase

आदरणीय गुरुजी! काळीज कपारीला चिरणारे भयावहं वेदनादायी वास्तव.

Yogesh Patil

देशाच्या जाती व्यवस्थेवर मार्मिक भाष्य केलं सर अतिशय छान लेख आत्मपरीक्षण करायला लावणारा लेख.

एड. रविंद्र शिंदे

लेख अभ्यासपूर्ण आहे.देश २१ व्या शतकात गेला आहे असे वाटत नाही. मानवाने कितीही प्रगती केली , तरी उच्चवर्णिय वैचारीक बाबतीत दरिद्रीच राहणार ,मानवता हीच श्रेष्ठ व्हावी .

मनोज सहारे

अभ्याअपूर्ण

Rakesh

This is real picture of "the Unity in diversity" based democratic nation India.

kirtikumar

This is hypocrisy of Indian social structure dominated by Upper Caste People#shame

Abhay

Sunder khubh divsani Sadhna sapthayik nav bakhitl Aabhar

Add Comment