पश्चिम बंगाल – मोदीविरुद्ध ममतांचा संघर्ष 

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका : 6

देशात पश्चिम बंगाल, तमीळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू असताना सर्वाधिक चर्चा पश्चिम बंगालवर केंद्रित झालेली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे उर्वरित चार राज्यांतील लढाई ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतच सुरू आहे मात्र बंगालमध्ये आत्तापर्यंतच्या तृणमूल काँग्रेस विरुद्ध डावे पक्ष-काँग्रेस अशा लढतीला तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असे स्वरूप आले आहे. 

सहा वर्षांपूर्वी निवडणुकीच्या राजकारणात खऱ्या अर्थाने ‘एन्ट्री’ घेतलेला भाजप आता राज्याच्या राजकीय पटलाच्या केंद्रस्थानी आला आहे त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे... कारण ही निवडणूक म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अस्तित्वाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिष्ठेची आणि देशपातळीवर नामशेष होत चाललेल्या डाव्या पक्षांची लढाई आहे; हिंदुत्वाची, धार्मिक ध्रुवीकरणाची आणि अस्मितेची लढाई आहे... त्यामुळे या निवडणूक निकालाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावर सर्वाधिक उमटणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा गवगवा होत असताना पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी आठ टप्प्यांत मतदान होत आहे. त्यांपैकी पाच टप्प्यांतील (180 मतदारसंघांतले) मतदान पार पडले असून सहाव्या टप्प्यात 22 एप्रिल रोजी 43 मतदारसंघांत मतदान होणार आहे. आत्तापर्यंत ज्या 180 मतदारसंघांतील मतदान पार पडले आहे त्यापैकी बहुतांश मतदारसंघ तृणमूल काँग्रेसचा प्रभाव असलेलेच होते. शनिवारी 17 एप्रिलला ज्या 44 मतदारसंघांत मतदान झाले, त्यांतही 40 मतदारसंघांत तृणमूल काँग्रेसने आणि काँग्रेस, भाजप, माकप व फॉरवर्ड ब्लॉक या पक्षांनी प्रत्येकी एका मतदारसंघात विजय मिळवला होता. 

भाजपसाठी पश्चिम बंगालचे महत्त्व
खरेतर, मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाखालील सध्याची भाजप कोणतीही निवडणूक गांभीर्यानेच लढते. जिथे दखलपात्र नाही तिथे दखलपात्र होण्यासाठी... जिथे दखलपात्र आहोत तिथे सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचे भाजपचे गणित असते. मग ती निवडणूक ग्रामपंचायतीची असो किंवा लोकसभेची असो... सध्याचा भाजप मैदान अर्ध्यावर सोडत नाही हे आपण गेल्या सात-आठ वर्षांत पाहिले आहे. विशेषतः 2014मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर हे प्रकर्षाने दिसून आले आहे. मग त्यातून पश्चिम बंगाल तरी कसा सुटेल? भाजप स्वबळावर, उघड युती करून, छुपी युती करून, नेते फोडून, निकालानंतरची अमिषे दाखवून अशा सर्व पातळ्यांवर निवडणूक लढवतो. त्याची झलक बंगालमध्येही दिसून आली आहे. मुकुल रॉयपासून ते अलीकडे शुभेंदु अधिकारी यांसारख्यांपर्यंतच्या दिग्गज नेत्यांना पक्षात आणण्यात भाजपने यश मिळवले परंतु संपूर्ण बंगाली जनतेची जाणीव असलेला त्यांपैकी कुणी नाही आणि हीच भाजपची प्रमुख मर्यादा आहे. तिच्यावर मात करण्यासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दिग्गजांची फौज रिंगणात उतरली आहे... शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपसाठी राजकीय भूमी सुपीक करण्याचे काम सुरूच आहे कारण भाजपसाठी पश्चिम बंगालचे महत्त्व केवळ आणखी एका राज्यात सत्ता मिळवण्यापेक्षाही अनेक अर्थांनी आणि अनेक पटींनी अधिक आहे. त्याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

पहिले, मुस्लीमबहुल राज्यांत सत्ता मिळवल्याशिवाय ‘हिंदू भारत’ हे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही. देशात जम्मू आणि काश्मीर, आसाम व पश्चिम बंगाल ही अधिक मुस्लीम लोकसंख्या असलेली राज्ये आहेत. पैकी पहिल्या दोन राज्यांतील सत्तेचा अनुभव भाजपने घेतला आहे. आता 27 टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही प्रकारे सत्ता स्थापन करायची आहे.

दुसरे, 2014मध्ये देशात सत्ता आल्यानंतर भाजपला अनेक राज्ये पादाक्रांत करता आली मात्र पश्चिम बंगाल, तमीळनाडू यांसारख्या राज्यांनी मोदींना साथ दिली नाही. पश्चिम बंगालमध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या दोन जागा मिळवणाऱ्या भाजपला 2016च्या विधासनभा निवडणुकीतही केवळ तीन जागांवरच समाधान मानावे लागले. केंद्रात सत्ता असताना, देशभरात मोदीऽऽ... मोदीऽऽ नारा घुमत असताना केवळ तीन जागा... हे काही भाजपच्या पचनी पडले नाही. 

तिसरे, गेल्या सहा वर्षांपासून पंतप्रधान मोदींवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या, केंद्र सरकारच्या धोरणांना धारेवर धरणाऱ्या नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी यांचे नाव आघाडीवर आहे. त्यातच प्रमुख विरोधी प्रादेशिक पक्षांकडून समान विकास कार्यक्रमावर म्हणजेच मोदी-भाजपविरोधाची धार तीव्र करण्यासाठी त्यांना बळ मिळत आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी पुन्हा विजयी झाल्या तर त्यांची ताकद अधिक वाढेल. किंबहुना 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्या विरोधी पक्षांच्या आघाडीचा चेहरा म्हणून पुढे येतील ही भीतीही आहे.

चौथे, लोकसभेत सर्वाधिक जागा असलेल्या राज्यांत उत्तर प्रदेश (80), महाराष्ट्रनंतर (48) पश्चिम बंगाल (42) हे तिसरे राज्य आहे. जोपर्यंत या मोठ्या राज्यांत आपले वर्चस्व निर्माण होत नाही तोपर्यंत ‘शतप्रतिशत भाजप’, ‘काँग्रेसमुक्त भारत’चे स्वप्न पूर्ण होणार नाही याची जाणीव भाजपला आहे. दक्षिण भारतात कर्नाटक वगळता इतरत्र हवी तशी कामगिरी करता आली नाही आणि ती इतक्यात शक्यही नाही त्यामुळे आपली ताकद अबाधित राखण्यासाठी भाजपला पश्चिम बंगालसारख्या राज्यात सत्ता मिळवायची आहे. 

पाचवे, सध्या पश्चिम बंगालमध्ये आणि आसाममध्ये जो ‘सीएए’चा व ‘एनआरसी’चा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे त्याच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्यासाठी या दोन्ही राज्यांत सत्ता असण्याची आवश्यकता आहे. 

सहावे, दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकारची प्रतिमा काही प्रमाणात मलीन झाली आहे मात्र या विजयानंतर कदाचित हे आंदोलन पंजाब-हरियाणापुरतेच मर्यादित असून देशभर त्याचा काही प्रभाव जाणवत नसल्याचा संदेश जाईल. 

सातवे, पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवता आली तर सध्या जे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीएतील) मित्रपक्ष आहेत त्यांचीही बार्गेनिंग पॉवर आपोआप कमी होईल... तर आधीच गलितगात्र अवस्थेत गेलेली काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला हरवणे शक्य नाही असा पुनरुच्चार करून आणखी रसातळाला जातील. 

भाजपचा आत्मविश्वास
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 294पैकी 200हून अधिक जागांवर विजय मिळवण्याचा निर्धार भाजपने व्यक्त केला आहे. (अर्थात भाजपने 99हून अधिक जागा मिळवल्यास ट्विटर या समाजमाध्यमापासून मी लांब राहीन असे ममता बॅनर्जी यांच्यासाठी निवडणूक रणनीती आखणारे प्रशांत किशोर यांनी जाहीर केले आहे.) हा दावा किती खरा, किती खोटा ठरेल हे निवडणूक निकालातूनच दिसून येईल... मात्र पाच वर्षांपूर्वी केवळ तीन जागा मिळवणाऱ्या भाजपला 200चा टप्पा ओलांडण्याचा आत्मविश्वास कुठून आला हे पाहावे लागेल. त्याचे उत्तर आपल्याला गेल्या दोन निवडणुकांत मिळालेल्या मतांमध्ये आढळते. 

2014च्या लोकसभेत भाजपला बंगालमध्ये 42 जागांपैकी केवळ दोन जागा मिळाल्या... मात्र मतांची टक्केवारी 17.02 इतकी राहिली. त्यानंतर 2016च्या विधानसभेत केवळ तीन जागा मिळाल्या आणि मतांची टक्केवारीही 10.16वर घसरली. 2019च्या लोकसभेत मात्र भाजपने जोरदार मुसंडी मारत 18 जागा आणि 40.64 टक्के मते मिळवली... तर तृणमूलला 22 जागा व 43.69 टक्के मते मिळाली म्हणजेच तृणमूल व भाजप यांच्यातील मतांचा फरक केवळ चार टक्के राहिला. काँग्रेसला दोन जागा आणि 5.67 टक्के मते मिळाली. 

या निवडणुकीत राज्यातील डाव्या पक्षांची पूर्णपणे वाताहात झाली. एके काळी बालेकिल्ला असलेल्या राज्यात माकपला एकही जागा मिळाली नाही. उलट मतांची टक्केवारी 6.34पर्यंत घसरली. 2014च्या निवडणुकीत 22.96 टक्के मते मिळवणाऱ्या माकपची या निवडणुकीत 16.62 टक्के मते कमी झाली. 

ममतांच्या नेतृत्वाखालील तृणमूलच्या जागा कमी झाल्या असल्या तरी मतांमध्ये फार फरक पडला नाही... मात्र डाव्या पक्षांचे पाठीराखे मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळाले. राज्यात मिळालेला हाच जनाधार भाजपसाठी सत्तेच्या आशेची पेरणी करणारा ठरला आहे. 

खरेतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान करताना मतदार वेगवेगळा विचार करतात हे आत्तापर्यंत दिसून आले आहे... मात्र पश्चिम बंगालमध्ये तोच कित्ता गिरवला जाईल की त्यात परिवर्तन होईल हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे... परंतु भाजपने मात्र मतदारांचे हे परिवर्तन फार गांभीर्याने घेतले आहे हे आपल्याला दिसून येईल. 

हिंदुत्व विरुद्ध प्रादेशिक अस्मिता
राज्याच्या निवडणूक रणधुमाळीत हिंदुत्व हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मात्र भाजपचे हिंदुत्व विरुद्ध बंगाली हिंदुत्व अशी ती लढाई आहे. भाजपला संपूर्ण देशभरात हिंदू पट्ट्यातील हिंदुत्व अपेक्षित आहे परंतु हे हिंदुत्व देशभरात एका रंगात, विचारात बसवता येणार नाही. त्याला विविध शेड्स आहेत. बंगालमध्ये भाजपला अभिप्रेत असणारा ‘राम’ हे हिंदुत्व बसणार नाही. तिथे रामापेक्षा दुर्गा अधिक पूजली जाते आणि दुर्गा हे इथले हिंदुत्व आहे. असे वेगळेपण प्रादेशिक अस्मितेतून प्रकट होत असते. तमीळनाडूची द्रविडी अस्मिता वेगळी आहे. बंगालमधील अस्मिता वेगळी आहे. ‘प्रखर बुद्धिवाद’ हा या अस्मितेचा गाभा आहे. 

महाराष्ट्राला जशी थोर संत, विचारवंत, सुधारकांची परंपरा लाभली आहे तशीच पश्चिम बंगाललाही राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद विद्यासागर, रवींद्रनाथ टागोर यांसारख्या अनेक विचारवंतांची, सुधारकांची, तत्त्ववेत्त्यांची परंपरा लाभली आहे. ज्योती बसू, सोमनाथ चटर्जी, प्रणव मुखर्जी यांनी या अस्मितेचे प्रतिनिधित्व केले. आता या बंगाली अस्मितेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘माँ, माटी, मानुष’चा नारा देणाऱ्या ममता बॅनर्जी एकमेव नेत्या आहेत. 

ज्या पक्षांचा आधार अशा अस्मितांवर आधारलेला असतो, त्या पक्षांना अस्मितांशी तडजोड करता येत नाही त्यामुळे भाजपला या बंगाली अस्मितेवर थेट घाला घालण्याच्या मर्यादा आहेत. निवडणुकीला हिंदू विरुद्ध मुस्लीम असा रंग देण्यात आला आहे. नाही म्हटले तरी बंगाली अस्मिता असलेल्या नेताजी सुभाषंद्र बोस यांचे नाव घेतले जात आहे. ममतांना हिंदूद्वेषी ठरवण्यात येत आहे. त्यातून भाजपची ताकद वाढताना दिसत आहे. हे परवडणारे नसल्याने ममता यांनीही ‘सॉफ्ट हिंदुत्व’ स्वीकारले आहे. मी हिंदूविरोधात नाही, तर भाजपविरोधात आहे असे ममता सांगताना दिसतात. आता मतदार या सादेला कितपत प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल. 

मतदार आघाडी स्वीकारतील का?
यंदाच्या निवडणुकीतही काँग्रेसने 2016प्रमाणे डाव्या पक्षांशी हातमिळवणी केली आहे. त्यातच या आघाडीत ममता बॅनर्जी यांचे एके काळचे सहकारी पीरजादा अब्बास सिद्दिकी यांच्या ‘इंडिअन सेक्युलर फ्रंट’चाही समावेश झाल्याने या आघाडीची ताकद निश्चितच वाढली आहे... मात्र सध्या राज्यात सर्वाधिक चर्चा ही तृणमूल विरुद्ध भाजप अशी आहे आणि भाजपच्या व तृणमूलच्या गोठात काँग्रेसप्रणीत या आघाडीची चर्चा आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे ममता बॅनर्जी यांचा पाठीराखा मतदार. 

राज्यात मुस्लीम समाजाची लोकसंख्या 27 टक्के इतकी असून हा मतदार ममतांचा पाठीराखा आहे. पीरजादा अब्बास सिद्दिकी यांच्यामुळे हा समाज आघाडीकडे वळेल... शिवाय असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम हा पक्षही रिंगणात असल्याने तृणमूल काँग्रेसच्या मतांमध्ये खिंडार पडेल अशी शक्यता भाजपला वाटत आहे... तर ममता यांना मुस्लीम समाज हा आघाडीकडे न वळता तृणमूलच्या पाठीशीच राहील असा विश्वास आहे. मुळात या निवडणुकीत तरी मतदार काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे कारण राज्यातील मतदारांनी 2016च्या निवडणुकीत ही आघाडी नाकारल्याचेच दिसून आले आहे. 

राज्यातील डावे मतदार हे ममताविरोधी तर काँग्रेस मतदार डावेविरोधी आहेत. ममतांना विरोध करणे हा पर्याय सोपा व पूर्वापर असल्याने डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे पारडे जड केले परंतु काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आणि मतदारांकडून हे घडले नाही. त्याचे कारण म्हणजे आत्तापर्यंत ज्या डाव्या पक्षांना विरोध केला त्यांना मते देणे त्यांना रुचले नाही... त्यामुळे त्यांनी डाव्यांना मते देण्यापेक्षा बहुतांश प्रमाणात आत्तापर्यंत काँग्रेसची सोबत होती त्या तृणमूल काँग्रेसला आणि अल्प प्रमाणात भाजपला व कोणालाही मत नाही (नोटा) हा पर्याय निवडणे पसंत केले. 

उदाहरणार्थ, पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील कूचबिहार, जलपाईगुडी, मुर्शिदाबाद आणि उत्तर दिनाजपूर हे जिल्हे काँग्रेसचे आणि माकपचे बालेकिल्ले मानले जात होते. या जिल्ह्यांतील 52 मतदारसंघांमध्ये 2011च्या निवडणुकीत केवळ 10 जागांवर तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला होता... मात्र 2016च्या निवडणुकीत 26 जागांवर तृणमूलला विजय मिळवता आला. या निवडणुकीत माकप 120 मतदारसंघांत दुसऱ्या स्थानावर राहिला. या मतदारसंघांतील तृणमूलचा विजयी उमेदवार आणि माकपचा पराभूत उमेदवार यांच्या मतांतील फरक पाहिल्यास मतदारांनी ही आघाडी नाकारल्याचेच दिसून येते.

काँग्रेसची मते डाव्यांकडे न वळल्याचेच दिसून येते. या 120पैकी केवळ 23 मतदारसंघांत माकपला दहा हजारांहून कमी मतांनी पराभव पत्करावा लागला... तर 42 मतदारसंघांत अकरा ते वीस हजार, 29 मतदारसंघांत एकवीस ते तीस हजार, 13 मतदारसंघांत एकतीस ते चाळीस हजार, 9 मतदारसंघांत एक्केचाळीस ते पन्नास हजार आणि 4 मतदारसंघांत एक्कावन्न हजारांहून अधिक मतांनी पराभूत व्हावे लागले; तसेच ज्या 39 मतदारसंघांत काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे तेथील फरक पाहिल्यास 12 मतदारसंघांत दहा हजारांच्या आत, 14 मतदारसंघांत अकरा ते वीस हजार, 10 मतदारसंघांत एकवीस ते तीस हजार आणि तीन मतदारसंघांत एकतीस हजारांहून पुढील फरक राहिला. 68 मतदारसंघांमध्ये एकवीस हजारांहून अधिक मतांनी आघाडीतील या दोन्ही प्रमुख पक्षांचा पराभव झाला. 

याचाच अर्थ राज्यात ममतांच्या बाजूने लाट नसतानाही विजयी आणि पराभूत यांच्यातील (विशेषतः माकप उमेदवारांचे) अंतर हे आघाडीचा निर्णय चुकल्याचे आणि आघाडी योग्य प्रकारे कार्यान्वित झाली नसल्याचेच द्योतक आहे. त्याचाच फायदा तृणमूल काँग्रेसला आणि भाजपला झाला.

ममता आव्हान पेलतील?
आव्हान आणि संघर्ष हे दोन्ही शब्द ममता यांच्यासाठी नवीन नाहीत. मुळात त्यांचा राजकीय जन्मच संघर्षातून झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये 1977 ते 2011 अशी सलग 34 वर्षे डाव्या पक्षांची सत्ता होती परंतु 2011च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या मदतीने डाव्यांच्या गडाला सुरुंग लावला. 

डाव्यांच्या दृष्टीने ही सत्ता गमावणे केवळ पश्चिम बंगालपुरते मर्यादित राहिले नाही तर हळूहळू देशपातळीवरील महत्त्वही डाव्यांनी गमावले. या पराभवातून डावे पक्ष अद्याप सावरलेच नाहीत. त्याचीच परिणती 2016च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आली. तृणमूल काँग्रेस विरुद्ध डावे व काँग्रेस आघाडी अशा लढतीत ममता यांच्या तृणमूलने स्वबळावर तब्बल 211 जागा मिळवून इतिहास रचला.

विशेष म्हणजे 2016ची निवडणूक ममतांसाठी तितकी सोपी नव्हती. 2014मध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले होते. देशभर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन नावांचाच बोलबाला सुरू होता. ममता सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. ममतांची साथ सोडून काँग्रेसने डाव्या पक्षांशी आघाडी केली होती. राज्यात पाय रोवण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरला होता. अशा अनेक पातळ्यांशी लढा देत ममतांनी सत्ता कायम ठेवली. 

...मात्र गेल्या पाच वर्षांपासून पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गेल्या निवडणुकीत केवळ पाय रोवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपने आता सत्ता मिळवण्याचे स्वप्न बाळगले आहे. केवळ स्वप्नच बाळगले नाही तर त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे... कारण राज्यातील गेल्या दोन लोकसभा निवडणुकांनी व एका विधानसभा निवडणुकीने आपण सत्तेत येऊ शकतो हा आत्मविश्वास भाजपला दिला आहे. 

या आत्मविश्वासातून भाजपकडून ममता बॅनर्जींना व तृणमूल काँग्रेसला धारेवर धरण्याचे काम चालू आहे. त्याचा ममता यांच्याकडूनही प्रतिकार करण्यात येत आहे परंतु एका प्रादेशिक पक्षाच्या नेत्याकडे असलेल्या मर्यादांचा सामना ममता यांनाही करावा लागत आहे. भाजपकडून आखल्या जाणाऱ्या रणनीतीप्रमाणे तृणमूलचीही रणनीती आखली जात आहे. डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना भाजपकडे न वळता तृणमूलला मतदान करण्याचे आवाहन ममता यांनी केले आहे. सौम्य हिंदुत्वाचा स्वीकार केला आहे. एकीकडे ही राजकीय कमजोरी असतानाच आपण किती कणखर आहोत हेही त्यांनी दाखवून दिले आहे... ते पक्षातून बाहेर पडलेल्या शुभेंदू अधिकारी यांना थेट आव्हान देऊन.... 

पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांनी ‘सेफ’ राहण्यासाठी दोन–दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवलेली असतानाही ममता यांनी यंदा दोनऐवजी एकाच- नंदीग्राम या मतदारसंघातून उमेदवारी दाखल करून शुभेंदु अधिकारींना आव्हान दिले आहे ते मतदारांच्या विश्वासावरच. आता राज्यातील मतदारांचा ममतांवरचा विश्वास किती कायम आहे हे पाहावे लागेल.

- सुरेश इंगळे


'पाच राज्यांतील विधानसभा निवडणूका- 2021' या लेखमालेतील इतर लेखही वाचा

केरळ - द्विध्रुवी आघाड्यांमधील तीव्र सत्तास्पर्धा 

पुद्दुचेरी - दुर्लक्षित प्रदेशातील 'आभासी' निवडणूक

असमिया अस्मितेचा हिंदुत्ववादी आविष्कार : पूर्वार्ध

असमिया अस्मितेचा हिंदुत्ववादी आविष्कार : उत्तरार्ध 

तमीळनाडू - द्रविडिअन आघाड्यांमधील नवीन सत्ता संघर्ष

Tags: लेख लेखमाला निवडणुका पाच राज्यांतील निवडणुका - 2021 पश्चिम बंगाल सुरेश इंगळे नरेंद्र मोदी ममता बनर्जी Series Election West Bengal Suresh Ingale Narendra Modi Mamata Banarjee Load More Tags

Comments:

K.Rahual

बंगालच्या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ! २ मे रोजी पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यातील आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, आसाममध्ये भाजप, केरळमध्ये डावी आघाडी, तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (आण्णा द्रमुक), आणि पुद्दुचेरीमध्ये रंगास्वामी काँग्रेस आणि भाजप आघाडी यांना स्पष्ट बहुमत मिळाले. यातील कोणत्याच राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली नाही. सर्व राज्यात मतदारांनी स्पष्ट कौल देऊन येणाऱ्या सत्ताधारी पक्षाला भविष्यात आपल्या अपयशाचे रडगाणे गाता येणार नाही याची तजवीज केली हे चांगले झाले. पाच राज्यांची निवडणूक होत असली तरी सगळ्यात जास्त गाजावाजा झाला तो पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा. कारण येथील निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची बनविली होती. तसाही भाजप २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून काहीही करून प्रत्येक निवडणूक जिंकायचीच या निर्धारानेच मैदानात उतरतो हे पाठीमागील विविध राज्यातील निवडणुका पाहिल्यास लक्षात येते. त्याचप्रमाणे गेली १० वर्षे ममता बॅनर्जी यांची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये काहीही करून सत्ता मिळवायचीच यासाठी भाजपने सगळी प्रतिष्ठा पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बंगालमध्ये प्रचारासाठी भरपूर वेळ देता यावा म्हणून गरज नसताना बंगालच्या निवडणूका आठ टप्प्यात घेतल्या गेल्या. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय गेली दोन वर्षे बंगालमध्ये तळ ठोकून होते. स्वतः मोदींनी २० सभा घेतल्या आणि प्रचार यात्रा काढल्या. एवढे कमी की काय म्हणून स्वतः गृहमंत्री अमित शहा (४० सभा) भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, यांच्यासह २२ केंद्रीय मंत्री, सहा राज्यांचे मुख्यमंत्री यांनी सगळा बंगाल पिंजून काढला होता. सोबतीला केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा याबरोबरच प्रचंड आर्थिक पाठबळ आणि प्रसारमाध्यमे दिमतीला असतानाही बंगाल जिंकण्याचे मोदी-शहांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. निवडणुका म्हटले की हिंसाचार, गोळीबार, दगडफेक, मारामाऱ्या अशी बंगालची जुनी ओळख! ती थोड्याफार प्रमाणात याही वेळी कायम राहिली. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात हिंसाचार झाला. तसा तो डाव्या आघाडीच्या ३५ वर्षाच्या सत्ताकाळात आणि ममतांच्या १० वर्षांच्या सत्ताकाळातही होत होता. फक्त सत्ताधारी आणि विरोधक बदलले इतकेच! सामाजिक-आर्थिक विकासाच्या बाबतीतही बंगालची स्थिती वाईटच आहे. ममतांच्या १० वर्षांच्या सत्ताकाळातही त्यात फार बदल झालेले नाहीत. उलट डाव्यांच्या सत्ताकाळापेक्षा ममतांच्या सत्ताकाळात अनेक आघाड्यांवर बंगालची पीछेहाटच झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून लक्षात येते. तरीही बंगालच्या मतदारांनी ममतांच्या पदरी भरभरून मतांचे दान टाकल्याचे दिसून येते. डावे आणि काँग्रेसने युती करूनही त्यांना भोपळाही फोडता आला नाही. भाजपला २०१६ मध्ये फक्त तीन जागा मिळाल्या होत्या त्याच्या आता ७३ जागा झाल्या. तसे पाहता ही फार मोठी कामगिरी आहे पण 'आपकी बार दो सौ पार' च्या वल्गना करणाऱ्या भाजपला या यशाचा आनंद घेता आला नाही त्यामुळे आसाममधील निर्भेळ यशाच्या आनंदातही मिठाचा खडा पडला. त्यामुळेच दिदींचा पश्चिम बंगालमधील विजय इतर प्रादेशिक पक्षांच्या विजयापेक्षा वेगळा आणि महत्त्वाचा आहे. म्हणूनच त्याकडे वेगळ्या परिप्रेक्ष्यातुन पाहणे आवश्यक आहे. सगळ्यात अगोदर एक महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे ममता बॅनर्जी या अत्यंत धडाडीच्या, आक्रमक आणि तितक्याच सनकी नेत्या आहेत. वेळप्रसंगी त्या अत्यंत टोकाची आणि आक्रस्ताळेपणाची भूमिका घेण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. एखादी गोष्ट करायची ठरविली की त्यासाठी कोणतीही किंमत मोजायची आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची त्यांची तयारी असते. प्रसंगी राजकीय नुकसान सोसायचीही त्यांची तयारी असते. यातूनच त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून डावे, भाजपा, समाजवादी पक्ष, जनता दल असे पर्याय असतानाही आणि कसलेही राजकीय आर्थिक पाठबळ नसताना स्वतःचा राजकीय पक्ष काढला. ज्या काळात पश्चिम बंगाल डाव्या पक्षाचा गड होता आणि त्यांनी काँग्रेससारख्या बलाढ्य राजकीय पक्षाला बंगालमधून हद्दपार केले होते. ज्योती बसू यांच्यासारख्या कसलेल्या कम्युनिस्ट नेत्याने शेवटपर्यंत बंगालवरील आपली पकड ढिली होऊ दिली नव्हती. देशभर डाव्या पक्षांच्या बंगालमधील हिंसाचाराच्या बातम्या झडत असताना ममता दीदी तिथे खंबीरपणे पाय रोवून उभ्या होत्या. त्यांना आपले अस्तित्व सिद्ध करायला एक संधी हवी होती जी त्यांना टाटांच्या सिंगुरमधील नॅनो प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमीन अधिग्रहण विरोधी आंदोलनाने मिळवून दिली. सतत खाजगीकरण आणि भांडवलीकरण विरोधी भूमिका घेणारे डावे पक्ष जमीन अधिग्रहनाचे समर्थन करून खाजगिकरणाला साजेशी भूमिका घेत असताना ममतांनी खंबीर विरोधकाची निर्माण झालेली पोकळी भरून काढून डाव्यांना अत्यंत कडवा विरोध केला. प्रसंगी लाठीमार सहन केला. आंदोलनाच्या ठिकाणीच त्यांनी डाव्यांना सत्तेतून खाली खेचण्याची घोषणा केली आणि सगळा पश्चिम बंगाल त्यांनी पिंजून काढला. दोनशे रुपयांची साधी साडी, ७० रुपयांची स्लीपर, खांद्याला शबनम बॅग असे साधेपणाचे वेड असलेल्या दीदींनी २०११ च्या निवडणुकीत बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या डाव्या आघाडीचा १८० जागा जिंकत दारुण पराभव केला आणि मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्या. डाव्या पक्षाशी संघर्ष करत असताना त्याला कसे तोंड द्यायचे याची पुरेपूर जाणीव असलेल्या ममतांनी डाव्यांना त्यांच्याच भाषेत चोख उत्तरे दिली. त्यामुळे सत्ता बदल झाले तरी बंगाल आणि हिंसाचार हे समीकरण कायम राहिले. काँग्रेसला बंगालच्या राजकारणात काहीच स्थान उरले नसल्याने आणि डावे त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असल्याने तत्कालीन केंद्रसरकारने त्याकडे शक्य असतानाही जाणूनबुजून दुर्लक्ष केले ही बाब ममतांच्या पथ्यावरच पडत गेली. उलट ममता कश्या खमक्या आहेत आणि त्यांनी डाव्यांना कशी त्यांची जागा दाखविली म्हणून आडवाणी, राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि मोदींसह भाजपचे अनेक केंद्रीय नेते त्यांचे कौतुकच करत होते. त्याअगोदर १९९९ ते २००४ या काळातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी रेल्वेमंत्रीपदही भूषविले होते आणि त्यांनी त्याकाळात सगळे मंत्रिमंडळ त्यांनी वेठीला धरले होते. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी बंगाल दौऱ्यावर आले असता त्यांनी "आपकी बेटी बहुत सताती है।" अशी जाहीर तक्रार दिदींच्या आईकडे केली होती. तरीही दिदींनी आपल्या कार्यपद्धतीत अजिबात बदल केला नाही. पण त्यांचा हा हेकेखोरपणा सामान्य माणसाला कधीच त्रासदायक ठरला नाही कारण सामान्य माणूस हे त्यांच्या राजकारणाचे सूत्र होते आणि आजही आहे. त्यामुळे ३५ वर्षे डाव्यांच्या (की ज्योती बसूच्या) मागे खंबीरपणे उभा असलेला सामान्य बंगाली माणूस दिदींच्या साधेपणाकडे आकृष्ठ झाला तो आजतागायत! त्यामुळेच २०११ साली २०६ जागा जिंकणाऱ्या दीदींनी यावेळेस २१६ जागा जिंकत आपल्या यशाचा आलेख चढता ठेवला आहे. या यशाचे श्रेय जसे निर्विवादपणे दिदींना जाते तसेच ते मोदी आणि भाजप तसेच काही प्रमाणात काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीलाही जाते. मुळात भाजप हा केडर बेस पक्ष असला तरी भाजप स्थापन झाल्यापासून आज तागायत गेल्या चाळीस वर्षात त्यांना बंगालमध्ये पाय रोवता आले नाहीत. अगोदर डावे पक्ष आणि नंतर ममता दीदी यांनी भाजप-आरएसएसला बंगालमध्ये पायही टाकू दिला नाही. त्यामुळे शतप्रतिशत बंगालचे स्वप्न घेऊन निवडणूकीला समोरा जाणारा भाजप आपल्या केडरमधील एकही खंबीर स्थानिक नेता समोर आणू शकला नाही. भाजपला शेवटपर्यंत आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरविता आला नाही. त्यामुळे जी काय भिस्त होती ती तृणमूलमधून निवडणूकीच्या तोंडावर साम-दाम-दंड-भेद नीती वापरून आयात केलेल्या आयरामांची आणि क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील चमकत्या ताऱ्यांची! या निवडणुकी अगोदर तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या लहान मोठ्या नेत्यांची संख्या ४० इतकी होती. त्यातील फक्त १३ जणांना भाजपने तिकीट दिले आणि फक्त चार जण निवडणूक आले. यातील बहुतांश नेत्यांचे हात दगडाखाली अडकले होते. सुवेन्दू अधिकारी, मुकुल रॉय, सोवन चटर्जी, मदन मित्रा हे तृणमूलमधील बडे नेते शारदा चिट फंड घोटाळ्यात अडकले होते. भाजपवासी होण्यासाठी भाजपने त्यांना सीबीआयची भीती दाखविली नसेल असे ठामपणे म्हणता येणार नाही. मिथुन चक्रवर्ती यांचे एक चिरंजीव बलात्काराच्या केसमध्ये अडकले आहेत. भाजपच्या वळचणीला गेलेल्या अनेकांच्या अश्या काही न काही भानगडी होत्या. भाजपने बंगालमध्ये लावलेला जोर, लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षितपणे मिळालेले यश यामुळे भाजपला बंगालमध्ये सत्ता मिळेल आणि आपल्या पदरात काही न काही दान पडेल असे वाटून हे सत्तालोलुप तृणमूलचे नेते निवडणूकीच्या अगोदर भाजपच्या वळचणीला गेले. यात खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर अश्या अनेकांचा भरणा होता पण या सगळयांचा होरा चुकला आणि भाजपचा दारुण पराभव झाला. दिदींनी आपली रणरागिणी ही प्रतिमा सार्थ ठरविली. दिदींच्या विजयात दिदींचा जितका मोठा वाटा आहे तितकाच वाटा मोदी, समस्त भाजपा आणि काँग्रेस-डाव्या आघाडीचाही आहे. अगोदरच पराभवाच्या मानसिकतेत असलेल्या काँग्रेस-डाव्या आघाडीला आपण सत्तेत येणार नाही याची जाणीव होती आणि गमविण्यासारखे फार काही नव्हते त्यामुळे त्यांनी भाजपला रोखण्यासाठी आपली सगळी ताकत ममता दिदींच्या मागे उभा केली या अगोदर २०१६ मध्ये स्वतंत्र निवडणूक लढताना डाव्या आघाडीने ३२ आणि काँग्रेसने ४४ जागा अश्या ७६ जागा जिंकल्या होत्या. त्यातील ६१ ठिकाणी आता तृणमलचे उमेदवार विजयी झाले आहेत तर फक्त १४ जागा भाजपने जिंकल्या आहेत. ही बाब लक्षात घेतली तर काँग्रेस आणि डाव्यांना मानणारे मतदार भाजपच्या मागे न जाता तृणमूल काँग्रेसच्या मागे उभे राहिल्याचे दिसते तसेच मिदनापूर सारख्या मुस्लिमबहुल प्रातांत तर मुस्लिमांचे एक गठ्ठा मतदान ममतांना झाल्याचे दिसुन येते. या पट्ट्यात भाजपला जशी एकही जागा मिळालेली नाही तशी भाजपची बी टीम असल्याची टीका होणाऱ्या एमआयएम लाही मिळाली नाही. त्यामुळे काँग्रेस, डावे पक्ष यांना मानणारा लोकशाही, समाजवादी आणि साम्यवादी विचारसरणीचा मतदार आणि CAA आणि NRC सारख्या कायद्यामुळे आपण आपल्याच घरातून, राज्यातून आणि देशातून परागंदा होऊ शकतो याची भीती असलेला मुस्लिम मतदार यांनी एकत्र येत भाजपचा बंगालचे भगवेकरण करण्याचा नियोजित कार्यक्रम हाणून पाडला. याच्या जोडीला भाजप नेत्यांनी प्रचारादरम्यान दिदींच्या विरोधात केलेली व्यक्तव्येही दिदींच्या मदतीला आली. 'दिदी ओ दिदी' हे वाचायला साधे वाटणारे वाक्य मोदींसारख्या माणसाच्या तोंडून ऐकताना त्यातून निर्माण होणारी अश्लीलता महिला वर्गाला खाली मान घालायला लावणारी तर होतीच पण सभ्य पुरुषांनाही आवडणार नाही अशी होती. त्यामुळे महिला वर्गाची सहानुभूतीही ममतांना मिळाली आणि त्याचे मतदानातही रूपांतर झाले. त्यातच निवडणूक प्रचारादरम्यान दिदींवर झालेल्या हल्ल्यात त्यांचा पाय जखमी झाला आणि ममतांनी पुढील पाच टप्प्यातील प्रचार पायाला प्लास्टर बांधून आणि व्हेलचेअरवर बसून केला. त्यावर विजयवर्गीय यांनी केलेली "लागलेल्या पायामुळे ममतांना साडी सावरायला त्रास होत असेल तर त्यांनी बरमुडा घालावा" ही टिप्पणीही बंगाली मतदारांना आवडली नाही. बाहेरची माणसे येऊन एका कर्तृत्ववान बंगाली महिलेवर आरोप करतात तरीही ही साधी महिला पुरुष वर्गांकडून अश्लील आरोप सहन करत, पाय जायबन्दी झालेला असतानाही व्हीलचेयरवरुन बसून प्रचार करतेय, भाजपच्या हिंदुत्व आणि रामराज्याच्या प्रचाराला चंडी आणि रणरागिणी दुर्गेप्रमाणे निडर होऊन त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देतेय. ही बाब बंगालच्या मतदारांना विशेषतः महिला वर्गाला भावली. बंगाली महिलांनी ममता दिदींना या निवडणुकीत पूर्ण साथ दिली. शिवाय देशाचा पंतप्रधान देश आर्थिक आघाडीवर पिछाडीवर पडलेला असताना, कोरोना साथीने माणसे बेड, औषधे आणि ऑक्सिजनविना मरत असताना एक बंगाली महिलेविरोधात बोलतो हेही तेथील मतदारांना सहन झाले नाही. भाजपकडे स्थानिक भाषेत बोलून मतदारांना आकर्षित करेल असा नेता नव्हता. ममतांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवायची ठरविल्यानंतर ममतांच्या राजकारणाची नस जाणून असलेला आणि जनाधार असलेला सुवेन्दू अधिकारी आणि स्वतःचा चेहरा असलेले मुकुल रॉय यांच्यासारखे नेते आपल्याच मतदारसंघात अडकून पडले. त्यामुळे ममतांना धोरणात्मक विरोध करेल असा नेताच भाजपकडे नव्हता त्यामुळे टागोरांसारखी दाढी वाढवून टागोर होता येत नाही किंवा त्यांच्यासारखे महान ही होता येत नाही हेही बंगाली मतदारांनी भाजपला दाखवून दिले. असे असले तरी ममतांना निर्भेळ यश देत असताना बंगाली मतदारांनी भाजपलाही पुरते नामोहरम केलेले नाही. ७३ जागांचे दान भाजपच्या पदरी घालताना तृणमुलच्या उमेदवारांचा अनेक मोक्याच्या जागी पराभव करून भाजपला विजयी केले आहे. १० वर्षे एकहाती कारभार करणाऱ्या ममतांना नोकरी, शिक्षण, रोजगार, उद्योगधंदे आणि पायाभूत सुविधांचा विकास या आघाडीवर अपयश आले आहे. ममतांना कदाचित बंगाली मतदारांनी ही शेवटची संधी दिलेली असावी. इतके दिवस केलेले बंगाली अस्मिता आणि गरिबांचे राजकारण २०२६ च्या निवडणूकीत दिदींना साथ देणार नाही त्यासाठी त्यांना पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती आणि उत्पादनाधरित लघु, मध्यम आणि मोठे उद्योगधंदे उभारावे लागतील. या निवडणुकीत डावे आणि काँग्रेसने जाणूनबुजून दाखविलेली निष्क्रियता पुढच्या निवडणुकीत नसणार आहे तसेच या पाच वर्षात भाजप सुवेन्दू अधिकारी आणि मुकुल रॉय यांच्यासारख्या ममतांची नाडी आणि ग्रामीण जनतेची नस ठाऊक असलेल्या नेत्यांना पुढे करून ममतांना घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याची जाणीव ठेऊन ममतांना काळजीपूर्वक पावले टाकावी लागणार आहेत. नाहीतर २०२६ ला दिदींचा पराभव अटळ आहे! ©के. राहुल, 9096242452.

Anup Priolkar

Article with perfectly political based and studied one.

Bhagwat Shinde

अभ्यासपूर्ण लेख. लेखकाचे मनःपूर्वक आभार.

Add Comment