कौसरबाग मस्जिद येथील समाज संवाद कार्यक्रम

कौसरबाग मस्जिद येथे गेल्या रविवारी (23 जानेवारी) मस्जिद परिचय मेळावा व समाज संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या महिन्यात उत्तर भारतात सनातन /वैदिक/ हिंदू धर्मसंसदेमध्ये आणि तशाच अन्य काही कार्यक्रमांमध्ये अनेक वादग्रस्त भाषणे झाली. त्यातून ख्रिश्चन व मुस्लिम धर्माविषयी विखारी व द्वेषयुक्त वक्तव्ये केली गेली. त्यामुळे समाजमनात भीती व गैरसमज वाढीस लागल्याचे दिसते आहे. या पार्श्वभूमीवर, विविध ठिकाणच्या विविध घटकांकडून संवाद कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. गढूळलेले वातावरण निवळावे आणि सामंजस्य वाढीस लागावे असा त्या कार्यक्रमांमागचा हेतू आहे. असाच एक कार्यक्रम 23 जानेवारी 2022 रोजी, पुणे येथील कौसरबाग मशिदीमध्ये झाला. त्या कार्यक्रमाचा कलीम अजीम यांनी लिहिलेला वृत्तान्त येथे प्रसिद्ध करीत आहोत. सामान्यतः, कोणतेही वृत्तान्त आणि त्यातही धार्मिक कार्यक्रमांचे वृत्तान्त साप्ताहिक साधना व कर्तव्य साधना या दोहोंवरून प्रसिद्ध केले जात नाहीत. पण विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन क्वचित काही अपवाद केले जातात, हा त्यापैकी एक अपवाद आहे. - संपादक

पुणे : “1857चा स्वातंत्र्यसंग्राम 'मिला-जुला' म्हणजे हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन लढलेला लढा होता. या एकतेला पाहून इंग्रज घाबरले आणि त्यांनी सत्तेसाठी दोन समुदायांमध्ये फूट पाडायचे प्रयत्न सुरू केले. हिंदू-मुस्लिमांना वेगळे पाडले. आपल्याकडील काही स्वार्थी नेते त्याला बळी पडले. आजही हेच सुरू आहे. त्यामुळे दोन समुदायांमध्ये वेगळेपणाची दरी वाढत चाललेली आहे. ही दरी कमी करण्यासाठी समाज-संवाद महत्त्वाचा आहे,” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडले.

पुण्यात रविवारी (23 जानेवारी 2022 रोजी) कौसरबाग मस्जिद येथे 'समाज संवाद कार्यक्रम' आयोजित करण्यात आला होता, या प्रसंगी देशमुख बोलत होते.

सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या मस्जिद परिचय मेळाव्याला परिसरातील अनेक गैरमुस्लिम स्त्री-पुरुष नागरिक व मान्यवर उपस्थित होते. भेट देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे पाण्याची बाटली व खजूर देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांना नमाजपूर्वी केले जाणारे वजू (स्वच्छता) काय असते, त्याची कृती आणि त्याचे महत्त्वही सांगण्यात आले.

'एसआयओ' या विद्यार्थी संघटनेच्या स्वयंसेवकांनी मान्यवरांना बाहेरचा सर्व परिसर फिरवून दाखवला आणि त्याविषयी माहितीदेखील दिली. त्यानंतर मस्जिदीच्या गाभाऱ्यात, जिथे इमाम नमाजचे नेतृत्व करतो, तिथे सर्वांना घेऊन जाण्यात आले. अली इनामदार यांनी मस्जिदीच्या आतल्या रचनेचा परिचय करून दिला. प्रा. रशीद शेख यांनी मस्जिदीची रचना, निर्मिती, जानिमाज, पुस्तके, नमाजच्या वेळा इत्यादीविषयी सांगितले. त्याचप्रमाणे इमाम दररोज नमाजमध्ये कुठल्या वचनांचे पठण करतो, त्या श्लोकांचे अर्थही समजावून सांगितले.

त्यानंतर अज़ान देऊन, त्याचे शब्दश: भाषांतर करण्यात आले. आणि मग प्रत्यक्ष नमाज अदा करण्यात आली. मुफ्ती नवेद यांच्या मधाळ 'किराअत'ने नमाज संपन्न झाली. भेट देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांनी गाभाऱ्यात बसून प्रत्यक्ष नमाज पाहिली.  

त्यानंतर डॉ. रफीक सय्यद यांनी नमाजमध्ये पठण करण्यात आलेल्या कुरआनच्या वचनांचे अर्थ आणि त्यांचे सार समजावून सांगितले. तत्पूर्वी, गाजिउद्दीन रिसर्च सेंटर व डेक्कन क्वेस्ट फाउंडेशन द्वारा प्रकाशित ‘बिलाल इब्न रबाह’या पुस्तकाचे प्रकाशन निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

या पुस्तकाविषयी बोलताना सरफराज अहमद म्हणाले, "हजरत बिलाल हे एक हब्शी गुलाम होते, त्यांना मुक्त करून प्रेषितांनी समानता आणि आदर-सन्मानाचा एक महत्त्वाचा संदेश दिला. इस्लामचे ते प्रथम मुअज्जीन होते. त्यांना काबागृहावर चढून अजान देण्यासाठी प्रेषितांनी निमंत्रण दिले, ती वर्णव्यवस्थेविरोधात इस्लामची पहिली चळवळ होती."

मस्जिद परिचयाचा मुख्य कार्यक्रम दीड तास चालला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना अल्पोपहार देण्यात आला. त्यानंतर परिसरातच समाज-संवाद कार्यक्रम झाला. सरफराज अहमद यांनी मस्जिदीच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाची पुनर्मांडणी केली. "एकेकाळी मस्जिद हे राजकीय व सामाजिक कल्याणाचे केंद्र होते, ते स्वतंत्र व मुक्त विद्यापीठ होते. इजिप्तचे अल अजहर, देवबंदचे विद्यापीठ या सुरुवातीला मस्जिदी होत्या. त्यानंतर त्यांचे विद्यापीठात रुपांतर झाले, आज आपल्या मस्जिदी आधुनिक शिक्षणाची केंद्रे व्हावीत", असे ते म्हणाले.

इस्लामचा सामाजिक व आर्थिक विचार त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. मस्जिदी गरीब, निराश्रितांसाठी निवारा आहेत, तसेच त्या गरजवंतांसाठी अन्नछत्र आहेत. मस्जिदींचा वापर फक्त नमाजसाठी न होता, इतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी आणि परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांच्या विधायक कार्यासाठीदेखील झाला पाहिजे, असेही सरफराज म्हणाले.  


हेही पाहा : मराठी मुसलमानांचे सामाजिक - सांस्कृतिक मूल्यभान कसे जागवणार? - सरफराज अहमद


या मेळाव्यात साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी इस्लामी संस्कृतीवर विचार मांडले. वेगवेगळ्या काळातील समाजाला समजून घेण्यासाठी अशा प्रकारचे संवाद कार्यक्रम होणे गरजेचे आहे, असे सांगत शिरसाठ म्हणाले, “संस्कृती असो किंवा चालीरिती, परंपरामध्ये काळाचा विचार करून काही गोष्टी अंतर्भूत झालेल्या असतात. परंतु काळ बदलतो, परिस्थिती बदलते तसे त्यातले काही कालबाह्य झालेले असते किंवा काही योग्य ठरणार नसते. त्यामुळे संस्कृती, समाज पुढे जायचा असेल तर परंपरेतून आलेले, धर्मातून आलेले, श्रद्धेतून, विश्वासातून आलेले, समाजासाठी जे चांगले आहे ते आपण टिकवावे, अधिक समृद्ध करावे. आणि जे-जे कालबाह्य आहे किंवा सदोष आहे, ते मागे टाकून पुढे जायला पाहिजे, असे केले नाही तर समाजाला एक प्रकारचे साचलेपण येते.”

दिल्लीहून आलेल्या 'ऑल इंडिया लॉयर कौन्सिल'चे चेअरमन अ‍ॅड. शरफुद्दीन अहमद यांनी समूह संवादावर भर दिला. तसेच, "हिंदू-मुस्लिमांनी प्रचारी संदेशांना बळी न पडता, आपल्या आसपासच्या सर्वधर्मीय नागरिकांशी संवाद प्रस्थापित करावा", असे म्हटले.

'सलोखा मंच'चे प्रमोद मुजुमदार उपस्थितांशी संवाद साधत म्हणाले, “देशातील, शहरातील अल्पसंख्याकांना विश्वासात घेणे ही बहुसंख्याकांची जबाबदारी आहे. सामाजिक सद्भाव टिकवून अल्पसंख्याकांशी, मुस्लिमांशी संवाद साधणेही आज गरजेचे आहे. धर्मकेंद्री राजकारणातून होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे मुस्लिम हवालदिल झालेला आहे, अशा मुस्लिमांच्या पाठीशी ‘सलोखा’ आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना विश्वास देतो की, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”

"मुस्लिमांविषयी होत असलेल्या अपप्रचाराला बळी पडू नये" असे सलोखा मंचच्या डॉ. संजिवनी कुलकर्णी यांनी सांगितले. 'युक्रांद'च्या नीलम पंडित आपल्या ऐंशीवर्षीय आईला घेऊन आलेल्या होत्या. मस्जिद पाहून आई कृतार्थ झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या परिचय मेळाव्यात लोकायत, नोइंग गांधी, संविधान संवादक फोरमचे पदाधिकारी आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 'प्रत्यक्ष मस्जिद पाहून आत्मिक समाधान वाटले', अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यात तबलीग जमात (पुणे)चे विशेष प्रयत्न होते. असे उपक्रम विविध शहरांत व दिल्ली-मरकजपर्यंत पोहोचविण्याची हमी तबलीगच्या संघटकांनी दिली. कौसरबाग मस्जिद कमिटीने परिसरातील गैरमुस्लिम सोसायटीमध्ये जाऊन मस्जिद परिचयासाठी अनेकांना निमंत्रणे पाठविली होती. तसेच पोलीस, आयबी यांनादेखील निमंत्रित करण्यात आले होते.

'सावित्री-फातिमा विचार मंच'चे अली इनामदार यांनी समाज-संवाद मेळाव्याचे सर्व नियोजन व अन्य व्यवस्थेचे संयोजन केले होते. तसेच त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले.

कलीम अजीम यांनी सर्व निमंत्रित पाहुण्यांचे आभार मानले. "मस्जिदीमध्ये दाखवण्यासारखे विशेष असे काही नसते, तसेच लपविण्यासारखेही काही नसते; त्यामुळे अगदी कोणीही, कधीही येऊन मस्जिद पाहू शकतो. मस्जिदीबद्दल होत असलेल्या अपप्रचाराला बळी पडण्याआधी परिसरातील एखाद्या मस्जिदीला भेट द्या", असे त्यांनी सांगितले. राहिलेल्या त्रुटी व उणिवा पुढच्या परिचय मेळाव्यात भरून काढण्याचे आश्वासन कलीम यांनी दिले. कौसरबाग मस्जिद कमिटी, तबलीग जमात यांचे त्यांनी विशेष आभार मानले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे ज्यांचा हातभार लागला, अशा सर्वांचे त्यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला 'राष्ट्र सेवा दल'चे संदेश भंडारे, 'सलोखा मंच'चे सर्व पदाधिकारी, 'युक्रांद'चे संदीप बर्वे, 'ऑल इंडिया लॉयर कौन्सिल'चे अ‍ॅड. संतोष जाधव यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. सर्वजण आपल्या मित्र-सहकाऱ्यांना घेऊन कार्यक्रमाला आले होते.

पारनेरहून रफिक सय्यद यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच कौसरबाग मस्जिद कमिटीचे सेक्रेटरी जफर खान उपस्थित होते. कार्यक्रमाला हजर असेलल्या प्रत्येकांना साने गुरुजी लिखित ‘इस्लामी संस्कृती’ आणि ‘बिलाल इब्न रबाह’ ही पुस्तके वितरित करण्यात आली. तसेच संदेश लायब्ररीच्या कार्यकर्त्यांनी कुरआनची मराठी प्रतही सर्वांना भेट दिली.

या समाज-संवाद कार्यक्रमाला व्यक्तिगत निमंत्रणे पाठवून निवडक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. तसेच काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश दिलेले होते. विशेष म्हणजे मस्जिद कमिटीच्या नोटीस बोर्डवर मराठी भाषेत सूचना लिहिण्यात आलेली होती. त्यानुसार मस्जिद पाहण्यासाठी हिंदू-मुस्लिम समुदायातील स्त्रिया मोठ्या संख्येने हजर झालेल्या होत्या. कार्यक्रमाला आलेला चांगला प्रतिसाद पाहून नियमित मस्जिद परिचय व समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल, असे सावित्री-फातिमा विचार मंचच्या वतीने कळवण्यात आले.

- कलीम अजीम, पुणे
kalimazim2@gmail.com

Tags: कौसरबाग मस्जिद नमाज समता हजरत बिलाल वृत्तान्त Load More Tags

Comments:

संदीप बर्वे

खुप समृध्द करणारा अनुभव !

दीपक पाटील

काय योगायोग आहे पहा....हा लेख वाचण्यापूर्वी एक दिड तास आधी मी सांगलीतून मिरजेला गेलो होतो. सौ.ला एका दवाखान्यात सोडून मी व मुलगा मिरजभर फिरलो. मिरजेचा मीरासाहेबांचा दर्गा मी मुलाला दाखवला. तिथं अनेकजण नमस्कार करत असल्याचे...म्हणजे बहुसंख्य हिंदू भक्तगण असल्याचे मुलाने बोलून दाखवले. पुढे एका शनिमंदिरासमोर एक मुस्लीम काका त्यांच्या पद्धतीने शनिदेवाच्या संपर्कात होते. या दोन्ही प्रसंगांनी मुलाच्या मनात एक प्रकारचं स्निग्ध संतुलन झाल्याचं मला जाणवलं. धर्म ही एक जीवन जगण्याची..उपासना करण्पयाची पद्धती आहे. चपाती,भाकरी,ब्रेड,पराठा हे जसे प्रत्येकाच्या आवडी..ऐपतीनुसार आपण खातो. तसाच धर्म आहे...असावा असे मला वाटते. एकमेकांवर विश्वास ठेवणं..दुस-याच्या श्रद्धाभावनेचा सन्मान करणं..कुणाला न दुखावणं हीच सर्व धर्मांची..सर्वकालिक तत्वे आहेत.

Add Comment

संबंधित लेख