विद्येविना विकासाचा ‘अर्थ’बोध

अतुल देऊळगावकर यांच्या ‘ग्रंथाचिया द्वारी : जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा’ या पुस्तकातील एक प्रकरण.. 

अतुल देऊळगावकर यांचे ‘ग्रंथाचिया द्वारी : जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा’ हे विश्वकर्मा पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेले पुस्तक उदगीर येथे होणाऱ्या 95 व्या अ.भा. मराठी साहित्यसंमेलनात (22 ते 24 एप्रिल) प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील एक प्रकरण.. 

गेली तीन दशके जगातील निवडक विचारवंतांमध्ये डॉ. अमर्त्य सेन यांचे नाव अग्रभागी आहे. जागतिक समस्यांवरील त्यांचे भाष्य ऐकण्यासाठी अवघे जग सदैव सज्ज असते. अर्थशास्त्रातील कूट समस्या असो वा मंदीतून बाहेर पडण्याचे उपाय, सेन यांचे मत अनिवार्य असते. जोसेफ स्टिगलिट्झ, पॉल क्रुगमन, अ‍ॅग्नेस डीटन, थॉमस पिकेटी, अँथनी अ‍ॅटिक्सन हे जगातील आघाडीचे अर्थवेत्ते ‘आर्थिक विषमता, गरिबी, जागतिकीकरणाचे लाभ हे आज कळीचे ठरलेले मुद्दे जागतिक विषयपत्रिकेवर आणण्याचे श्रेय’ अर्थतत्त्वज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनाच देतात. आज विकासाच्या भाषेचा बोलबाला आहे. ‘द कंट्री ऑफ फर्स्ट बॉइज’ या पुस्तकातून सेन यांनी भूक, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमे, जागतिकीकरण, परस्परावलंबी जग अशा अनेक अंगांनी विकास तपासून पाहिला आहे.

श्रीमंत राष्ट्रांमधील सर्व नागरिक सुखी आहेत का? जगातील प्रबळ लष्करी राष्ट्रे शांत व सुरक्षित आहेत का? समाजातील अशांततेच्या आणि असुरक्षिततेच्या कारणांचा नायनाट केला नाही, तर शांतता कशी प्रस्थापित होईल? मग अर्थशास्त्राचा अर्थ तरी काय? सेन यांनी ‘दारिद्र्य, युद्ध आणि शांतता’ या निबंधातून हिंसेचा अन्वय लावला आहे. विकास ही संकल्पना केवळ आर्थिक नसून, त्यामध्ये संपूर्ण समाजाचा विकास अभिप्रेत आहे. निर्जीव वस्तूंच्या उत्पादनाचे मोजमाप हे विकासाचे निर्देशक होऊ शकत नाही. त्यावरून सामान्य माणसाच्या परिस्थितीचा यत्किंचितही अदमास लागत नाही. जर मानवी समूहाच्या जीवनात गुणात्मक बदल झाला, तरच तो विकास अर्थपूर्ण असेल, या विषयावर अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या वाद-संवादाला नव्वदच्या दशकात टोक आले. त्या दशकात ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गरेट थॅचर व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी मोकाट अर्थकारणाचा जाहीरनामा घोषित केला होता. ‘सरकारने कल्याणकारी कार्य थांबवावे. पाणी, शिक्षण, आरोग्य यांची हमी घेऊ नये. बाजारपेठेमधील हस्तक्षेप थांबवावा. ते काम खासगी संस्थांवर सोपवावे.’ थॅचर-रेगन आणि मंडळींनी संयुक्त राष्ट्रसंघाची गरिबाभिमुख धोरणे बदलण्यास भाग पाडले.

‘1980चे दशक हे रोजगारहित विकासाचे दशक होते. अशीच स्थिती सुरू ठेवल्यास जगाची वाटचाल विध्वंसाच्या खाईकडे असेल, असा या मोकाट अर्थकारणावर घणाघाती हल्ला पाकिस्तानमधील अर्थवेत्ते डॉ. मेहबूब उल हक यांनी चढवला. त्यांनी अमर्त्य सेन, सुधीर आनंद, कीथ ग्रिफिन, फ्रान्सिस स्ट्युअर्ट यांच्या सहकार्याने विकासाची मीमांसा करणारा अभ्यासगट स्थापन केला. डॉ. हक यांनी ‘शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, जळण, पर्यावरण, यांचा विचार करून माणसांची अवस्था ठरवली पाहिजे,’ हा सिद्धांत 1990मध्ये मांडला आणि जगाच्या अर्थविचारांना कलाटणी दिली. पुढे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकरिता मनुष्यविकास निर्देशांक तयार केला. प्रो. अमर्त्य सेन यांनी त्यांचे घनिष्ठ मित्र डॉ. हक यांच्या विचारांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिले. तेव्हापासून अवघे जग मनुष्यविकास निर्देशांकांच्या घोषणेची दरवर्षी वाट पाहत असते. ‘प्रत्येक देशाचे प्रगती पुस्तक’ अशी ख्याती मनुष्यविकास निर्देशांकाला प्राप्त झाली आहे. (या दोन अर्थतत्त्वज्ञांना जन्माला घालणारे भारत व पाकिस्तान हे सख्खे शेजारी, लष्करी सामर्थ्यामध्ये जगात आघाडीवर आणि मनुष्यविकासाच्या यादीमध्ये जगाच्या तळाशी आहेत.)

पहिला नंबर! सर्व जातिधर्मांतील आबालवृद्धांना या पहिल्या नंबरची विलक्षण भुरळ आहे. त्यामुळे पहिल्या नंबरला भारतभूमीवर सदासर्वदा कमालीचा आदर आहे. हा ‘नंबरी भाव’ सर्वांच्या अंगवळणी पडला आहे. त्यामुळे अनेक भेदभाव जपले गेले आहेत. डॉक्टर, इंजिनियर, सी.ए., आय.टी. पदवीधर यांना घर व शाळेपासूनच विशेषत्व बहाल केले जाते. ‘द कंट्री ऑफ फर्स्ट बॉइज’ या पुस्तकात अर्थतत्त्वज्ञ प्रा. अमर्त्यकुमार सेन म्हणतात, ‘समस्त भारतीयांना प्रदीर्घ काळापासून ‘पहिला क्रमांक’ या लक्षण समूहाने (सिंड्रोम) पछाडलेले आहे.’ 50 वर्षांपूर्वी विंदा करंदीकर यांनी याच भावनेतून ‘एटू लोकांचा देश’ ही कविता लिहिली होती. राष्ट्रीय पातळीवर अतिशय उच्च पदे उपभोगलेल्या व्यक्तींना शाळेतील नंबरचा आणि गुणांचा विसर कधीही पडू शकत नाही. प्रगत देशांत असे फाजील लाड होत नाहीत. भारताच्या संदर्भात सेन म्हणतात, ‘वैयक्तिक पातळीवर न थांबता या ‘लाडांनी’ संपूर्ण शिक्षण व्यवस्था बिघडवून टाकली आहे. केवळ अभिजनांच्या शिक्षणांची काळजी वाहणारी व्यवस्था प्राथमिक शिक्षणाची पुरेपूर उपेक्षा करते. आपल्या देशातील अकार्यक्षम व अतिशय सुमार प्राथमिक शिक्षणयंत्रणेमुळे कोट्यवधी मुले शिक्षणापासून दुरावतात. कुशल मुनष्यबळ निर्माण करण्यातील हा मोठा अडसर आहे. मनुष्यबळाची अशी परवड करणारी अर्थव्यवस्था भक्कम होऊ शकत नाही.’


हेही वाचा : पं. कुमार गंधर्व आणि गीत वसंत - अतुल देऊळगावकर


 

जपानमध्ये 1872 साली ‘शिक्षणाविना कुठल्याही समूहातील एकही कुटुंब वा कुटुंबातील सदस्य अशिक्षित राहणार नाही,’ असा शिक्षणविषयक महत्त्वाकांक्षी जाहीरनामा प्रसृत केला गेला. त्यातून शिक्षणामधील त्रुटींकडे बारकाईने लक्ष दिले गेले. परिणामी, 1910 साली जपान संपूर्णपणे साक्षर होऊन आर्थिक झेप घेण्यासाठी सक्षम झाला. या जपानच्या अनुभवापासून दक्षिण कोरिया, चीन, तैवान, हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड या देशांनी स्फूर्ती घेऊन तोच कित्ता गिरवला. आर्थिक जागतिकीकरणाच्या काळात पूर्व आशियायी देशांचा चमत्कार जगासमोर आला, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिक्षणात केलेल्या गुंतवणुकीची ती परिणिती होती. त्यामुळे या देशात नवीन रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध झाल्या. निर्यात वाढली. आरोग्याच्या समस्या कमी झाल्या. व्यक्ती, समाज व राष्ट्राच्या जीवनात विद्येमुळे कसा ‘अर्थ’ प्राप्त होतो, हे सेन उलगडून दाखवतात. वैयक्तिक व सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडविण्याची किमया शिक्षणच करू शकते. शिक्षण हा अग्रक्रम नसणारे देश विकास घडवू शकत नाहीत, परंतु मोकाट अर्थव्यवस्थेचे पाठीराखे तथाकथित ‘इंटरनॅशनल स्कूल’चा सुळसुळाट पाहून थरारतात. त्यांना शिक्षणदेखील पूर्णपणे बाजारपेठेच्याच हातात सोपवायचे आहे. शिक्षणप्रसार हा दारिद्र्य निर्मूलनातील कळीचा व अटळ भाग आहे, याची जाण असणाऱ्या अ‍ॅडम स्मिथलासुद्धा अशी भांडवलशाही अभिप्रेत नव्हती.

भारतात प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक करण्यातील मोठा अडसर, पायाभूत रचना हाच आहे. अजूनही शिक्षणाच्या महामार्गावर कित्येक जाती-जमातींमधील पहिली पिढी येऊ शकत नाही. भटके व आदिवासींना शिक्षणात सामावून घेण्यासाठी उदार व लवचीक धोरण आवश्यक आहे; परंतु ती प्राथमिकता नसल्यामुळे शिक्षणातील दरी वाढतच आहे. याची खंत बाळगणाऱ्या प्रा. सेन यांनी प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्यसेवा आणि लिंगसमानता रुजविण्यासाठी नोबेल पुरस्काराची पूर्ण रक्कम घालून 1998मध्ये ‘प्रतिची’ या संस्थेची स्थापना केली. (1913 साली रवींद्रनाथ टागोर यांनी नोबेल पुरस्काराची रक्कम ‘शांतीनिकेतन’ स्थापण्यासाठी दिली होती.) बिहार, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांत, ‘अतिशय हलाखीतील पालक कमालीच्या हालअपेष्टा सहन करत मुलांना शिकवण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असतात. प्राथमिक शाळेत दाखल करण्यासाठी भरमसाठ देणग्या मागितल्यामुळे शाळेपासून वंचित राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे,’ असे या संस्थेचे सर्वेक्षण सांगते. शिक्षक आणि आरोग्य सेवकांना अर्पण केलेल्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर, दिल्लीतील वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेला अंगाचे मुटकुळे करून हाताच्या आधारावर डोके टेकवत गृहपाठ करणाऱ्या चिमुकलीचे छायाचित्र आहे.

पाचव्या शतकात साहित्य, भाषाशास्त्र, वास्तुकला, शिल्पकला, खगोलशास्त्र, औषधी विज्ञान, सार्वजनिक आरोग्य ह्या विषयांमधील जगभरातील अभ्यासकांना उच्च शिक्षण मिळवण्याकरिता नालंदा हे एकमेव विद्यापीठ उपलब्ध होते. चीन, जपान व इतर आशियाई देशांमधील विद्यार्थी तेथे अध्ययनासाठी येत असत. 1910पासून झालेल्या हल्ल्यांमुळे, सुमारे 700 वर्षे चाललेली अध्ययन व अध्यापन यात्रा खंडित झाली. (ऑक्सफर्डची स्थापना 1167, केंब्रिज स्थापना - 1209) अशा या ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याची कल्पना सेन अनेक वर्षांपासून मांडत होते. 2007मध्ये आशियाई राष्ट्रांच्या परिषदेमध्ये फिलिपाइन्स, चीन, जपान, कोरिया, सिंगापूर या देशांनी नालंदा विद्यापीठाच्या पुनर्स्थापनेचा ठराव मंजूर केला. पुढे जागतिक पातळीवरील तज्ज्ञांची निवड करून कार्यकारी समिती तयार केली आणि त्याचे नेतृत्व प्रा. सेन यांच्याकडे चालून आले. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदीसुद्धा) यांनी सदैव व सर्व प्रकारचे पाठबळ दिले. सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज यो हे उत्साहाने सहभागी झाले. केवळ व्यापारच नाही, तर ज्ञानसाधनासुद्धा विविध देशांना एकत्र आणू शकते, हे दाखवून देण्यासाठी अनेक नवनवीन कल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणसंस्था निर्माण करण्याचे अथक प्रयत्न चालू होते. मोदी सरकार आल्यानंतर अनेक हस्तक्षेपांमुळे त्याला कशी खीळ बसली, याची सविस्तर कैफियत सेन यांनी मांडली आहे. सर्व सीमांच्या पलीकडे जाऊन विचार करणारी प्रा. सेन, डॉ. अनिल काकोडकर व रघुराम राजन, ही प्रभावळ राष्ट्राचे भूषण असते. त्यांना नाकारून त्यांचे वैयक्तिक नुकसान काहीच होत नाही. राष्ट्राची मात्र अपरिमित हानी होते.

‘रागमाला’ या आत्मचरित्रात रविशंकर यांनी ‘टागोर यांचा जन्म पाश्चिमात्य देशात झाला असता, तर त्यांना शेक्सपियर व गटे यांच्या मालिकेत स्थान लाभले असते,’ असे म्हटले आहे. सेन म्हणतात, ‘हा दावा अतिशयोक्त असला, तरी त्यातून टागोरांच्या विचारांची महती आजही टिकून असल्याकडे रविशंकर लक्ष वेधू इच्छितात. केवळ भारत व बांगला देशच नाही, तर जपान व चीनमध्येसुद्धा आजदेखील टागोर यांच्या लघुकथा, कविता, निबंध व पत्रव्यवहारांना वाचकवर्ग लाभत आहे.’ खुल्या मनाने प्रत्येक बाबीची कसून चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य हे रवींद्रनाथांचे विलक्षण वैशिष्ट्य होते. याबाबत ते काळाच्या खूपच पुढे होते. 1934मध्ये ‘बिहारचा भूकंप म्हणजे जातिभेद पाळण्याची परमेश्वराने दिलेली शिक्षा आहे,’ असे गांधीजी म्हणाले होते. याला जाहीर उत्तर देताना ‘जातिप्रथा ही वाईटच आहे; परंतु भूकंप हा नैसर्गिक आहे, दोन्हींचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही,’ असे रवींद्रनाथांनी स्पष्टपणे सांगितले होते. गांधीजींविषयी असलेल्या अतीव आदरामुळे त्यांना ‘महात्मा’ या उपाधीने गौरवणाऱ्या रवींद्रनाथांनी त्यांच्याशी असणारे मतभेद वेळोवेळी नि:संकोचपणे व्यक्त केले. व्यक्ती वा सत्ता यांच्यामुळे दबून न जाता सुसंस्कृतपणे मतभिन्नता जपण्याच्या स्वातंत्र्याला रवींद्रनाथांनी मूलभूत हक्क मानले. सेन यांनी ‘टागोर यांनी कोणता बदल घडवला?’ या निबंधात रवींद्रनाथांच्या विचारांमधील अभिजाततेची महती उलगडून दाखविली आहे. पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, निसर्ग व मानव, व्यक्ती व समाज, बुद्धी व भावना ही सारी द्वैते मिटवून त्यांच्यात अद्वैत साधत भारताला त्यांनी आधुनिक व उदार विचार दिला. ‘क्षुद्र भिंतीविना अखंड जग, मुक्त ज्ञान आणि भयशून्य मन’ ही रवींद्रनाथांची आकांक्षा पसायदानासारखी त्रिकालाबाधित राहणार आहे.

‘कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण देईल धीर माझ्या जीवा,

शास्त्रज्ञ, पंडित नाही मी एक वाचक, याती शुद्ध एक ठाव नाही.’

संत तुकाराम यांनी सांगितलेली अशी अवस्था, आपल्यासाठी अनेक वेळा होते. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील घटना व प्रसंग साधारणपणे सारखेच असतात. सर्वसाधारण व्यक्ती घटनांच्या खोलात जात नाहीत. एखाद्या घटनेमुळे अस्वस्थ झाल्यास वैयक्तिक निष्कर्ष काढत व्यक्तीला अथवा नशिबाला जबाबदार धरून हा प्रवास थबकतो. असामान्य व्यक्ती खोलवर बुडी मारून त्या प्रसंगामागील कारणांचा शोध घेतात. त्यांच्यामुळे महाकाय व्यवस्थेचे आकलन होते. जटिलता, गुंतागुंत, अव्यवस्था ध्यानात येते. प्रश्नाचे स्वरूप आणि उत्तरांची दिशा समजते. समाजाला विचारांचा आणि विवेकाचा आधार देऊ शकणारे विचारवंत अतिशय दुर्मीळ असतात. वाणी आणि लेखणी यांतून वर्तमानाचा अन्वय घेऊन भविष्यासाठी कृतिआराखडा देणारे प्रा. सेन यांच्यासारखे तत्त्वज्ञ दुर्लभ असतात. महान कलावंत प्रदीर्घ कालखंडभर एखाद्या संकल्पनेचा विस्तार करीत जातात, निरनिराळ्या पद्धतींनी ती समजावून सांगतात. यातून रागमालिका, चित्रमालिका व वास्तुसंकुलं निर्माण होतात. गेल्या 44 वर्षांपासून प्रा. सेन, दारिद्र्यामागील अनेक कारणांचा सखोल मागोवा घेत नवीन पद्धतीने विश्लेषण करीत आहेत. एकाच वेळी तज्ज्ञ व सामान्यांशी संवाद साधताना तशीच मालिका सादर करीत आहेत. विलंबित, द्रुत, टप्पा, तराणा, या सर्व रीतींनी एकच राग ऐकण्याचा अवर्णनीय आनंद शब्दातीत आहे. त्या दर्जाचा आनंद प्राप्त करायचा असेल, तर सुज्ञांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

द कंट्री ऑफ फर्स्ट बॉइज
लेखक - अमर्त्य सेन
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस

ग्रंथाचिया द्वारी : जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा
लेखक - अतुल देऊळगावकर
विश्वकर्मा प्रकाशन
मूल्य - 300 रुपये.

- अतुल देऊळगावकर
atul.deulgaonkar@gmail.com
(पर्यावरण व विकास या क्षेत्रांतील पत्रकारिता करणाऱ्या अतुल देऊळगावकर यांची पुढील पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत - बखर पर्यावरणाची, स्वामीनाथन - भूकमुक्तीचा ध्यास, विश्वाचे आर्त, विवेकीयांची संगती, लॉरी बेकर.)

Tags: साहित्य अतुल देऊळगावकर मराठी साहित्य नवे पुस्तक लॉरी बेकर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस विश्वकर्मा प्रकाशन Load More Tags

Add Comment