वसाहतपूर्व मारवाड प्रदेशातील जातीसंबंधांचा अभ्यास

दिव्या चेरियन यांच्या 'मर्चंट्स ऑफ व्हर्च्यू' या पुस्तकाचा परिचय

पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून | University of California Press Edition

मारवाड प्रदेशातील हिंदू ही धार्मिक अस्मिता मुस्लीम या घटकाऐवजी ‘अस्पृश्य’ या घटकाला विरोध करत तयार झाली असा युक्तिवाद चेरियन करतात. मुस्लिमांचा विचार देखील ‘अस्पृश्य’ अंतर्गत केला गेला हे त्या सप्रमाण दाखवून देतात. राठोड राज्याने (मारवाड साम्राज्य) कायद्यांचा आधार घेत या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावली. थोडक्यात मारवाड प्रदेशामध्ये ‘हिंदू म्हणजे नेमके कोण?’ हे ठरवण्यामध्ये व्यापारी जातींनी महत्त्वाची भूमिका बजावली व अस्पृश्यांपासून सामाजिक अंतर राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

“The everyday social is the domain where the first experiences of social are formed.”
-    Gopal Guru, Sundar Sarukkai (2019)

अलीकडे जातींच्या दैनंदिन अनुभवांचे विश्लेषण करण्याकडे अभ्यासकांचा कल दिसून येतो. विशिष्ट संहिता, साहित्य किंवा जातीविशिष्ट घटना यांचे विश्लेषण करण्याऐवजी दररोजच्या जगण्यामध्ये जातींची भूमिका तपासणे उचित ठरते. अलीकडील जातीच्या अभ्यासपद्धतींत झालेला हा मुख्य बदल होय. दिव्या चेरियन यांचा ‘मर्चंट्स ऑफ व्हर्च्यू’ (नवयान प्रकाशन, 2023) हा अभ्यास याच ‘Quotidian Caste history’चा भाग म्हणून पाहता येईल.

जातींचा इतिहास तपासताना या पुस्तकाच्या माध्यमातून व्यापारी जातींची भूमिका चेरियन समोर मांडतात. यासाठी त्यांनी राजस्थानमधील मारवाड या राजपूत साम्राज्याचा अभ्यास सादर केला आहे. महाराज विजय सिंग यांच्या कारकिर्दीमधील (1752-93) विविध अभिलेखांचे (archives) विश्लेषण करत त्यावरील व्यापारी जातींच्या प्रभुत्वाची नोंद करतात. ‘महाजन’ या एकाच संज्ञेखाली जैन, वैष्णव व काही प्रमाणात ब्राह्मण व्यापारी जातींचा विचार केला जाणे हा त्याचाच भाग होय. मारवाड प्रदेशातील ‘हिंदू’ जाणिवा, अस्मिता याच महाजनांच्या प्रभावाखाली घडत गेल्या व त्या मुख्यतः ‘अछेप’ - अस्पृश्यांना विरोध करत आकाराला आल्या असा या पुस्तकाचा मुख्य दावा आहे.

यापूर्वी वसाहतपूर्व काळातील ‘हिंदू’ जाणिवांचा, अस्मितांचा वेध घेताना मुस्लीम समुदायांची उपस्थिती महत्त्वाची मानली गेली. मुस्लीम ‘इतर’ला विरोध करत हिंदू ‘स्व’ घट्ट होत गेला असा हा युक्तिवाद होय (रोमिला थापर- 1989, दालमिया- 1995). या उलट काही अभ्यासक (ख्रिस्तोफर बायली-1985, टालबोट-1995) ‘हिंदू’, ‘मुस्लीम’ अशा काटेकोर विभागणीला नकार देताना पंथीय अस्मिता (sects) प्रधान मानतात. मारवाड प्रदेशातील हिंदू ही धार्मिक अस्मिता मुस्लीम या घटकाऐवजी ‘अस्पृश्य’ या घटकाला विरोध करत तयार झाली असा युक्तिवाद चेरियन करतात. मुस्लिमांचा विचार देखील ‘अस्पृश्य’ अंतर्गत केला गेला हे त्या सप्रमाण दाखवून देतात. राठोड राज्याने (मारवाड साम्राज्य) कायद्यांचा आधार घेत या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावली. थोडक्यात मारवाड प्रदेशामध्ये ‘हिंदू म्हणजे नेमके कोण?’ हे ठरवण्यामध्ये व्यापारी जातींनी महत्त्वाची भूमिका बजावली व अस्पृश्यांपासून सामाजिक अंतर राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला. अनिकेत जावरे त्यांच्या ‘प्रॅक्टिसिंग कास्ट’ (2019) मध्ये नमूद करतात त्याप्रमाणे, स्पृश्य-अस्पृश्यतेचा व त्याच्याशी संबंधित असणाऱ्या शारीर नीतिशास्त्राचा (bodily ethics) विचार इथे गरजेचा ठरतो.

कोणत्याही ऐतिहासिक अभ्यासासाठी ‘साधनांचा’ विचार महत्त्वाचा असतो. गतकाळातील दैनंदिन घटनांचा वेध घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऐतिहासिक साधनांची तशी वानवा आहे. प्रस्तुत पुस्तकातील दावा सिद्ध करण्यासाठी राठोड राज्यसंस्थेतील अभिलेखांचा (Archives) आधार घेतलेला आहे. प्रामुख्याने, जोधपूर सनद परवाना वही (JSPB) व त्यातील आदेशांवर हे पुस्तक बेतलेले आहे. या वह्यांचे वैशिष्ट्य असे की, 3x1 फूट असणाऱ्या या वह्यांमध्ये राज्य व नागरिक यांच्यातील दैनंदिन व्यवहारांच्या नोंदी सापडतात. विविध तक्रारी, मागण्या, याचिका स्वरूपात या नोंदी आहेत. वह्यांच्या मार्फत राज्यातील घडामोडींची नोंद ठेवणे हाच व्यापारी मनोवृत्तीचा भाग म्हणता येईल. वसाहतपूर्व काळातील दस्तऐवजीकरणाचा एक प्रवाह या निमित्ताने खुला झाला आहे. या अर्थाने, हा अभ्यास मुख्यतः राज्यकेंद्री आहे, ही याची जमेची बाजू व मर्यादा म्हणून देखील पाहता येईल. 

या नोंदीमधील आदेश हे व्यक्तींना उद्देशून नसून विशिष्ट पदांना उद्देशून केलेले आहेत (उदाहरणार्थ, हकीम, कोतवाल). परिणामी एक व्यक्तिनिरपेक्ष व नोकरशाहीसदृश प्रशासनाकडे होणारी वाटचाल म्हणूनसुद्धा यांकडे पाहता येते. या पूर्वीच्या अभ्यासांमध्ये ‘राज्या’चा (State) विचार करताना मुख्यतः राजा व दरबारी राजकारणाला प्रधान स्थान दिले गेले. इथे ‘राज्य’ या संकल्पनेचा सखोल विचार करताना स्थानिक अधिकारी व पदांचा समावेश केलेला आहे. यापूर्वी कायस्थ या पदाबाबतही असा विस्तृत अभ्यास झालेला पाहता येतो. (R. O'Hanlon, 2010)

अठराव्या शतकातील बहुतांशी राज्यव्यवस्थांमध्ये महाजनांनी आपले स्थान निर्माण केल्याचे दिसून येते. प्रशासक, लेखनिक, दरबारी अशा विविध स्वरूपांत व्यापाऱ्यांची प्रशासनामध्ये उपस्थिती होती. राज्याच्या लष्करी, राजकीय व आर्थिक-व्यापारी कार्ये यांतील ही गुंतागुंत होय. या प्रक्रियेची मुळे मुघल राज्यसंस्था व त्यातील आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टपणे सापडतात. या संदर्भात संजय सुब्रमण्यम यांनी ‘पोर्टफोलिओ कॅपिटॅलिस्ट’बद्दल लेखन केले आहे. तर काही अभ्यासक मुघल ऱ्हासाचे कारणच मुळी गुजरातमधील ‘बँकिंग हाऊसेस’मध्ये शोधतात. एस.गोपाळ यांच्या ‘वीरजी वोरा’ (2017) या लेखाचा उल्लेख इथे प्रस्तुत ठरेल. निर्यातीच्या माध्यमातून येणारा नफा व या नफ्यातून सावकारीमध्ये उतरलेल्या व्यापारी वर्गाने स्वतःचे आर्थिक व राजकीय स्थान अधिक घट्ट केले. औरंगजेबालाही कर्ज नाकारण्याची ताकद या व्यापाऱ्यांमध्ये होती. एकूणच एक ‘राजकीय वर्ग’ म्हणून व्यापाऱ्यांचा या काळात झालेला उदय बहुतांशी अभ्यासक नोंदवतात. मुघलोत्तर राजपूत व्यवस्थांमध्ये याच प्रक्रियांचे पडसाद उमटलेले दिसतात. यातूनच मारवाडी व्यापाऱ्यांचा एक मोठा वर्ग पुढे आल्याचे दिसते.  


या पुस्तकाच्या लेखक दिव्या चेरियन या प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये इतिहास विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून इतिहासात पी एचडी, एमफिल आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथून इतिहासात एम.ए.ची पदवी प्राप्त केली आहे.


प्रस्तुत पुस्तकाची रचना ही दोन भागांत केलेली आहे. पहिल्या भागामध्ये (‘Other’) ‘अछेप’- अस्पृश्य जातींपासून सामाजिक अंतर राखण्यासाठी अभिजन हिंदू व्यापाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे वर्णन केलेले आहे. यात तीन प्रकरणे आहेत - Purity, Hierarchy, Discipline. दुसऱ्या भागात ‘इतरांच्या’ बरोबर ‘स्व’ची घडण स्पष्ट केलेली आहे. इथे उच्च जातीयांच्या शरीराचे नियमन-नियंत्रण करून ‘आदर्श शरीर’ निर्माण करण्याच्या प्रयत्नांचे वर्णन आहे. दुसऱ्या भागातील तीन प्रकरणे आहेत - Nonharm, Austerity, Chastity. या दोनही भागांची पार्श्वभूमी स्पष्ट करणारे ‘पॉवर’ नावाचे सुरुवातीचे प्रकरण आणि शेवटी दक्षिण आशियाई संदर्भात या बदलांचे उत्तरायुष्य तपासणारा व मारवाडी व्यापाऱ्यांचे सनातनी धर्माशी असणारे संबंध उलगडणारा उपसंहार (Epilogue). अशी एकंदर पुस्तकाची रचना आहे.


हेही वाचा : जातीनं घडवलेल्या आत्मतत्त्वाची एकविसाव्या शतकातील रूपं - सुरज येंगडे


पहिल्या प्रकरणामध्ये पंधराव्या शतकानंतरच्या मारवाड प्रदेशातील सामाजिक, राजकीय व आर्थिक बदलांचे चित्रण केले आहे. यात प्रामुख्याने विजय सिंह यांचा वल्लभ संप्रदायातील प्रवेश (1765) व कृष्णभक्त म्हणून स्वतःला पुढे आणण्याचा प्रयत्न महत्त्वाचा ठरतो. जोधपूर दरबाराने प्रकाशित केलेल्या ऐतिहासिक वंशावळींमध्येही (khyat) विजय सिंह याचा ‘gusain’ असा उल्लेख सापडतो (Gusain हा ‘गोस्वामी’चा स्थानिक अपभ्रंश). वल्लभाचार्य यांच्या वारसदारांना प्रतीकात्मक स्वरूपात दिलेली ही पदवी होय. या वैष्णव श्रद्धेच्या पाठपुराव्यातूनच राठोड राज्याची मायबाप अशी प्रतिमा तयार झाल्याचे मत नंदिता सहाय (2007) नोंदवतात. कृष्णभक्ती हाच राजा आणि महाजन यांच्यातील समान दुवा होय. एका बाजूला व्यापारातील प्राबल्य तर दुसरीकडे प्रशासनातील सहभाग या आधारे व्यापाऱ्यांचे राजकीय स्थान अधिक घट्ट होत गेल्याचे चेरियन सप्रमाण दाखवून देतात. दिवाण, बक्षी, पांचोली, मुश्रफ, हकीम, दरोगा, कोतवाल, सयार, इत्यादी महत्त्वाच्या पदांवर जैन, वैष्णव व ब्राह्मणी जातींचे वर्चस्व दिसून येते. थोडक्यात, ‘devotion’ आणि ‘debt’ या शब्दांच्या आधारे त्यांनी हे स्पष्ट केले आहे.
“Living next to a leatherworker violates my dharma” (p.46)
“If they drink water there, my dharma will remain intact.” (p.47)
महाजनांनी सत्तेचा वापर करत ‘अछेप’- अस्पृश्यांपासून सामाजिक अंतर राखले. उदाहरणस्वरूप म्हणून उपरोक्त याचिका पाहता येतील. स्वतःचा स्वतंत्र, स्वायत्त व शुद्ध असा अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो. 

अस्पृश्य म्हणजे नेमके कोण याची चर्चा दुसऱ्या प्रकरणामध्ये केलेली आहे. तुरक, चमार, धेड, थोरी, बावरी, भंगी, भांबी, मेघवाल, हलालखोर- यांचा ‘अछेप’ असा उल्लेख अभिलेखांमध्ये सापडतो. याच्या कक्षा जरी रुंदावत्या असल्या तरी ‘भंगी शरीर’ हा अस्पृश्यतेचा गाभा असल्याचे निरीक्षण चेरियन नमूद करतात. भंगीकामाशी भंगी शरीर जोडले गेले असल्याकारणाने हे घडून आल्याचे दिसते. मेड़ता (1775) , पीपाड़ (1774) या गावांतील जटिया व मेघवाल या अस्पृश्य जातींपासून अंतर राखण्यासाठी त्यांच्या पूर्ण वसाहतींचे पुनर्वसन केले गेले. यासाठी आवश्यक खर्च उचलण्याची तयारी देखील महाजनांनी दाखवल्याची नोंद आहे. आर्थिक व नैतिक अशा दोन्ही पातळ्यांवर हा प्रयत्न झाल्याचे दिसते. महाजन जातींची नीतिमूल्ये – उदाहरणार्थ, अहिंसा, शाकाहार इत्यादींविरोधी गोष्टी ‘अछेप’ ठरवून बाजूला सारल्या गेल्या. एकूणच वासाहतिक आधुनिकतेच्या परिणामस्वरूप म्हणून नव्हे तर पूर्व वासाहतिक कायद्यांमध्येसुद्धा अस्पृश्यता स्पष्टपणे पाहता येते.

तिसऱ्या प्रकरणामध्ये राज्याने धार्मिक परंपरा व व्यवहारांमध्ये केलेल्या हस्तक्षेपांची चर्चा केलेली आहे. यात राजपूत-मुस्लीम संबंधाचा आलेख रेखाटताना राजपूत दरबारांमधील मुस्लीम संकल्पन कसे आकाराला आले याचे चित्रण केले आहे. राज्य पुरस्कृत कथांमध्ये मुस्लिमांना ‘राजकीय शत्रू’ मानून त्यांना ‘इतर’ ठरवले गेले अशी टिप्पणी चेरियन करतात. उदाहरणस्वरूप उदयपूर व सिसोदिया दरबारांतील कथा पाहता येतील. ‘पद्मिनी’ या कथेची पुनर्मांडणी करताना अल्लाउद्दीन खिलजीचा संबंध ‘अशुद्धते’शी (impurity) जोडला गेला. मुघलांपासूनचे लष्करी व सांस्कृतिक वेगळेपण व स्वतःचे राजकीय, सामाजिक वर्चस्व राखण्याचा प्रयत्न वारंवार दिसून येतो. त्यामुळे मुस्लिमांना अछेप म्हणूनच गणले गेले. राठोड राज्यासाठी ‘हिंदू’ ही संकल्पनाच मुळी मुस्लीम व अछेप यांना वगळून साकार होते.

‘Discipline’ या नावाच्या चौथ्या प्रकरणामध्ये मांसाहारविरोधी धोरणाची सखोल चर्चा केलेली आहे. महाजनांसाठी शाकाहार हे नैतिक मूल्य आहे. यामुळेच राज्याच्या विविध पदांवर असणाऱ्या महाजनांनी मृत जीवांशी अथवा मांसाहाराशी संबंध ठेवणाऱ्या समूहांना ‘निम्न’स्तरीय व ‘इतर’ ठरवले. अशी कृत्ये बेकायदेशीर मानली. याचा सर्वाधिक फटका अस्पृश्यांना बसला. थोरी, बावड़ी आणि सांसी या खाटीक जातींच्या संदर्भात ही गोष्ट अधिक विस्ताराने स्पष्ट केली आहे. मेड़तामधील काही आदेशांमध्ये प्राणीहत्या हा सांसी (samsis) जातीच्या व्यक्तीचा स्वभावगुण म्हणूनच बघितला गेला. यातूनच सामाजिक देखरेखीचे नवे धोरण समोर आले, ज्यात प्रत्येकजण बातमीदार होता! वासाहतिक काळातील ‘गुन्हेगारी जातींचा पूर्वेतिहास’ म्हणून याकडे पाहता येईल. चेरियन यांच्या मते, मांसाहारविरोधी धोरण हा मारवाडमधील हिंदू अस्मिता घडण्यातील महत्त्वाचा भाग होय.  

भाग दोन मधील तीन प्रकरणे उच्च मानल्या गेलेल्या जातींमधील शरीर-नियमन व नियंत्रणाची चर्चा करतात. उच्चजातीय शरीर व त्याची नीतिमत्ता जपण्यासाठी अधिकाधिक बंधने लादली गेल्याचे पाहता येते. खान-पान, लैंगिक व्यवहार, संपर्क इत्यादी संदर्भात शारीरिक शिस्तीचा आग्रह याच कारणास्तव. यातूनच हिंदू ‘स्व’ किंवा हिंदू म्हणजे नेमके कोण याचे निकष घट्ट होत गेले. राठोड राज्याने स्वीकारलेल्या टोकाच्या अहिंसेतून प्राणीहत्येवरील संपूर्ण बंदी लागू केली गेली. प्राणीहत्येबाबत कमालीची संवेदनशीलता (उदाहरणार्थ, शेणातील कीटक, मुंगी इत्यादींपासून तेलाच्या दिव्यांना आवरण घालण्यापर्यंतचे आदेश) बाळगणाऱ्या राठोड अभिलेखांमध्ये स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भात केवळ तीन नोंदी सापडतात! 

महाजन जातींमध्ये व्यावसायिक यश हे जातीअंतर्गत प्रभावाशी अव्याहतपणे जोडलेले आहे. म्हणूनच व्यापार आणि प्रशासन दोन्ही पातळींवर यशस्वी ठरलेल्या जातींनी स्वतःच्या नैतिक मूल्यांचा-  ‘सद्गुणांचा’ आग्रहाने पाठपुरावा केला. सट्टेबाजी, मद्यपान, गर्भपात इत्यादी संदर्भांतील बंदी याचाच परिणाम म्हणून पाहता येईल. राज्याने या संदर्भात कायदे करून त्यांची अंमलबजावणी करण्यावर विशेष लक्ष दिले. व्यावहारिक पातळीवर ही बंदी प्राणीहत्येप्रमाणे सार्वत्रिक न राहता केवळ ‘महाजन’ जातींपुरती मर्यादित राहिलेली दिसून येते. महाजन जातींचे लैंगिक आयुष्य नियंत्रित करण्याचा प्रयत्नही उघडपणे दिसून येतो. जात आणि राज्यसंस्था यांनी ‘अनैतिक लैंगिक संबंधा’ची चर्चा करताना लगवाड (Lagvad), चमचोरी (Chamchori) यांसारख्या अनैतिक मानल्या गेलेल्या गोष्टी उच्च जातींत घडू नयेत यासाठी खास प्रयत्न केले गेले. 

सनातन धर्म चळवळीत मारवाडी व्यापाऱ्यांनी निभावलेल्या भूमिकेची थोडक्यात चर्चा चेरियन ‘उपसंहारा’मध्ये करतात. वासाहतिक आधुनिकतेला मारवाडी व्यापाऱ्यांनी सनातनी मार्गाचा स्वीकार करत प्रतिसाद दिला. सनातनी धर्म व त्याच्या पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या संस्था-संघटनांना आर्थिक निधीच्या स्वरूपातील मदत, तसेच सनातनी साहित्य प्रकाशित करणाऱ्या छापखान्यांमधील मारवाडी गुंतवणूक या संदर्भात लक्षात घेण्याजोगी ठरते. (उदाहरणार्थ, मुंबईमधील व्यंकटेश्वर छापखाना, उत्तर प्रदेशातील कल्याण नियतकालिक व गीता प्रेस.) 

सार्वत्रिक – सगळ्यांना लागू होतील अशी – नीतिमूल्ये शक्य असतात का? काही विशिष्ट नीतिमूल्येच सार्वत्रिक होतात का? होत असतील तर ती कशी? या सर्वच प्रश्नांच्या उत्तर स्वरूपात या पुस्तकाकडे पाहता येईल. आर्थिक समृद्धी लाभलेल्या व्यापारी जातींनी – महाजनांनी – स्वतःच्या नैतिक मूल्यांना सार्वत्रिक करण्यासाठी राज्याचा आधार घेतला. यातूनच ‘हिंदू’, ‘मुस्लीम’ व ‘अस्पृश्य’ असण्याचे ठराविक साचे तयार होत गेले अशा निष्कर्षाप्रत या पुस्तकाच्या वाचनाने आपण पोहोचतो. या अर्थानेच हे महाजन ‘मर्चंट्स ऑफ व्हर्च्यू’ होत!

मर्चंट्स ऑफ व्हर्च्यू (2023)
दिव्या चेरियन
नवयान प्रकाशन, नवी दिल्ली.
पृष्ठ संख्या - 255. मूल्य : रुपये 599/-

- अजिंक्य घावटे, कोरेगाव भीमा
ajinkya8032@gmail.com 


हेही वाचा : 

 

Tags: Merchants of Virtue Divya Cherian New Book Navayan Publication Book Review Sadhana Digital Marwar Load More Tags

Add Comment