दिलराज कौर, बातच और!

एका गुणी गायिकेच्या पासष्टीनिमित्त... (21 मे)

चित्रपट गीतं, गझल, भजन, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत असे अनेक प्रकार गाणाऱ्या लोकप्रिय आणि गुणी गायिका दिलराज कौर. हिंदी, पंजाबीसह मराठीतही त्यांची काही गाणी आहेत. मातीशी जुळलेली ही गायिका आहे. त्यांच्यासोबत नागपूर- गोंदिया- नागपूर असा प्रवास करण्याची संधी मिळाली. वर्ष होतं 2000. या मधल्या काळात ना कोई खत-ना पैग़ाम, ना कोई दुआ-सलाम. डायरीत मात्र त्यांनी दिलेला पत्ता अजूनही तसाच. सोबत केलेला तो प्रवास, त्या आठवणी त्यानंतर इतक्या वर्षांनी शब्दबद्ध केल्या.

"नको प्रिया छेड काढू, नको मला ओढू, माझ्या अंतरीचे नको सूर छेडू..." आणि "भेट ती झाली तुझी अन गंधता आली जीवा
फूल मी झाले कळीचे, धुंदली सारी हवा..." 
ही दोन गाणी सातवी- आठवीला असताना रेडिओवर खूपदा ऐकली. थँक्स टू आकाशवाणी नागपूर. उद्‌घोषक किंवा उद्‌घोषिका सांगायचे, हे गीत गायलंय दिलराज कौर यांनी, गीत उमाकांत काणेकर यांचं आणि संगीत दिलंय श्रीकांत ठाकरे यांनी. दिलराज कौर हे नाव कानी पडलं की लक्ष वेधलं जायचं. या नावाविषयी आणि या व्यक्तिमत्त्वाविषयी मनामध्ये अनामिक ओढ जागायची. या आवाजाला भेटायची हुरहूर लागायची. आयुष्यात किमान एकदा दोन क्षणांपुरतं का होईना भेटता यावं, असं कल्पनेतच वाटायचं.

पुढं नॅशनल पॅनॉसानिकचा टू इन वन टेपरेकॉर्डर गोव्याला राहणाऱ्या मामानं आणून दिला. मग काय मज्जाच. आवडीची गाणी रेकॉर्ड करून ठेवायला लागलो. इतर गाण्यांसोबतच ही दोन गाणीही रेकॉर्ड केली. आता हवी तेव्हा ऐकत होतो. अनेकदा तर वायर लांबवून, अंगणात स्टुलावर टेपरेकॉर्डर ठेवायचा अन पपईच्या झाडाच्या बाजूला खुर्चीवर बसून गाणी ऐकायची, असा कार्यक्रम चालायचा. जाणारी- येणारी मुलंही थांबून गाणी ऐकत. गावात फक्त आमच्याकडंच हे यंत्र असल्यानं सर्वांना मोठं अप्रूप होतं. पुढं हिंदीतील 'तुम खुद को देखते हो सदा अपनी नज़र से...', 'होंठ हैं तेरे दो लाल हीरे...' ही उडत्या चालीची गाणी परिचयाची झाली, पण ही गाणी आशा भोसले नव्हे तर दिलराज कौर यांनी गायली आहेत, हे थोडं उशिरा कळलं.

नागपुरात आल्यावर आणि पत्रकारितेत पाऊल ठेवल्यावर सांस्कृतिक क्षेत्राची जवळून ओळख झाली. अशातच एकदा दिलराज कौर नागपूरला आल्या असल्याचं कळलं. आयोजकांच्या माध्यमातून संपर्क साधला. मुलाखतीसाठी भेटीची वेळ ठरली. लोकमत चौक परिसरातच कोठारी कुटुंबीयांकडं त्या आल्या होत्या. त्यांना नमस्कार केला. त्यांनीही दोन्ही हात जोडून प्रतिसाद दिला. शुभ्र पंजाबी पोशाख. डोक्यावरून नीट घेतलेली ओढणी. त्यावर चकाकणारे रुपेरी ठिपके. प्रसन्न वाटत होत्या. खाली सतरंजीवर बसल्या होत्या. त्यांच्या बाजूलाच बसलो. छोटेखानी मुलाखत छान झाली. चित्रपटसृष्टी कमालीची बदलली. आधीचा काळ निघून गेला, तसं आधीचं संगीत, तो गोडवा, ती गाणी, ती माणसं सारं बदललं, याची त्यांना खंत होती. त्या म्हणाल्या, अनेक जण या क्षेत्रात आल्यावर आपलं मूळ नाव बदलतात. मी नाही बदललं. बदलायला हवं होतं का?

मी म्हणालो, दिलराज हे नाव खूप सुंदर आहे. आप अपने फन से ‘दिलों’ पर ‘राज’ करती हैं।
त्यांनी हसून दाद दिली. त्यांना माझं म्हणणं पटलं होतं.

त्यांनी अनेक हिंदी गाणी गायली आहेत. मी मात्र त्यांना त्यांच्या मराठी गीतांची आठवण करून दिली. त्यांना खूप आनंद झाला. हा संवाद छोट्या टेपरेकॉर्डरवर रेकॉर्ड करण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. त्यांनी ती सहज दिली. निघताना त्यांना त्यांनी गायलेलं मराठी गाणं गुणगुणायची विनंती केली. त्या म्हणाल्या, कोणतं म्हणू?
मी म्हणालो, नको प्रिया छेड काढू...

त्या म्हणाल्या, मी दुसरं गाते. ‘सांग ना कुठे जाऊ...’ चालेल? मी म्हणालो, हो चालेल. त्याही हसत म्हणाल्या, चालेल!
सांग ना कुठे जाऊ?
वेदना कुणा  दाऊ?
रुसले प्रिया संगीत रे
कंठी रुते मम गीत रे
थकल्याच या विरही मना
नको शिक्षा देऊ...

दिलराज कौर ही श्रेष्ठ गायिका खास आपल्यासाठी गात आहे, हा आनंदच खूप मोठा होता. जायला निघालो, तेव्हा त्या म्हणाल्या, उद्या गोंदियाला दुपारी सत्संग आहे. चलना हैं आपको? मला काय! माझ्यासाठी ही सुवर्णसंधी होती. मी म्हणालो, हां, जरूर आ सकता हूँ. त्या म्हणाल्या, अरे तो चलिए ना हमारे साथ. बहुत अच्छा लगेगा हमें.

ठरल्याप्रमाणं दुसऱ्या दिवशी सकाळी मी साडेसहाला पोहचलो. त्या अगदी तयार होत्या. हसत म्हणाल्या, आपको देख कर बहुत खुशी हुई. मुझे नहीं लगा था के आपको मुमकिन हो पायेगा.
 

कारमध्ये मी आणि कोठारी दाम्पत्य मागं बसलो. दिलराज कौर चालकाच्या बाजूला बसल्या. निघालो आम्ही गोंदियाच्या दिशेनं. प्रवासात बऱ्याच गप्पा. कोठारी कुटुंबियांशी त्या आध्यात्मिक विषयांवर बोलत. माझ्याशी बोलताना आदल्या दिवशीच्या गप्पांचा संदर्भ होता. सुनील दत्त यांच्याविषयीची एखादी आठवण. मग संजय दत्त आणि टीना मुनीम यांचा एखादा किस्सा. (वर “संजयजी देखिए, बिल्कुल पर्सनलाइज्ड बातें बता रहीं हूं मैं” अशी ताकीद)

प्रवासादरम्यान वातावरण आल्हाददायक होतं. आकाश काहीसं ढगाळ होतं, मात्र पावसाची काही चिन्हं नव्हती. काही वेळानं ऊन वाढलं. एका ढाब्यावर आम्ही थांबलो. दिलराज यांनी सोबत आणलेलं लिंबू- पाणी घेतलं, आम्ही चहा घेतला. सोबत बिस्किटं होती. कोठारी यांनी दिलराज यांना सांगितलं की ही त्यांच्या स्वतःच्या कंपनीची बिस्किटं आहेत. त्या आश्चर्य व्यक्त करीत कोठारी यांना म्हणाल्या, संजयजी को भी यह बात बताइये. मी तर हे ऐकतच होतो. मीही आनंदानं काही बिस्किटं घेतली. रस्त्यानं  दिसणारी काही घरं बघत दिलराज म्हणाल्या, मला ही अशी मातीची घरं खूप आवडली. लोकांनी मातीशी आपलं नातं जपलं आहे.

सकाळी साधारण साडेदहाला आम्ही गोंदिया येथे पोहचलो. दिलराज विश्रांतीसाठी बाजूच्या खोलीत गेल्या. थोड्या वेळानं जेवण आटोपून आम्ही सर्व गावाबाहेर एका शेतात, मोकळ्या जागेत पोहचलो. तिथं मंडप टाकला होता. दिलराज छोट्याशा मंचावर बसल्या. त्यांचा सत्संग सुरू झाला. बरेच नागरिक गोळा झाले होते. सर्व शांतपणे श्रद्धेनं ऐकत होते. आता पावसाची रिमझिम सुरू झाली होती.  तरी ३०० ते ४०० लोक जागेवर बसून होते. मीही त्यांच्यातील एक झालो. मांडी घालून बसलो. मध्येच वीज जायची. स्पीकर बंद व्हायचे. तरीही सत्संग सुरूच. आध्यात्मिक मार्गदर्शन आणि सुमधूर गायन. काही वेळानं पाऊस थांबला. एक- दीड तास सत्संग चाललं. नंतर सर्वांसाठी लंगर. म्हणजे थोडा भात, त्यावर थोडं वरण. मीही ते घेतलं. घरी परतल्यावर तीन -चार तास जोरदार पाऊस झाला.  पुन्हा जेवणाचा आग्रह. रात्री ८.१० ला पुन्हा त्याच ठिकाणी तास दीड तास सत्संग. घरी आल्यावर दिलराज यांनी ‘आपने खाना खाया कि नहीं?’ विचारत माझी आस्थेनं चौकशी केली. म्हणाल्या, आप दिन भर साथ हैं, अच्छा लगा. सत्संग कैसा लगा? माइक ठीक था, नहीं था... तबला फास्ट बजा रहें थे ना!  

काहीच वेळात म्हणजे रात्री १०.३० ला आमचा गोंदिया ते नागपूर परतीचा प्रवास सुरू झाला. यावेळी कारमध्ये  कोठारी कुटुंबातील एक आज्जी, दिलराज कौर, मी आणि चालक.

गाडी पेट्रोल पंपावर थांबली, तेव्हा दिलराज म्हणाल्या, खत भेजते रहना, मैं पता दे दूंगी बाद में.
मी म्हणालो, अभी दे दीजिये. बाद में मुझे याद नहीं रहेगा. त्यांनी सांगितलेला मुंबईतील पत्ता मी डायरीत शेवटच्या पानावर लिहून घेतला. अन् सुरू झाला अविस्मरणीय प्रवास!

काळोखाची रात्र होती. रिमझिम पाऊसही सुरू झाला. राष्ट्रीय महामार्ग असल्यानं ट्रक अतिशय वेगानं जवळून जात. क्षणभर भीती वाटायची. दिलराज म्हणायच्या, ये ट्रक देखिए, सिग्नल भी नहीं देता.  ये ट्रक देखिए, इसके पीछे तो लाइट भी नहीं हैं.

रस्त्यात घनदाट जंगल लागलं. आता पाऊसही धुवांधार बरसत होता. चालकाला फार सावधपणे गाडी चालवावी लागत होती. फार पुढचं दिसत नव्हतं. मी माहिती पुरवली, यह कोहमारा जंगल का इलाका हैं. त्या म्हणाल्या, मुझे तो कोहिमा याद आ गया. हा सर्व नक्षल प्रभावग्रस्त परिसर आहे, हे मी त्यांना मुद्दामच सांगितलं नाही.

पुढं साकोली जवळ आल्यावर रस्त्याच्या बाजूला नागझिरा अभयारण्याकडं जाण्याचा फलक दिसला. त्यावर वाघाचं छायाचित्र होतं. मी नागझिऱ्याविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, मुझे लगा की यहां नज़दीक ही शेर हैं.

आमच्या ‘रंगधून’ या संस्थेविषयी  माहिती दिली. त्या म्हणाल्या, सांस्कृतिक वातावरणात राहिलो तर आपण ताजेतवाने राहतो. कोणतीही कला आनंदच देत असते. मला लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना जाणून घेणं फार आवडतं. यात आनंद मिळतो. आपल्यामुळं कुणाचं थोडंसंही मन दुखावलं जाऊ नये, असं वाटतं. खरं तर आपण सर्व जण एकमेकांशी जुळलेलो आहोत.

दिलराज या चित्रपट क्षेत्रातील गोष्टी सांगण्यात रंगून गेल्या. त्यांनी निसर्गाविषयीचंही प्रेम व्यक्त केलं. त्या सांगत होत्या, आपण दोन- चार दिवसांनंतर जेव्हा घरी परततो, अन्‌ फुलझाडांकडं बघतो, तेव्हा वाटतं की आपल्याला बघून ती फुलारून आली. त्यांना उत्साह आला. जणू ती आपली वाट बघत होती. त्यांचं म्हणणं मलाही पटत होतं.

मध्येच एखाद्या गीताचा विषय निघायचा. आताची गाणी, जुनी गाणी. समीर फारशी दर्जेदार गाणी लिहीत नाहीत. उनके गाने चल जातें है. असं त्यांचं मत होतं. आमच्या अशा गप्पा सुरु असताना सोबतच्या आजीबाई मात्र झोपी गेल्या होत्या. त्यामुळं थोडं हळू बोलावं लागायचं. चालक अधूनमधून चर्चेत सहभागी व्हायचा. दिलराज यांनी त्याचीही चौकशी गेली. तो मूळचा बिहारचा होता.

माझ्या बोलण्यातून त्यांना माझ्या गीत-संगीताबद्दलच्या आवडीचा अंदाज आला होता. त्या म्हणाल्या, आपको कौनसे संगीतकार पसंद हैं?  उत्तर देणं सोपं नव्हतं. आवडीच्या अनेक नावांपैकी मी तीन नावं सांगितली.  सज्जाद, गुलाम महंमद, हुस्नलाल-भगतराम. त्यांना या नावांची अपेक्षा नसावी. कारण ही जुन्या पिढीतली नावं आहेत. त्या म्हणाल्या, पं. अमरनाथ हे प्रतिभावंत संगीतकार होते. खय्याम यांचाही विषय निघाला. ‘उमराव जान’ सोबतच 'बाजार'चाही विषय ओघानं आला. या चित्रपटात मीर, मखदुम मोहिउद्दीन, बशर नवाझ यांची गाणी असल्याची माहिती मी जोडली. त्यांना अशी माहिती आवडायची. 

त्या म्हणाल्या, "संगीतकार नौशाद फोन करतात कधी आठवण आली तर. अर्धा-अर्धा तास गप्पा मारतात... 

अशोक कुमारशीही भेट होते असते. एकदा भेटले तर मी त्यांना त्यांचंच गाणं ऐकवलं होतं, ‘मैं बन की चिड़िया बन के बन बन बोलू रे’ ते खूप मोठ्यानं हसायला लागले...

मागे एकदा विजय आनंद भेटले. ‘गाइड’ चित्रपटातील गीतांचा विषय निघाला. त्यांनी सांगितलं की, ‘दिन ढाल जायें...’ हे गाणं आधी हसरत जयपुरी यांना लिहायला सांगितलं होतं. ते गाणं समाधानकारक न वाटल्यानं शैलेंद्र यांच्याकडून ते लिहून घेण्यात आलं...

मी या क्षेत्रात आले तेव्हा शंकर नव्हते, जयकिशन होते...

'सोल टू सोल' या माझ्या कॅसेटच्या कव्हरवर माझा फोटो आहे. ओळखू येतच नाही की कोणत्या देशातील आहे. ती कॅसेट विदेशात निघाली आहे... 

मला पाश्चिमात्य संगीतसुद्धा आवडतं. चांगलं असतं ते पण...

मोझार्ट आवडतो का? मोझार्टवर एक फ़िल्म निघाली आहे. ती मागवा, बघा. आवडेल तुम्हाला. मोझार्टच्या जीवनातील प्रसंगांचं नाट्यीकरण केलं आहे त्यात...

मला लतादीदी म्हणाल्या होत्या, तुझी मराठी गाणी छान आहेत. तुझे उच्चारही खूप छान आहेत..." 

दिलराज कौर यांच्या विचारांना अध्यात्माचा स्पर्श असतो. त्यांना ‘क्रिएटिव्हिटी’ म्हणजे निर्मिती हा शब्दच मान्य नाही. त्या म्हणाल्या, मैं इस बात को नहीं मानती. यह तो डिस्कवरी हैं. जी गोष्ट आधीच असते तिची निर्मिती आपण केली, असं कुणी कसं म्हणू शकतो? तुम्ही ती नव्यानं लोकांसमोर आणू शकता. तिचा केवळ शोध घेऊ शकता. “क्रिएटिविटी अलग बात है, डिस्कवरी अलग बात हैं. लोग इस बात को समझने कोशिश नहीं करते!!.”

दिलराज म्हणाल्या, प्रवास कितीही लांबचा असला तरी हताश होऊ नये. तुम्ही एक पाऊल टाका. प्रवास सुरू करा. जागेवर बसून ध्येय गाठलं जाऊ शकत नाही. सफर मे रहो तो मंजिल जरूर मिल जाती हैं.

रस्त्यात ढाबे दिसायचे. लांबचा प्रवास करणाऱ्या ट्रक चालकांसाठी हे ढाबे विश्रांतीसाठी महत्त्वाचा आधार असतात. त्या म्हणाल्या, बाहेर खाट दिसली की समजून जा, ढाबा आहे. ही खाट त्यांची ओळखच असते.

चित्रगुप्त, जयदेव (तुम्हें देखती हूँ तो लगता है ऐसे... चित्रपट : तुम्हारे लिए), सी. रामचन्द्र (कितना हसीं हैं मौसम, कितना हसीं सफर है...) सुरैया (वो पास रहे या दूर रहे..‘बड़ी बहन’ आणि ओ दूर जानेवाले..  ‘प्यार की जीत’) यांचे संदर्भ चर्चेत येत गेले. मी त्यांची गाणी सांगू लागलो. दिलराज यांना या गोष्टीचं मोठं कौतुक वाटायचं. गप्पा के. एल. सहगलपर्यंत पोहोचल्या. त्या म्हणाल्या, सहगल यांच्यासोबत गाण्याची म. रफी यांना एकदा संधी मिळाली आहे. मी लगेच ते सांगितलं... 'रूही मेरी रूही, मेरे सपनों की रानी...' हे गाणं सहगल यांनी गायलं आहे. यात रफी यांनी केवळ एकच ओळ गायली आहे. ही माहिती मी पुरवली. त्या म्हणाल्या, हो का? मला हे ठाऊक नव्हतं.

त्या म्हणाल्या, मुकेश यांचं एक गाणं आई नेहमी म्हणत असते. 'पहली नज़र' मधलं. 'दिल जलता हैं तो जलने दें...' दिलराज यांनी एक किस्सा सांगितला. असं म्हणतात, रेकॉर्डिंगच्या दिवशी मुकेश थोडं घाबरलेले होते. गायब हो गयें थे. अनिल-बिश्वास निकले , तो हॉटेल में मिलें. उठा लाए. देखिए कितना मशहूर गाना हैं.

गीतकार नीरज यांचाही विषय निघाला. 'फूलों के रंग से...' किती छान लिहिलं आहे म्हणाल्या. मी त्यात भर घातली. 'नई उमर की नई फसल' (1966) नावाचा एक चित्रपट आहे. त्यात म. रफी यांच्या आवाजात एक गाणं आहे, 'स्वप्न झरे फूल से, मीत चुभे शूल से... लुट गये सिंगार सभी बाग़ के बबूल से... और हम खड़े-खड़े बहार देखते रहे... कारवाँ गुज़र गया गुबार देखतें रहें...

नीरज यांचा कवितासंग्रह आहे माझ्याकडं, 'कारवां गुजर गया'  त्यात ही कविता आहे, हे सांगितलं.
 

गुलज़ारजी ने एक गाना लिखा है ना, ‘आज कल पांव जमीं पर नहीं पड़ते मेरे...’ यह गाना एक मशहूर अंग्रेजी गाने से लिया हुआ हैं. त्यांनी महिती दिली.

मी सांगितलं, तलत की आवाज़ में एक गाना हैं.  हैं सबसे मधुर गीत जिन्हें, हम दर्द के सुर में गाते हैं (फिल्म : पतिता) या ओळी ऐकून मला पी. बी. शेली यांची कविता आठवते. Our sweetest songs are those, that tell of saddest thought. (To a skylark)

उर्दू कवयित्री परवीन शाकिर यांच्याविषयी मी सांगितलं. त्यांचं नाव ऐकताच त्या म्हणाल्या, बहुत बढिया लिखती है वह! मी काही शेर सांगितले. दिलराज म्हणाल्या, एक स्त्री म्हणून त्यांची लिहिण्याची शैली खूप सुंदर आहे. 
मग त्यांनीही त्यांच्या आवडीचा परवीनचा शेर ऐकवला-
अक्से खुशबू हूं बिखरने से ना रोके कोई
और बिखर जाऊं तो ना मुझको समेटे कोई

दिलराज यांनाही परवीन आवडते आणि तिचे शेरही ठाऊक आहेत, हे ऐकून मला आनंद झाला.
मी परवीन यांच्या पुस्तकांची माहिती दिली. चार कवितासंग्रह एकाच पुस्तकात ‘माहे तमाम’ नावानं उपलब्ध आहेत, हे सांगितलं. यावर त्या आश्चयार्नं म्हणाल्या, अच्छा? इतना लिखा उन्होंने? त्यांनी पुन्हा एक शेर सांगितला-
कांप उठती हूं ये सोचकर तन्हाई में
मेरे चेहरे से तेरा नाम ना पढ ले कोई...
आणखी एक
चारागर हार गया हो जैसे
अब तो मरना ही दवा हो जैसे
त्यांची एवढी आवड बघून मी दोन शेर सांगितले.
वो शहर मे हैं यहीं बहुत है मेरे लिए
किसने कहा मेरे घर पर ही ठहरे

मैं सच कहूंगी फिर भी हार जाऊंगी
वो झूठ बोलेगा और लाजवाब कर देगा
त्या म्हणाल्या, उनकी कोई गझल गाना चाहे तो गा सकते हैं क्या?

माझ्या परिचयातील, माझ्या आवडीचे नागपुरातील शायर शाहीद कबीर आणि जहीर आलम यांच्याविषयी मी सांगितलं. शाहीद कबीर यांचं नाव त्यांच्या परिचयाचं होतं. त्यांचा एक शेर मी सांगितला.
आज हम बिछड़े हैं तो कितने रंगीले हो गए
मेरी आँखें सुर्ख, तुम्हारे हाथ पीले हो गए...
हा शेर त्यांना फार आवडला. तो त्यांनी पुन्हा म्हणायला सांगितलं. मग म्हणाल्या, बघा किती गहन अर्थ आहे त्यात.
मग माझ्या आवडीचा, जहीर आलम यांचा एक शेर सांगितला,
उन गरीब बच्चों का सब्र क्या मिसाली हैं
जा रहे हैं मेलें में और जेब खाली हैं...
हा शेर त्यांना खूपच आवडला.  त्या म्हणाल्या, मला या दोघांच्याही काही गझला पाठवा. मैं इस्तमाल करूंगी.

दिलराज सांगू लागल्या, पं. लच्छीराम यांच्याकडून मी नृत्य शिकले. 80 वर्षांचे असताना त्यांच्या विविध मुद्रा बघितल्या. इतना सुंदर इन्सान मैंने दूसरा नहीं देखा.

त्या म्हणाल्या, उषा खन्ना यांच्यासाठी 'साजन बिना सुहागन' मध्ये गायले. ते गीत म्हणजे, जिजाजी ओ जिजाजी... होने वाले जिजाजी'. अन्नू मलिकसाठी 'पूनम' मध्ये गायले. हिंदीत इतकी गाणी गायली, मात्र मला प्रादेशिक संगीत फार आवडतं. विशेषतः हरयानवी आणि भोजपुरी.

प्रवासात भंडारा येथे वैनगंगा नदीवरील पूल लागला. मला एक प्रसंग आठवला. पुलाचं बांधकाम सुरू असताना अपघात झाला होता. चार-पाच कामगार मरण पावले, तर काही जखमी झाले. त्यांना नागपूरला हलवण्यात आलं. मी जखमींशी बोलण्याचा प्रयत्न केला. एकाला पाय गमावावा लागला होता. डोळे पुसत तो म्हणाला, "आता जिंदगानी कसी चालंल!" पाय गमावल्याच्या दुःखापेक्षा आपण घर कसं चालवणार? बायको-पोरांना कसं खाऊ घालणार, याची चिंता त्याला जास्त सतावत होती. हा प्रसंग ऐकून त्या काही क्षण स्तब्ध राहिल्या.

नागपूर जवळ आलं तसं दिलराज म्हणाल्या, आता घरी (मुक्कामाच्या ठिकाणी) पोहोचल्यावर मी आधी स्नान करून मनातल्या मनात भजनं गात राहीन. सिमरन करूँगी. उतना ही प्रभू का प्यार मिलेगा.

चालकानं मला लोकमत कार्यालयासमोर सोडलं. पहाटेचे साडेतीन वाजले होते. त्या म्हणाल्या, अभी इस वक्त कितना स्टाफ होगा आपके ऑफिस में? 

मी निरोप घेण्यासाठी हात जोडले. म्हणालो, मी तुमच्या गाण्यांच्या कॅसेट्स इथं मिळतात का ते शोधीन. त्यांनी खिडकीतून हात बाहेर काढून पुढं केला. माझा हातात हात घेत म्हणाल्या, “खत जरूर भेजना!”

या मधल्या काळात ना कोई खत-ना पैग़ाम, ना कोई दुआ-सलाम. डायरीत मात्र त्यांनी दिलेला पत्ता अजूनही तसाच. सोबत केलेला तो प्रवास, त्या गप्पा इतक्या वर्षांनी शब्दबद्ध केल्या. त्यांना सांगावं म्हणून त्यांचा फोन नंबर मिळवला. छान बोलणं झालं. साऱ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्या म्हणाल्या, “आपने हमे याद किया, आपका शुक्रिया.” तोच आवाज, तोच उत्साह, तोच लहजा, तेच हसून बोलणं. मध्येच एखादा मराठी शब्द. त्या म्हणाल्या, "अनेक जण मला म्हणतात, तुम्ही बदलला नाहीत. आजही तशाच आहात. ते खरंच आहे. मी जी होते तीच आहे. तशीच राहणार."

दिलराज यांना तेव्हाच्या भेटीच्या आठवणी आता लिहून काढल्याचं सांगितलं. यावर त्या म्हणाल्या, मुझे भेजिए ना! आप मराठी में भेजेंगे तो भी मैं पढ लूंगी... 

आज त्यांचा 65 वा वाढदिवस, जनमदिन मुबारक दिलराजजी!

- संजय मेश्राम, पुणे
sanjaymeshram1@gmail.com 
(मलाला युसूफझाई हिच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या 'सलाम मलाला' या पुस्तकाचे लेखक)

Tags: दिलराज कौर संजय मेश्राम हिंदी गाणी पंजाबी गाणी मराठी गाणी गाणी गाणे गायन गीत चित्रपटगीत भजन गझल स्मृति आठवणी साधना डिजिटल sadhana digital Load More Tags

Add Comment

संबंधित लेख

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/ https://ojsstikesbanyuwangi.com/ https://ejournal-uniqbu.ac.id/ https://revistas.uca.es/index.php/hachetetepe https://revistas.uepg.br/index.php/olhardeprofessor https://cdc.uwp.ac.id/profile https://ftk.unbara.ac.id/faq/ https://news.staidapayakumbuh.ac.id/halal-bihalal-stai-darul-quran-payakumbuh-memperkuat-ukhuwah-di-objek-wisata-syariah-torang-sari-bulan/ https://stftws.ac.id/