कुलविंदरला माझा सलाम!

कंगनाला मिळालेली चपराक एकट्या कुलविंदरची नसून साऱ्या देशाची होती हे लक्षात घ्यायचे. 

मित्रहो,
माझ्याच विषयीची एक कैफियत या छोटेखानी लेखातून मी आपल्यापुढे मांडत आहे. 

कुलविंदर कौर हिला मी एक लक्ष रुपयांची भाऊबीज पाठवली आहे. मला बहीण नाही. या कुलविंदरमध्ये मला हवी तशी बहीण सापडल्याचा आनंद व्यक्त करायला दिवाळी नसतानाही मी ही भाऊबीज केली. 

कुलविंदर ही चंदीगडच्या विमानतळावर प्रवाशांच्या सुरक्षेची पाहणी करणाऱ्या पथकाची प्रमुख आहे. त्याच जबाबदारीमुळे तिने कंगना राणावत या पडेल नटीला व चढेल खासदाराला तिचा मोबाईल त्याच्या स्क्रीनटेस्टसाठी मागितला. त्यावर "मी खासदार असताना माझा मोबाईल तपासणीसाठी मागण्याची हिंमत तू कशी केलीस" असा कमालीचा बेकायदा व उर्मट प्रश्न या कंगनाने तिला विचारला. त्यावर "ते माझे कर्तव्य आहे" असे ती म्हणाली. मग या कंगनाने तिला तिचे नाव विचारले व तिच्या ड्रेसवर अडकवलेल्या पट्टीवरील तिचे नाव वाचलेही. त्यानंतर ही कंगना तिला म्हणाली, "म्हणजे तू खलिस्तानी आहेस तर!" 

आपल्याला खलिस्तानी म्हटल्याचे ऐकताच कुलविंदरने कंगनाच्या गालावर एक जोरदार चपराक लगावली. त्यामुळे कंगनाच्या तांबड्या-लाल झालेल्या गालाची छायाचित्रे काही माध्यमांनी पडद्यावर दाखविलीही. 

या चपराकीने कुलविंदरची मातृभक्ती व मातृभूमी या दोहोंवरचेही प्रेम अधोरेखित केले. पंजाबात झालेल्या शेतकरी आंदोलनात ज्या महिलांनी उन्हातान्हात बसून धरणे दिले, त्यांना उद्देशून "या शंभर रुपयांची रोजी देऊन आणलेल्या बाया आहेत" असे कमालीचे अपमानजनक वक्तव्य या कंगनाने केले होते. त्या धरण्यात बसणाऱ्या स्त्रियांमध्ये कुलविंदरची आईही होती. त्यामुळे हे वक्तव्य आपल्या आईचा उपमर्द करणारे असल्याचेही कुलविंदरच्या मनात होते. 

त्याआधी "या देशाला स्वातंत्र्य मिळाले ते मोदींचे सरकार सत्तेवर आले त्या, 2014 या वर्षी" असे अत्यंत बेशरम उद्गार कंगनाने काढले होते. या देशाने 90 वर्षे केलेल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरीस, 1947 मध्ये जे मिळाले ते स्वातंत्र्य नव्हते तर 'भिक्षा' होती असे म्हणून या कंगनाने टिळक, गांधी, नेहरू यांच्यासह स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सगळ्याच देशभक्तांना भिकारी म्हटले होते. त्यामुळे तिला मिळालेली चपराक एकट्या कुलविंदरची नसून साऱ्या देशाची होती हे लक्षात घ्यायचे. 

या चपराकीला हिंसाचार, खून आणि बलात्कारासारखा भयंकर गुन्हा ठरविण्याचे प्रतिभाशालीपण काही विद्वानांनी नंतरच्या काळात केले. त्यांच्या कल्पनाशक्तीचे मला कौतुकच तेवढे वाटले. 

कंगना राणावतला तिच्या आरंभीच्या एक-दोन सिनेमांत लोकांनी डोक्यावर घेतले. नंतरचे तिचे सिनेमे व मालिका पडल्या. तरीही "मला या देशात अमिताभ बच्चनएवढा मान सर्वत्र मिळतो" असे जाहीरपणे सांगण्याचा मानभावीपणा तिने या थप्पड प्रकरणानंतर केला. काही माणसांचे अहंकार सनातन असतात, हे अशावेळी लक्षात घ्यायचे.  

कुलविंदरला कायदानुसार तिच्या खात्याच्या कस्टडीत आता ठेवले आहे. जी गोष्ट कायद्याने व्हायची तशी ती झाली, पण कायद्याहूनही माणुसकी आणि आत्माभिमान श्रेष्ठ असतो. आपल्या आईचा व मातृभूमीचा अपमान होताना पाहूनही गप्प राहणाऱ्यांचे अकर्ते शहाणपणही अशावेळी मनात आणायचे असते. 

याहून मोठी गोष्ट ही की, मी पाठविलेली भाऊबीज कुलविंदरला ती कस्टडीत असल्यामुळे मिळाली नाही. पंजाबच्या शेतकरी आंदोलनाचे एक नेते रणजीतसिंग मान यांच्याशी मी फोनवर बोललो, तेव्हा त्यांनी मला तिच्या भावाशी बोलायला सांगितले व त्याचा फोनही जोडून दिला. तिचे भाऊ शेरसिंगजी मला म्हणाले, "आम्हाला तुमच्या भावना समजल्या आहेत. तशा त्या आम्ही कुलविंदरलाही सांगितल्या आहेत. मात्र कुलविंदरने आणि आम्ही सर्व कुटुंबियांनी तिला आलेल्या सर्व मदती,  भेटी व देणग्या न स्वीकारण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आपली भावना लक्षात घेऊनही आमची विनंती ही की, आपण भाऊबीजेची ही रक्कम देशात सुरू असलेल्या कोणत्याही शेतकरी आंदोलनाला द्यावी. हा कुलविंदरचाही निरोप आहे. ती नंतर तुमच्याशी बोलेलही."

हा निरोप ऐकल्यानंतर माझ्या मनातला कुलविंदरविषयीचा अभिमान अनेक पटींनी वाढला. खऱ्या अर्थाने ती शेतकरी वर्गाची प्रतिनिधी आहे आणि तिच्या मनातील देशभक्तीही मोठी आहे हे ध्यानात आले. त्याचवेळी अशी लढाऊ महिला मला बहीण म्हणून मिळाली याचाही मला आनंद झाला. कुलविंदर या प्रकरणात अपराधी ठरली तर तिला पाठिंबा देणारा म्हणून तिच्यासोबत राहायला मलाही आवडेल. 

आपली कोणी प्रशंसा करावी वा कोणी शिवीगाळ करून आपले नाव चर्चेत आणावे म्हणून मी ही भाऊबीज केली नाही. आत्माभिमानाची एक नवी व स्फुरणदायी बाब म्हणून मी हे केले आहे. या देशात अजून लोकशाही असल्याने माझे कृत्य ज्यांना टीकास्पद वाटेल त्यांना तशी टीका करण्याचा अधिकार आहे, हेही मला येथे नम्रपणे सांगायचे आहे. 

कळावे,
नमस्कार.

- सुरेश द्वादशीवार
sdwadashiwar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक आहेत.)

Tags: suresh dwadashiwar sadhana digital kangana ranaut kulvindar kaur Load More Tags

Comments: Show All Comments

अमृता

अहंकारालाच चपराक दिली आहे . लेख अप्रतिम !!

Ujwala Mehendale

मला द्वादशीवार यांचा लेख अतिशय आवडला. कुलविंदर यांनी कुठल्या भावना मनात बाळगून ही कृती केली असेल याचे अत्यंत पटणारे विवेचन द्वादशीवार यांनी केले आहे. कंगना राणावत सारख्या माजोरड्या व्यक्तीला जागा दाखवून देण्याची हीच योग्य पध्दत आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

Prakash Kapade

"कुलविंदर या भगिनेने कंगणाच्या गालावर सणसणीत लगावली आणि त्याची गुंज देशभरात घुमली, एका क्षणात या फालतू नाटीचा तोरा अहंकार उतरून ठेवला,आणि करोडो लोकांच्या मनाला थंडक पोहचली,या बहादूर भागीनेचे देशभर कौतुक झाले ,लातो के भूत बातोसे नही मानते! द्वादशीवार सरांनी तिला भाऊबीज पाठवून तिचा सन्मान केला हे वाचून मन गहिवरून आले,लाखों करोडो भावांच्या वतीने त्यांनी ही भाऊबीज पाठवली असं मी मानतो! कुलविंदार भगिनी आणि तिच्या कुटुंबीयांनी आलेली मदत शेतकरी आंदोलनाला द्यावी ही उदार स्वाभिमानी वृत्ती दाखवून कुलविंदर भगिनी विषयी आदर शतपटीने वाढला ! द्वादशीवार सारख्या विद्वान विचारवंत माणसांनी कुणाची पर्वा न करता जो सन्मान केला तो काळजाला भिडला आणि डोळे ओले झालेत,त्यांना सॅल्युट,सलाम ! व्यवस्थेच्या कानशिलात मारलेली कुलविंदरची ही चपराक वर्षानुवर्षे गुंजत राहील निनादात राहील ! कुलविंदर भगिनिला नतमस्तक होऊन मानाचा मुजरा!

Baburao shinde

मान. द्वादशीवार सरांनी लिहिलेला हा लेख आणि व्यक्त केलेली प्रतिक्रिया ऐकून नवल वाटले .नवल यासाठी की सरांचा गांधी या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वच पैलूवर विशेष अभ्यास आहे. त्यांची जवळपास बहुतेक पुस्तके आम्ही वाचलेली आहेत .संग्रही आहेत.त्यांचा मी एक वाचक - चाहता आहे परंतु यावेळी त्यांनी या प्रकरणावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया.. या घटनेला दिलेला प्रतिसाद ही लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून जरी मान्य असली तरी तिचा अचंबा वाटला. तो यासाठी की सरांनी आजवर जो गांधी सांगितला तो गांधी या विषयावरती प्रतिक्रिया देताना ते कसे विसरले..? गांधी नेहमी म्हणत होते की आय हेट द ॲक्शन.. नॉट द मॅन ..एखाद्या व्यक्तीच्या कृतीचा निषेध होऊ शकतो; त्या व्यक्तीचा नव्हे .स्वतः गांधी यातून गेलेले आहेत. आठवण अशी की: गांधींची पदयात्रा सुरू असताना एका अविचारी माणसाने त्या पदयात्रेत जाऊन गांधींना अचानक चपलाची माळ घातली. गांधींनी ती हळुवार बाजूला केली. तोपर्यंत गांधींच्या चिडलेल्या अनुयायांनी त्या मनुष्याला मारण्यासाठी धाव घेतली. गांधींनी सगळ्यांना रोखले .पुन्हा त्याच गावातून काही दिवसानंतर जाण्याचा प्रसंग आला आणि तो माणूस गांधींना सामोरा गेला तो गांधींकडे पाहून हसला. गांधीही त्यांच्याकडे पाहून हसले .बरोबरच्या लोकांना विस्मय वाटला त्यांनी गांधींना या विषयावर छेडले. चपलाचा हार घालणाऱ्या माणसाला तुम्ही असा हसून का प्रतिसाद देता तेव्हा गांधी म्हणाले, त्या कृतीचा मी मनोमन निषेध केलेला आहे. ती व्यक्ती माझा शत्रू नाही .मी त्या व्यक्तीचा म्हणून निषेध करणार नाही तिच्या हातून जी कृती झाली त्याचा निषेध मी अहिंसक मार्गाने केला आहे .आता द्वादशीवर जर गांधींना मानत असतील तर गांधींचा हा विचार ते यावेळी कसे काय विसरले..? कंगना चुकलेली आहे परंतु आपण ड्युटीवर आहोत या संदर्भात संबंधित पोलीस महिला कर्मचारीला तक्रार नोंद करण्याची मुभा होती .त्यानुसार कायद्याने पोलिसांनी आपले काम केले असते. या सगळ्या बाबी असताना तुम्ही कायदा हातात घेऊन त्या संबंधित व्यक्तीचे थोबाड रंगवणे आणि म्हणून तिला द्वादशीवर सरांसारख्या विचारवंताने एक लाख रुपये भाऊबीज पाठवावी., हे सारे अचंबित करणारे..अनाकलनीय वाटते.

Ujjwala

साधनेंत किंवा कर्तव्य साधनेंत लिहिणारे जे लेखक आहेत त्यातील माझे आवडते आणि आदर असलेले असे सुरेश द्वादशीवार सर आहेत. त्यांचे current politics and politicians, नरहर कुरुंदकर, गांधी, नेहरू, चार्वाक असे विविध विषयांवरचे लिखाण मी न चुकता वाचते. ते लिखाण मला पटते, आवडते, माझ्या जाणिवा समृद्ध करते. पण आजचा "कुलविंदर" वरचा लेख नाही पटला. मला कंगना राणावत नटी कशी आहे हे माहीत नाही कारण मी तिचा एकही चित्रपट बघितला नाहीये, कधी बघावासा वाटलाही नाही. राजकीय व्यक्ती, आणि आता खासदार म्हणून ती कसे, कितपत समाजोपयोगी काम करेल ते कळेलच. पण ते काम करणाऱ्यांबद्दलचे माझे वैयक्तिक image आहे ते prejudiced वाटू शकते - भारी कपडे, दागिने, full makeup, इत्यादी माझ्या त्या image मध्ये बसत नाहीत. त्यामुळे मला ती काही impressive किंवा लक्ष द्यावी अशी वाटलीच नाही. आता ज्या पद्धतीने ती कुलविंदरशी वागली - 'some are more equal' स्टाईलने, regional bias, hatred - या सर्वांसाठी ती अपराधी ठरते, अक्षम्य अपराधी. पण, आपल्याला सगळ्यांना कशानाकशाचा त्रास झालेला असतो - राजकीय निर्णय, जागतिक बदल, आर्थिक अडचणी; इतकेच काय वैयक्तिक आयुष्यात आपले पण अपमान झालेले असतात. ते अपमान आपल्या जिव्हारी लागलेले असतात पण अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या आपण मुस्काटात नाही ठेवून देत. आणि जी माणसं अशी वागतात त्यांना आपण हिंसक म्हणतो किंवा कायदा हातात घेऊन समाजामध्ये गोंधळ घालणारी म्हणतो. त्यांना शिक्षा द्यायचीच तर कायदेशीर मार्गाने. Angry young man / woman बनून नाही. तशीच धोबाडीत आपल्याला सुध्दा बसू शकेल आणि justify करता येईल. जेव्हा कुलविंदरची reaction द्वादशीवार सर कर्तव्य साधनेसारख्या public platform वर justify च नाही तर कौतुकास्पद ठरवतात, तेव्हा मला त्यांचे आधीचे लिखाण आठवून धक्का बसतो. सरांच्या लेखाला आलेले comments वाचल्यावर तर असे लक्षात येते की समाजात अन्यायाविरोधातली चीड अशा प्रकारे बाहेर आलेली, justify झालेली; appreciate होतीए. मग 15 मार्च 2021 च्या कर्तव्य साधनेतल्या सरांच्या लेखातील ("विचारांचे सामर्थ्य व त्याविषयीची उदासीनता") या वाक्याचे काय करायचे - *विचारांनी माणसे पुढे जातात विचारांनीच ती बदलतात..* मग गोडसे समर्थक म्हणतील "आता का कुलविंदर भारी वाटते?" शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारणे, पुरुषांनी स्त्रियांना मारणे, इत्यादी वेगवेगळ्या प्रकारे justify होत राहील, करता येईल. संपादक: हाच लेख द्वादशीवार सरांऐवजी इतर सामान्य नागरिकाने लिहीला असता तरी आपण छापला असतात?

Adv.Jaisingh Chawhan

कंगना राणावत सारख्या मूर्ख आणि मुजोर लोकांना वठणीवर आणण्यासाठी कुलविंदर ने उचललेले पाऊल योग्य आहे आणि त्या घटनेची योग्य बाजू पुढे आणली त्याबद्दल द्वादशीवार साहेबांचे अभिनंदन..

D. T Barde.

श्री सुरेश द्वाद्वशीवार यांचा हा संतुलीत व समर्पक लेख आवडला . उचित व विचार करायला लावणारे मुद्दे त्यांनी उपस्थित केले आहेत . कुलीविंदर व तीच्या कुटुंबियांचे पण अभिनंदन करतो . .तीने प्रसंगावधान व कमालीचे धैर्य एकवटून क्षणार्धात कंगना सारख्या फालतू व्यक्तिला तीच मूल्य काय आहे ते दाखवून दिले . सर्वांनी तीच्या पाठीशी राहणे हे आपले कर्तव्य आहे

संजय ब्राह्मण्कर

सुंदर लेख.अहंकारी व अविवेकी नेत्यांना त्यांची योग्य जागा दाखवणे गरजेचे.

Anup Priolkar

Very nice article. I am totally agree with you. Thanks for sharing.

Omkar Awchar

कुळविंदरने हे केलेले कृत्य यौगेच आहे.पदाचा खोटा अहंकार बाळगणाऱ्या नटीला. योग्यवेळी चपराक दिली धन्यवाद ताई. सॅल्यूट तुला.

Add Comment