महाराष्ट्रात 2019 च्या सुरवातीलाच महिला ऊसतोड कामगारांमध्ये ऊसतोडणीच्या कामासाठी गर्भाशय काढून टाकण्याचे प्रमाण जास्त असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. परिणामतः बऱ्याच सामाजिक माध्यमांनी त्याची दखल घेऊन वेगवेगळ्या स्तरांवर चर्चा केल्या गेल्या. त्यानंतर महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार हे अनेकवेळा निरनिराळ्या कारणांसाठी सामाजिक आणि राजकीय चर्चाविश्वात नेहमीच चिंतनाचा विषय बनत आहेत. विविध माध्यमांनी या कामगारांच्या अनेक समस्या अधोरेखित केल्या आहेत. मग त्यांचे कामगार हक्क असोत, किंवा शिक्षणाचे किंवा आरोग्याचे प्रश्न असोत. परंतु वस्तुतः या कामगारांचे कोणतेच प्रश्न मार्गी लागलेले दिसून येत नाहीत. त्यांच्या वेगवेगळ्या समस्यांचे स्वरूप नीट अभ्यासल्यास असे लक्षात येते की, त्या सोडविण्यासाठी विविध यंत्रणांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
प्रत्येक वर्षी हंगामी स्थलांतरित ऊसतोड कामगार हे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त आणि आदिवासी जिल्ह्यांमधून ऊसाच्या पट्ट्यांकडे येतात. यांत मुख्यत्वे निरक्षर/ कमी शिकलेले, गरीब, खालच्या जातीस्तरांतील, जमीन नसलेले किंवा कमी असलेले कामगार यांचा समावेश होतो. स्थलांतरानंतर या कामगारांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते हे सर्वश्रुत आहेच. त्यातही ऊसतोडणीमध्ये त्यांच्या कामगार हक्कांची होणारी पायमल्ली, राहण्याच्या, पिण्याच्या पाण्याच्या, मुलांच्या शिक्षणाच्या, आणि स्थलांतरामुळे नागरिकत्वाचे हक्क बजावण्यात येणाऱ्या समस्या इत्यादी, हे कामगार सर्वच बाजुंनी कसे दुर्लक्षित आहेत हेच स्पष्ट करत असतात. या सर्व समस्यांबरोबरच कामगारांच्या आरोग्याशी संबंधित समस्याही तितक्याच दुर्लक्षित आहेत किंवा त्या किमान चर्चेचा विषयही बनलेल्या नाहीत.
या लेखाच्या निमित्ताने आपण ऊसतोड कामगारांचे आरोग्याशी संबंधित काय प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी कारखाने किंवा शासकीय यंत्रणा कोणत्या पद्धतीने काम करते, ऊसपट्ट्यांतील लोकआरोग्य सुविधा किंवा साखर कारखाने ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवितात किंवा नाही आणि ऊसतोड कामगार हे स्थलांतरानंतर ऊसतोडणीमध्ये स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी कोणत्या सुविधांवर विसंबून आहेत इत्यादी प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
हंगामी स्थलांतर कोण करते?
सर्वप्रथम हंगामी स्थलांतर कोण करते व त्यात कामगारांबरोबर कोणाकोणाचा समावेश होतो हे समजून घेऊ. हंगामी स्थलांतर हे फक्त ऊसतोडकामगारांचेच होत नसून त्यामध्ये एकाच कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असू शकतात. त्यामध्ये मध्यमवयीन (साधारण 65 वयाच्या आतील महिला-पुरुष) कामगार, नुकतीच जन्मलेली बालके आणि शाळेत जाणारी मुलेही येतात. गरोदर महिलाही या हंगामी स्थलांतर आणि ऊसतोडणीच्या कामाला अपवाद नाहीत. म्हणजेच हंगामी स्थलांतर हे वेगवेगळ्या वयोगटातील महिला-पुरुष कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे होते. याचाच अर्थ सर्वांच्या आरोग्यासंबंधित गरजा भिन्न प्रकारच्या असू शकतात.
विशेष म्हणजे, ऊसतोडणीचे काम हे खूप कष्टप्रद असल्यामुळे जवळजवळ बहुतांशी कामगारांच्या आरोग्य संबंधित तक्रारी असतात. तसेच गरोदर आणि नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलांच्याही प्रजनन स्वास्थ्यासंबंधित गरजा असतात. यात गरोदरपणाची नोंदणी, कमीतकमी तीन तपासण्या, धनुर्वाताची दोन इंजेक्शन्स, कुटुंबनियोजन, मुलांचे लसीकरण आणि काही तत्काळ अथवा अत्यावश्यक सुविधांची गरज असते.
आरोग्यविषयक गरजा हे कामगार कसे भागवतात?
ऊसतोड कामगार हे स्थलांतर करून ऊसपट्ट्याकडे येतात याची कोणी दखल घेतलेली असते का? ऊसपट्ट्यांतील स्थानिक लोकआरोग्य सुविधा किंवा साखर कारखाने हे कामगारांना आरोग्य सेवा वेळोवेळी पुरविण्यास तत्पर असतात का? या सर्व मुलभूत प्रश्नांची उत्तरे ही ऊसपट्ट्यांच्या जिल्ह्यांनुसार किंवा साखर कारखान्यांनुसार थोड्याफार प्रमाणात वेगळी असतील. काही कामगार हे चांगले किंवा वाईट राज्ये/जिल्हे/गाव/किंवा साखरकारखाने यांतील त्यांना जाणवलेला फरक सांगतात. तो फरक सांगताना ते त्या-त्या ठिकाणी असलेल्या आरोग्य आणि इतर सुविधांचा विचार करतात. तरीसुद्धा ऊसतोड कामगारांचे आरोग्य आणि इतर सोयींची जबाबदारी पूर्णपणे कुठेच घेतली गेलेली नाही हे नाकारले जाऊ शकत नाही.
एकट्या पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास, ऊसाच्या प्रदेशाकडे दुष्काळग्रस्त किंवा आदिवासी जिल्ह्यांतून कामगार ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. कधीकधी मध्यप्रदेशातूनही कामगार स्थलांतरित झाल्याचे पाहायला मिळते. या कामगारांचे स्थलांतरानंतरचे, आरोग्याबरोबरच इतर मूलभूत गरजांविषयक प्रश्न बऱ्याच अंशी अनुत्तरित आहेत.
अगदीच सरळ आणि स्पष्ट सांगावयाचे झाल्यास, ऊसपट्ट्यातील स्थानिक आरोग्य सुविधा किंवा साखर कारखान्यांनी अंमलबजावणीच्या पातळीवर कामगारांच्या आरोग्याची कोणतीच जबाबदारी घेतलेली नाही. परिणामतः ऊसतोड कामगारांच्या इतर प्रश्नांसारखा त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही टांगताच आहे.
लोकआरोग्य सुविधा ऊसतोड कामगारांनाच का मिळत नाहीत?
आपल्या महाराष्ट्रातच काय, तर भारतभर लोकआरोग्य सुविधांची संरचना सगळीकडे सारखीच आहे. म्हणजेच सगळीकडे लोकआरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. मग ऊसतोड कामगारांनाच त्या मिळत का नाहीत? असा एक साधा प्रश्न उत्पन्न होतो. अजून खोलात विचार केल्यास, कामगारांच्या स्थलांतरीत स्थितीमुळे त्यांना सुविधा नाकारल्या जातात का असेही वाटू शकते. या सर्व प्रश्नांची उत्तरे विविधांगी आहेत. ऊसतोड कामगार स्थलांतरानंतरही लोकआरोग्य सुविधांचा वापर करू शकतात. परंतु ऊसतोडणीचे काम हे निश्चित स्वरूपविरहित आहे. या कामाची कोणतीच नेमकी वेळ नाही. कामाचे तास ठरलेले नाहीत. कामगारांना आठवड्याची सुट्टीही नसते.
जर एखाद्या कामगाराने आरोग्य सुविधांचा उपभोग घेण्यासाठी सुट्टी घेतली, तर त्याचे त्याच्या कमाईपेक्षा जास्त पैसे कापले जातात. साधारणपणे एक कोयते (दोन कामगारांची जोडी) दिवसाला 500 ते 600 रुपये कमावत असेल तर काही टोळीमालक एक दिवसाच्या खाड्याचे 1000 ते 1200 रुपये कापतात. म्हणून कामगार सुट्टी घेतानाही विचार करतात, स्थानिक लोकआरोग्य सुविधांकरता काम सोडत नाहीत, आणि सुविधांचा लाभही घेत नाहीत. ऊसतोड कामगार हे जर साखर कारखान्याजवळच वास्तव्यास असतील, तर काही कारखाने कामगारांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देताना दिसतात. परंतु त्याचे प्रमाण खूप कमी आहे. बरेच कामगार हे रानात किंवा खेडेगावी, एखाद्या खडकाळ माळरानात राहतात. बऱ्याचदा कामगारांच्या टोळ्या एका गावातून दुसरीकडे ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. अशा कामगारांसाठी कारखाना किंवा स्थानिक लोकआरोग्य सुविधा तत्परतेने सुविधा पुरविताना दिसत नाहीत.
ऊसतोडणीच्या भयानक स्वरूपामुळे कामगार हे सुविधांचा लाभ घेऊ शकत नसतील, त्यामुळे साखर कारखाने किंवा स्थानिक लोकआरोग्य सुविधांनी जबाबदारी घेण्याची गरज आहे. तथापि तसे होताना दिसत नाही. बऱ्याचदा ऊसतोड कामगारांच्या आरोग्यविषयक तक्रारी या ऊसतोडणीच्या कामासंबंधित किंवा कामामुळे असतात. तर कमीतकमी त्याची जबाबदारी घेऊन साखरकारखान्यांनी कामगारांना मोफत आरोग्य सेवा देणे आवश्यक आहे, मात्र प्रत्यक्षात आपल्याला विरुद्ध परिस्थिती पाहायला मिळते.
बरेच कामगार साखर कारखाने आरोग्य विमा देत असल्याचे सांगतात. परंतु विम्याचा लाभ कसा घ्यावा याची माहितीही कामगारांना नसते. अनेकदा कामगार वाहनाचा दोर घसरून पडतात, त्यांना कोयता लागतो, साप-विंचू चावतो किंवा क्वचित मृत्यूही होतो; तरीही कामगारांना विम्याचा लाभ मिळताना दिसत नाही. मग कारखान्याने दिलेल्या आरोग्य विम्याचे काय होत असेल? याचा अंदाज आपण शेवटी लावूया.
आरोग्य सुविधा पुरविण्यात टोळीमालकांचा सहभाग काय?
या आधी नमूद केल्याप्रमाणे ऊसतोड कामगार हे बहुतांशी लोकआरोग्य सुविधांपासून वंचित आहेत आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोणी घेतलेली नाही. मग प्रश्न उरतो की, अगदी निकडीचे असेल किंवा आरोग्यासंबंधित निर्वाणीचा प्रसंग ओढावला तर कामगार काय करतात? याचे उत्तर दोन पद्धतींनी देता येईल. एक म्हणजे ते कामाचे खाडे करून लोकआरोग्य सुविधांची माहिती काढून सुविधांचा उपभोग घेतात, नाहीतर खासगी सुविधांचा वापर करतात.
सर्वात आश्चर्यकारक बाब अशी की, बरेच टोळीचे मालक हे प्रत्येक कामगारांचे खाते एखाद्या खासगी दवाखान्यात उघडतात आणि त्यांना गरज भासल्यास त्याच दवाखान्यात जाण्यास भाग पाडतात. बऱ्याच ठिकाणी अनेक कामगारांच्या टोळ्यांची खाती एकाच खासगी दवाखान्यात असलेली दिसतात. म्हणजेच कामगारांपुढे अशी कोणतीच पर्यायी व्यवस्था ठेवली जात नाही, जिथे कामगार त्याच्या खिशाला ताण न बसता स्वतःचे आरोग्य राखू शकतील. ऊसतोडणीच्या हंगामाच्या शेवटी प्रत्येक कामगाराची दवाखान्यातील बिलाची रक्कम ही त्यांच्या पगारातून कापून घेतली जाते. बऱ्याचदा पूर्ण कुटुंबाची रक्कम पाच ते दहा हजारांपर्यंत होते. एका हंगामाचे तेवढे पैसे कापून देणे कामगारांना न्याय्य वाटत नाही. बऱ्याच कामगारांना ती फसवणूक वाटते. म्हणून कामगार शक्यतो दवाखान्यात जाणे टाळतात.
हेही वाचा : गोड साखरेची कडू कहाणी... ऊसतोडणी मजुरांना लॉकडाऊनचा फटका - विवेक घोटाळे व सोमिनाथ घोळवे
कामगारांचा आणि लोकआरोग्य सेवांचा थेट संबंध येण्यासाठी कोणतीच पर्यायी व्यवस्था ऊसपट्ट्यात केलेली नाही. म्हणून ऊसतोड कामगारांना जवळच्याच खासगी दवाखान्यात जाण्यावाचून पर्याय राहत नाही. तथापि, खासगी दवाखान्यात जाणे हे सगळ्याच कामगारांना परवडेल असेल नाही. ऊसतोड कामगार हे जास्त करून गरीब वर्गातीलच असल्यामुळे त्यातील बहुतेकांच्या खिशांना खासगी दवाखाने परवडत नाहीत. बऱ्याचदा ते ऊसतोडणीच्या कामामुळे होत असलेल्या अंगदुखी, हातपाय – मान – कंबर – गुडघेदुखी इत्यादी तक्रारींसाठी मेडिकल किंवा खेडेगावात असलेल्या दुकानातून वेदनाशामक किंवा तत्सम ‘दुखणे बरे होईल’ म्हणून दिलेल्या गोळ्या खातात.
साखर कारखान्यांचा काणाडोळा
आरोग्य प्रत्यक्षातील चित्र असे असेल तर मग कारखान्याच्या आरोग्य विम्याचे काय होते? टोळीमालक खासगी दवाखान्यात कामगारांचे खाते उघडून कामगारांकडूनच पैसे का घेतात? कामगार स्वतःच आरोग्याची जबाबदारी घेत असतील तर मग खाते उघडण्याची गरजच का असेल? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळवण्यासाठी पूर्ण तपासणी करणे गरजेचे आहे.
काही ठिकाणी एखादा कामगार मृत्युमुखी पडला तरीही साखर कारखान्यांकडून विमा किंवा कोणती आर्थिक मदत होत नाही. उलट टोळीमालक हे त्या कामगाराने घेतलेल्या उचलीचे पैसेही नातेवाईकांकडून वसूल करतात. एकाअर्थी ही ऊसतोडकामगारांची फसवणूकच आहे. म्हणून सर्वच साखर कारखान्यांनी आरोग्य विमा म्हणजे काय आहे, त्याचा लाभ कसा घ्यावा याबद्दल कामगारांमध्ये जागृती करून त्यामध्ये स्पष्टता आणण्याची गरज आहे.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कामगारांचे आरोग्य आणि सहकारी किंवा खासगी तत्त्वावर चालणारे साखर कारखाने यामध्ये काहीच संबंध दिसून येत नाही. कारण कोणत्याही प्रकारच्या साखर कारखान्याने कामगारांच्या आरोग्याची पूर्णपणे जबाबदारी घेतलेली नाही. साखर कारखाने किंवा ऊसपट्ट्यांतील लोकआरोग्य सेवा या ऊसतोडणीच्या कामामुळे होणाऱ्या कामगारांच्या आरोग्याच्या समस्यांची दखल घेऊन त्यांचे निराकरण तर करत नाहीतच. त्याचप्रमाणे महिला कामगार म्हणून त्यांच्या आरोग्याच्या काही विशेष गरजा असतील याकडेही ते काणाडोळा करीत असल्याचे पाहायला मिळते. महिला ऊसतोड कामगारांमध्ये बऱ्याच महिला गरोदर असतात किंवा नुकत्याच जन्मलेल्या मुलांच्या माता असतात. त्याही आवश्यक आरोग्य सुविधांपासून वंचित राहिलेल्या पाहायला मिळतात.
आदिवासी जिल्ह्यांमधून कमी वयातील, नुकत्याच लग्न झालेल्याही महिला कामगार ऊसपट्ट्याकडे स्थलांतरित होतात. त्यांच्यापर्यंतही कुटुंब नियोजनासंबंधित सुविधा पोचत नाहीत. याचाच परिणाम म्हणून आपण ऊसाच्या पाचटात झालेली प्रसूती बघतो, बिना नोंदणीच्या किंवा तपासणीच्या गरोदर महिला ऊसतोड कामगार बघतो, लसीकरण न झालेली बालके बघतो, आणि कुटुंब नियोजनाच्या सुविधा वेळेवर न मिळाल्यामुळे कमी वयातील माता किंवा जास्त मुले असलेल्या महिला ऊसतोड कामगार बघतो.
मूलतः हंगामी स्थलांतरित ऊसतोड कामगारांचे आरोग्य प्रश्न समजून घेताना किंवा ते सोडवताना काय लक्षात घेणे गरजेचे आहे किंवा कोणत्या बाजुंनी विचार करण्याची आवश्यकता आहे हे व्यापकतेने समजून न घेतल्यामुळे साखरपट्टा हा कामगारांना आरोग्य आणि इतर सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरतो.
उपायांच्या दिशा
मुळात, ऊसतोड कामगार हे ऊसतोडणीसारख्या अवघड कामासाठी स्थलांतरित होतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या आरोग्याच्या गरजा आहेत किंवा असू शकतात, हे सर्वात आधी मान्य करणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे, साखरकारखाने किंवा स्थानिक लोकआरोग्य सुविधा दोन्हीपैकी एकाने कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्य सुविधा उपलब्ध असताना कामगार त्याच्या फायदा घेऊ शकत नाहीत हेच सतत ऐकावे लागेल. कारण सद्यपरिस्थितीत कामगारांना कोणत्याही आरोग्य सुविधांशी जोडून देणे आणि त्यांनी वेळेवर त्याचा उपभोग घेणे यावर जोर देणे महत्त्वाचे ठरेल.
ऊसतोडणीच्या कामाच्या भयानक स्वरूपामुळे, कामगार जर वेळेवर आरोग्य सुविधांचा उपभोग घेऊ शकत नसतील तर कामाचे स्वरूप ठरविण्याचीही तितकीच गरज आहे. आठवड्याला कामगारांना सुट्टीही नसते आणि खाडे केल्यामुळे गरजेपेक्षा जास्त पैसे टोळीमालक कामगारांच्या पगारामधून वजा करत असतील तर तसे न करण्याच्या सूचना टोळीमालकांना देणे गरजेचे आहे. ऊसतोडणीच्या हंगामात काही ठिकाणी, कामगार ‘दवाखान्यात जातो’ असे सांगून पळून जाईल म्हणून टोळीमालकाने त्याला तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या दवाखान्यात जाऊ दिले नाही; अशा घटना घडल्याचेही निदर्शनास येते.
काही ठिकाणी स्थानिक लोकआरोग्य सेवक हे ऊसतोडकामगारांच्या मुलांना पोलिओचे लसीकरण देण्यास जाताना दिसतात. परंतु आरोग्यसेवक आणि कामगार यांची भेट क्वचितच घडते. म्हणूनच कामगारांचे आरोग्य जपण्यासाठी व्यापक दृष्टीकोनाची गरज आहे. कामगारांना कामाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा देता येऊ शकतात का? किंवा ऊसतोड कामगारांसाठी फिरत्या (दवाखाना) आरोग्य सुविधा या किती फायदेशीर ठरतील याचा सुसूत्र पद्धतीने सारासार विचार करून ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची होणारी हेळसांड थांबू शकेल. लोकआरोग्य सुविधांचे ऊसतोड कामगारांच्या स्थलांतराकडे, कामाच्या स्वरूपाकडे, त्यांच्या आरोग्यविषयक गरजांकडे दुर्लक्ष असणे; ऊसतोड कामगारांचे स्थानिक लोकआरोग्य सुविधांपासून वंचित राहणे, आरोग्याकडे दुर्लक्ष होणे, टोळीमालकांकडून कामगारांचे खासगी दवाखान्यात खाते उघडणे आणि कामगारांचे आर्थिक शोषण होणे इत्यादी बाबी या ऊसतोड कामगारांचे आरोग्य जपण्यासाठी अनेक पातळींवर काम करण्याची आवश्यकता आहे हे स्पष्ट करतात.
- सरोज शिंदे
shinde.saroj4@gmail.com
(लेखिका, टाटा समाजविज्ञान संस्था, मुंबई येथे सामाजिक स्वास्थ्य विषयात पीएच डी स्कॉलर असून उसतोड महिला कामगारांचे प्रजनन स्वास्थ्य हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.)
Tags: साखर कारखाने स्वास्थ्य मजूर शोषण ऊसतोड सहकार Load More Tags
Add Comment