गुजरात विधानसभा निवडणुकीतील भाजपची रणनीती 

पंतप्रधानांच्या लोकप्रियतेचा फायदा याही निवडणुकीत करून घेतला जातो आहे.

moneycontrol.com

गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी एक डिसेंबरला मतदान होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी विविध प्रकारची रणनीती भाजप, काँग्रेस आणि आप या तिन्ही प्रमुख पक्षांकडून अवलंबली जात आहे.

गुजरात निवडणुकीसंदर्भात विविध सर्व्हे एजन्सीजनी केलेल्या सर्व्हेनी भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे. वास्तविक गुजरात राज्यात गेल्या 27 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तरीही अँटी इन्कम्बनसी वा सत्ताविरोधी वातावरण दिसून येत नाही. लोकनीती-सीएसडीएस संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटलेले आहे की, ‘बेरोजगारी, महागाई, विकासाचा प्रादेशिक असमतोल इत्यादी मुद्द्यावरून सर्वसामान्य जनता सरकारवर नाराज असली तरी भाजपविरोधात जाऊन मतदान करण्याइतकी नाराज निश्चित नाही. काही सर्व्हे एजन्सीजनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील परंतु भाजप हमखास सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजयाचा दावा खालील मुद्द्याच्या आधारावर केला जातो आहे :

गुजराती अस्मिता आणि ओळखीला महत्त्व

गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने विशेष रणनीतीचा अवलंब केलेला दिसून येतो. ‘गुजराती अस्मिता आणि ओळख’ यांना भाजपने प्रचारात सर्वाधिक स्थान दिलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजराती ओळखीला अधोरेखित करण्यासाठी स्वतःला ‘गुजरातचे सुपुत्र’ म्हणून प्रोजेक्ट करत आहेत. ‘गुजरात आणि भाजपचे अतुट नाते आहे. गुजरात मला भगवा समुद्र दिसतो. गुजरातने नेहमीच कमळ फुलवले आहे. गुजरात भाजपच्या सेवेसाठी नेहमी तयार असतो’ अशी भावनिक विधाने करून पंतप्रधान गुजराती अस्मितेच्या आधारावर मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरदार पटेल किंवा मोरारजी देसाई यांच्यासारख्या नेत्यांची काँग्रेसने कशी उपेक्षा केली याविषयी सातत्याने विधाने करून काँग्रेस कसा गुजरातविरोधी पक्ष आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. भाजपदेखील पंतप्रधानाचा उल्लेख ‘गुजरात की शान’ असाच करत आहे.

सुशासनाचा प्रचार

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप ‘गुजरात मॉडेल’च्या यशाविषयीही बोलताना दिसत आहे. ‘गुजरात मॉडेलमुळेच देशातील इतर राज्यांपेक्षा गुजरात राज्य विकसित बनले’ असा दावा केला जात आहे. काँग्रेस राजवटीच्या काळात गुजरातची परिस्थिती कशी दयनीय होती हे पटवून देण्यासाठी भाजपच्या राजवटीत झालेल्या विकास प्रकल्पांची उदाहरणे दिली जात आहेत. ‘भाजपचे सरकार आल्यापासून गुजरातच्या विकासाची घोडदौड सातत्याने सुरू आहे. भाजप सरकारनेच गुजरात विकासाचा नवा मार्ग प्रशस्त केला आहे. भाजपच्या काळात सुशासन अस्तित्वात आहे’ या प्रकारची मांडणी सातत्याने होते आहे. अमित शहा यांनी काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगलींची उदाहरणे अनेक सभांमध्ये दिली. ‘2002 मध्ये मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी दंगलखोरांना असा धडा शिकवला की, त्यानंतर गुजरात मध्ये दंगल झालेली नाही.’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

‘डबल इंजिन सरकार’ची आवश्यकता

गुजरातच्या विकासात डबल इंजिन सरकारचा खूप मोठा वाटा आहे. गुजरातचा विकास अशाच गतिमान पद्धतीने करावयाचा असेल तर परत डबल इंजिन सरकार निवडून देणे गरजेचे आहे हे जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. आणि या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे दिसू लागलेली आहेत.

काँग्रेस आणि ‘आप’च्या प्रतिमेवर हल्ला

गुजरात निवडणुकीत प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसची प्रतिमा मलीन करण्यासाठी त्या पक्षावर विविध आरोप केले जात आहेत. ‘काँग्रेस हा गुजरातच्या विकासात बाधा आणणाऱ्या लोकांचा मित्र आहे.’ गुजरातची जीवनरेखा असलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मेधा पाटकरांसारखे (भाजपच्या मते - गुजरात विकास विरोधी) लोक ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाल्यावर भाजपने हा टोमणा मारलेला आहे. ‘मेधा पाटकर यांच्या विरोधामुळे नर्मदा नदीचे पाणी कच्छ व सौराष्ट्राला मिळण्यास 20 वर्षे विलंब लागला. मेधा पाटकर यांच्यासारख्या लोकांना सहकार्य करण्याचे पाप काँग्रेसने केलेले आहे. काँग्रेस नेहमीच गुजरातकडे तुच्छतेने पाहत आलेला आहे. गुजरातची शान असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हणत त्यांची बदनामी करत आलेला आहे. गुजरात दंगलीत सहभागी डॉन अब्दुल लतीफला गुजरात पोलिसांनी इनकाउंटरमध्ये अनेक वर्षांपूर्वी मारले होते. या लतीफला काँग्रेस गरीबांचा मसीहा मानतो.’ अशा प्रकारची विधाने भाजपकडून केली जात आहेत. काँग्रेस जातियवादी, गुंडशाहीचा समर्थक, घराणेशाहीला महत्त्व देणारा आणि फुटीरवाद्यांचा समर्थक आहे अशा प्रतिमानिर्मितीचा प्रयत्न त्याद्वारे केला जातो आहे.

‘आप’ने गुजरात मॉडेलला उत्तर देण्यासाठी ‘दिल्ली मॉडेल’ पुढे केलेले आहे. शिक्षण, आरोग्य, जुनी पेन्शन योजना हे जनतेच्या जीवनाशी निगडीत मुद्दे मांडून आप प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. ‘आप’ला शह देण्यासाठी भाजपने त्यांची ‘शहरी नक्षलवादी’ अशी प्रतिमा उभी केली आहे. ‘हे शहरी नक्षलवादी गुजरातमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. गुजरातच्या तरुणांची दिशाभूल करत आहेत. अशा फुटीरतावादी लोकांच्या प्रयत्नांना आम्ही कधी यश येऊ देणार नाही. गुजरातची बदनामी करणाऱ्या आणि अपमान करणाऱ्या शक्तींना बाहेरचा रस्ता दाखवा’ असे आव्हान भाजपकडून दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आ गुजरात में बनव्यू छे’ (मी हा गुजरात बनवला आहे) गुजरातला बदनाम करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही अशी भावनात्मक विधाने करून गुजरातचे लोकमत आपल्या दिशेने वळवून घेतले आहे.

पराभूत जागांवर लक्ष  केंद्रित

भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीने दिल्लीला पाठवलेल्या अहवालात विजय मिळवण्यासाठी त्रासदायक असलेल्या 50 मतदारसंघांचा उल्लेख केलेला आहे. गुजरातमध्ये भाजपची सत्ता अनेक वर्षे असूनही भाजपला या मतदारसंघांमध्ये विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे तिथे विजय मिळवण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात आलेली आहे. अशा मतदारसंघांमध्ये भाजपचे मुख्य प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अन्य स्टार प्रचारक यांच्या सभा आणि रोडशो आयोजित केले जात आहेत. मागील पाच दिवसांत झालेल्या 20 सभांपैकी 10 सभा मागील पराभूत मतदारसंघांत झालेल्या आहेत. या मतदारसंघांतील केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थी असलेल्या लोकांशी थेट संपर्क करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. विरोधी पक्ष उमेदवारांना विजयी केल्याने मतदारसंघाचे कसे नुकसान झाले हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पंतप्रधानकेंद्रित निवडणूक

भारतीय जनता पक्ष जवळपास सर्वच निवडणुका पंतप्रधानाच्या नावाने लढवतो आहे. तेच चित्र गुजरातमध्येही कायम आहे. पंतप्रधानाच्या लोकप्रियतेचा फायदा याही निवडणुकीत करून घेतला जातो आहे.

धार्मिक ध्रुवीकरणावर भर

आप आणि काँग्रेसकडून मांडल्या जाणाऱ्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी भाजपने विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणावरदेखील भर दिलेला दिसतो. 182 जागांपैकी एकाही जागेवर मुस्लीम समुदायाच्या व्यक्तीला तिकीट दिलेले नाही. ‘2002 च्या दंगलीत मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी दंगलखोरांना धडा शिकवला’ या अमित शहांच्या विधानात धार्मिक ध्रुवीकरणाची झलक दिसून येते. प्रचारादरम्यान सत्ताधारी नेत्यांकडून ‘संरक्षणासाठी मोदी हवे आहेत’ असा सूर लावला जातो आहे. अल्पसंख्याक समाजाविषयी भय व अविश्वास निर्माण करून, धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून भाजप विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्याचा प्रयत्न करतो आहे.

तिकीट वाटपात सावधानता

गेल्या 27 वर्षांपासून भाजप सत्तेवर असल्यामुळे सत्ताविरोधी वातावरणाचा प्रभाव कमी करण्यासाठी अनेक आमदारांची व मंत्र्यांची तिकिटे कापून नवीन लोकांना उमेदवारी बहाल केलेली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, ब्रजेश मेरजा, आरोग्यमंत्री जय नारायण व्यास, मंत्री आर.सी. मकवाना, राज्यमंत्री अरविंद रयानी, सामाजिक न्यायमंत्री प्रदीप परमार, संसदीय कार्यमंत्री राजेंद्र त्रिवेदी इत्यादी मंत्र्यांची आणि विद्यमान 84 आमदारांची तिकिटे कापून भाकरी फिरविली. अनेक जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देऊन लोकांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

जातीय समीकरणाचा विचार

गुजरातमधील निवडणुकीतील जातीय समीकरणाचा विचार करून छोट्यामोठ्या 18 जातीय समुदायाच्या लोकांना तिकिटे दिलेली आहेत. प्रभावशाली असलेल्या पाटीदार, प्रजापती, क्षत्रिय, कोली, ब्राह्मण, जैन, अहिर, ठाकोर जातसमूहांना अधिक प्रतिनिधित्व देण्यामागे हाच विचार दिसतो. मोरबी दुर्घटनेचा डाग पुसण्यासाठी जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून लोकांचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या क्रांती अमृतिया यांना तिकीट देऊन विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेस आणि आपचे कडवे आव्हान आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृहराज्य आहे. या राज्यात पराभव होणे भाजपला परवडणारे नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत विजय मिळवायचाच या उद्देशाने भाजपची प्रचार यंत्रणा काम करते आहे. या यंत्रणेला यश प्राप्त होण्यासाठी आवश्यक रणनीती भाजपने आखल्याचे दिसून येते.

- डॉ. महेंद्र पाटील
mahendrakakuste@gmail.com
(लेखक, एस.पी.डी.एम.महाविद्यालय, शिरपूर जि. धुळे येथे राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)

Tags:Load More Tags

Comments:

Dr. S. N. Patel

अभ्यासपूर्ण विश्लेषण.... छान लेख

Satish murdeshwar

Even though good points have been mentioned why three CM,s were required to change in short period. Does it not indicate incompetence of incumbant? What about morbi ब्रिज episode where more than 135 people died? Why Sr.BJ.P.leader Mr.व्यास resigned on the eve of election?

Vishwas Shewale

Good article sir...

Add Comment