माझं गाणं, नाटक आणि क्रिकेट!

मधु लिमये यांच्या 'आत्मकथे'तील प्रकरणाचा अंश

मूळचे पुण्याचे असूनही बिहारमधून चार वेळा निवडून आलेले लोकसभेचे खासदार, आणि समाजवादी विचारवंत म्हणून मधु लिमये यांची भारताला ओळख आहे. त्यांच्या आत्मकथनाची पहिली आवृत्ती 1994 मध्ये अक्षर प्रकाशन मुंबई यांच्याकडून आली होती. "आत्मकथा" हेच त्या पुस्तकाचे नाव आहे. मागील काही वर्षे ते पुस्तक आऊट ऑफ प्रिंट होते.त्या पुस्तकाची नवी आवृत्ती लवकरच साधना प्रकाशनाकडून येत आहे. 1 मे 2025 रोजी त्यांच्या 103व्या जयंतीनिमित्त या आगामी पुस्तकातील मधु लिमये बालपणीच्या वर्णनातील एक अंश प्रसिद्ध करीत आहोत.

1933-34 सालात माझा भाऊ मॅट्रिकच्या वर्गात होता. साताऱ्याहून सुट्टीत घरी आला की तो मला गणित शिकवत असे. पण त्याचबरोबर स्वतःच्या मॅट्रिकच्या परीक्षेची तयारीही तो करत असे. आपली पाठ्यपुस्तके तो बरोबर घेऊन येई. त्याचे इंग्रजीचे पुस्तक मी जिज्ञासेने उघडून पाहत असे. त्यातील कविता तो मुखोद्गत करीत असे. त्यामुळे त्यातील काही कवितांशी माझी तोंडओळख झाली होती. त्यातल्या जॉन कीट्स व पी. बी. शेली यांच्या दोन कविता माझ्या चांगल्या लक्षात राहिल्या होत्या. त्या दोन्ही कवितातील काही कडवी मला तोंडपाठ होती. कीट्सच्या कवितेतील पुढील चरण असे होते. 

in a drear-nighted December, 
Too happy, happy tree, 
Thy branches ne'cr remember 
Their green felicity... 
in a drear-nighted December, 
Too happy, happy brook, Thy bubblings ne' er remember Apollo's summer look, 

या कवनात सुखाचा आरोप झाडावर व वाहत्या ओढ्यावर केला आहे व त्यांना कडाक्याच्या थंडीत वसंत ऋतूतील सुखद स्मृतींची आठवण होऊन दुःख होत नाही असे म्हटले आहे. या कल्पनेतील विरोधाभासाची मला गंमत वाटे. कीट्सच्या कवितेचे नाव हॅपी इन्सेन्सिबिलिटी हे होते हे पुढे गोल्डन ट्रेझरी वाचताना मला समजले. कीट्सच्या 'पोएटिकल वर्कस्' या पुस्तकात या कवितेचे "स्टॅन्झाज-इन ड्रिअर नाईटेड डिसेंबर" असे शीर्षक आहे. 'ऑझिमेडियाज ऑफ इजिप्त' ही कवितादेखील नंतर गोल्डन ट्रेझरीत आढळली. 

दुसरी कविता होती शेलीची बादशहा ऑझिडियाजबद्दल. इजिप्तमधील पिरॅमिडची मला थोडीशी माहिती होती. प्राचीन मानवाच्या संस्कृतीचे व अचाट शक्तीचे ते स्मारक आहे हे मला ठाऊक होते पण ते बांधणाऱ्या राजाधिराजाचे वैभव व त्याने निर्माण केलेली वास्तु ही महाकाळापुढे टिकत नाही हे कवीने सूचित केले होते. ही कविता वाचून माझ्या मनात कुतूहल व आश्चर्य निर्माण झाल्यामुळे त्या ओळी माझ्या मनावर ठसल्याः 

I met a traveller from an antique land 
who said: Two vast and tranklen legs of stone stand in the desert... 
And on the pedestal these words appear 
My name is ozy mandias, king of kings: 
Look on my works, ye 
Mighty and despair Nothing beside remains, 
Round the decay of that colossal wreck, boundless and bare,
The lone and level sands stretch far away. 

1934 चा उन्हाळा. माझी चौथीची परीक्षा संपली होती. तिच्यात उत्तीर्ण होऊन मी पाचवीत गेलो. याच वर्षी माझा थोरला भाऊ मॅट्रिकच्या परीक्षेला बसला होता. त्याचा रिझल्ट अजून लागला नव्हता. उन्हाळ्याच्या सुट्टीत एक कायमचे लक्षात राहील असे प्रकरण घडले. माझ्या थोरल्या भावाला नाटकाचे व संगीताचे अतिशय वेड होते. लहानपणापासून नाटक कंपनी काढण्याचे विचार त्याच्या मनात घोळत. जुनी सर्व प्रसिद्ध नाटके बसविण्याच्या योजना त्याने आखून ठेवल्या होत्या. आणि नात्यातल्या व वाड्यातल्या सर्वांना आपल्या मनाने त्याने भूमिकाही वाटून दिल्या होत्या! नाटकाची व संगीताची थोडीही गोडी असलेल्या कोणत्याही तरुण मित्रांना व नातेवाईकाला आपल्या नाट्ययोजनेतून त्याने वगळले नव्हते. शुक्रवार वाड्यातल्या त्याच्या व माझ्या वयाच्या सर्वांना त्याने भूमिका नेमून दिल्या होत्या; पण या सर्व पुढच्या योजना. एका सुट्टीत अरेबियन नाइट्समधील एका कथेवर आधारलेले 'आंब्याकरिता जीव' या नावाचे एक छोटेसे नाटक त्याने झपाट्याने लिहून काढले व त्यातील भूमिका वाड्यातीलच गणपती, गिरीश, भाऊ फाटक, विनायक फाटक, मी आणि स्वतः तो इत्यादींना त्याने वाटून दिल्या. तालीम त्याने स्वतःच घ्यायला सुरूवात केली. त्यापैकी गिरीशला व आणखी कुणाला तरी त्याने स्त्रीभूमिका देऊ केली होती. नाटक बसू लागले. पात्रांची आपापल्या भूमिकांची भाषणे पाठ होऊ लागली. शेवटी प्रयोग करण्यापूर्वी रंगीत तालीम घ्यायचे ठरले. नाटकाच्या तालमी फाटकांच्या वरच्या दिवाणखान्यात होत. रंगीत तालीमही तेथे घ्यायचे ठरले. फाटकांच्या अण्णांना याची काहीच कल्पना नव्हती. त्यांना नाटक-संगीत इत्यादींचे वावडेच होते. त्यांचा स्वभावही अत्यंत तापट किंबहुना आक्रस्ताळी होता. ज्या दिवशी रंगीत तालीम होती त्या दिवशी ते आपले काम संपवून नेहमीपेक्षा लवकरच घरी परत आले. माडीवर आमच्या नाटकाच्या रंगीत तालमीचा दंगा चालू होता. अण्णा वर आले. मुलांचे कौतुक करण्याऐवजी त्यांनी डोक्यात राख घातली. भाऊ-विनायक या आपल्या मुलांना पाहताच त्यांनी जमदग्नीचा अवतार धारण केला. "नाटक करताय काय लेको ? अभ्यास करायचा सोडून हे दळभद्रे उद्योग सुरू केलेत काय?" वगैरेवगैरे. पण त्यांचे भाषण पुरे ऐकायला आम्ही तिथे थोडेच टिकणार होतो? आम्ही तेथून तात्काळ पोबारा केला. आमचा मुलगा अनिरुद्ध पुढे ज्याला 'धुमपलासी' राग म्हणत असे तो आळवायला आम्ही तात्काळ सुरूवात केली! आम्ही पलायन केल्यानंतर अण्णांनी भाऊची म्हणजे थोरल्या मुलाची केवळ खरडपट्टीच काढली असे नाही तर त्या बिचाऱ्याला बेदम मारही दिला. अशा रीतीने 'मनोहर आणि कंपनीची' व तिच्या पहिल्या नाटकाची इतिश्री झाली! अर्थात, पहिले प्रात्यक्षिक फसले, तरी माझ्या भावाचा कल्पनाविलास थांबला नाही. किंबहुना पुढे तर तो मनस्वी वाढला. 

याच काळातली भारत गायन समाजाची व शंकरभैया यांची एक आठवण आहे. 351 शुक्रवारच्या वाड्यातील एक मुलगा विनायक फाटक भारत गायन समाजात गाणे शिकायला जात असे. विनायकबरोबर तेथील कार्यक्रमांना मी कधीकधी जात असे. गांधर्व महाविद्यालय हे जसे विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याशी निगडित झालेले आहे, तद्वतच भारत गायन समाजाचे नाव भास्करराव बखल्यांशी जोडले गेलेले आहे. शंकरभैया पखवाज व तबला वाजवत. एकदा मास्तर कृष्णाची त्यांनी सुंदर साथ केल्याचे आठवते; पण त्या काळात संगीताच्या क्षेत्रात विलक्षण कंपूशाही होती आणि साथीबद्दलच्या विचित्र कल्पना होत्या. आपल्या कंपूबाहेरच्या गवयाबरोबर साथ करताना तबलजी मुद्दाम अडेलतट्टूपणा करीत आणि गवयांना त्रास देत. मला ही कंपूशाही मुळीच आवडत नसे. साथीबद्दलची माझी कल्पना निराळी होती. मला वाटे की साथीदारांनी साथ करावी, उगाच स्पर्धा करू नये अथवा अडवणूक करू नये. अलीकडच्या काही वर्षांत वातावरण खूपच निवळले असून साथीदार अधिक जबाबदारीने आणि सहकार्याच्या वृत्तीने वागू लागले आहेत. त्यामुळे बैठकींची रंगत निश्चितच वाढते असे मला वाटते. 

1934 मध्ये मी एकाएकी क्रिकेटच्या खेळाकडे आकृष्ट झालो. या वर्षी लाला अमरनाथ या नव्या खेळाडूने भारताच्या टेस्ट क्रिकेटमध्ये आपली चमक प्रथमच दाखविली होती. जार्डिनच्या नेतृत्वाखाली एम.सी.सी. ची टीम हिंदुस्थानात आली होती. या दौऱ्यात झालेल्या एका सामन्यात अमरनाथने इंग्लंडविरुद्ध धावांचे एक देदीप्यमान शतक झळकविले होते. देशभर लाला अमरनाथचे कोण कौतुक झाले! लगेच पावसाळ्यात उगविणाऱ्या छत्र्यांप्रमाणे गल्लोगल्ली, वाड्यावाड्यांतून, 'क्रिकेटपटू अमरनाथ' पैदा होऊ लागले. मिळतील त्या फळ्यांच्या बॅटी, कापडाचे चेंडू आणि काठ्यांचे स्टंप्स तयार झाले. त्या काळात अष्टौप्रहर आमच्या चर्चेचा विषय म्हणजे क्रिकेट व क्रिकेटचे प्रख्यात खेळाडू ज्याच्या त्याच्या तोंडी ब्रँडमन, हॅमंड, सटक्लिफ, लारवूड ही नावे असत. क्रिकेटबद्दलची ज्याला थोडी अधिक माहिती असे तो मुलगा भाव खाऊन जाई. मुलांत त्याची 'चाहा' असे. त्याच्याभोवती पोरांचा नित्य घोळका असे. हळूहळू आम्ही वर्तमानपत्रे चाळू लागलो. ब्रिटिश वृत्तपत्रांचे जुने जाडेजुडे अंक रद्दी म्हणून भारतात येत. वाण्याच्या दुकानात त्यांचा उपयोग होई. सामान आणताना या रद्दीतील इंग्लिश खेळाडूंची छापील चित्रे आमच्या हाती येत. ती आम्ही व्यवस्थित कापून जपून ठेवत असू, एकमेकांना दाखवत असू. 


हेही वाचा - तेजस्वी समाजवाद्याची स्फूर्तिदायी आत्मकथा (लेखक भाई वैद्य) 


चौथीच्या वर्गातही 1933 च्या शेवटच्या दोन महिन्यांत माझी दादा नावाच्या मुलाशी गट्टी जमली. ती पाचवीच्या वर्गाही कायम होती. तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता. तसे पाहिले तर वर्गातील बहुतेक मुले माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी मोठीच होती. मी मारलेल्या 'उडीमुळे' कॉलेजातही माझ्यात व सहाध्यायी मुलांत हे दोन वर्षांचे अंतर तसेच कायम राहिले. अर्थात फर्ग्युसन कॉलेजात माझ्या वयाची चार-पाच मुले आर्ट्स व सायन्सला होती. त्यात बगाराम (श्रीनिवास) तुळपुळे व किसन तुळपुळे हे विज्ञान विभागात व बाजीराव गोखले हे कला विभागात होते. पुढे बगाराम आणि किसन राजकारणात आणि ट्रेड युनियन चळवळीत आले. 

दादा इतर मुलांपेक्षाही दोन-एक वर्षांनी मोठा होता. चौथीच्या वर्गात मी आजारी असे. सारखा खोकत असे. त्यामुळे तो मला 'म्हातारा' म्हणून चिडवत असे. मुलांमध्ये कसली सहानुभूती नि कसले काय? पण पाचवीत त्याच्याशी हळूहळू मैत्री जमली. दादा खऱ्या अर्थाने 'दादा' होता. चांगला तालीमबाज होता. तो रामदास आखाड्यात जात असे. तो म्हणे, "चल माझ्याबरोबर." मी जाऊ लागलो. तो मला दंड बैठकादी व्यायाम शिकवू लागला. आम्ही फॅटबॉलही खेळू लागलो. सरस्वती मंदिराचे विद्यार्थीही खेळासाठी रामदास आखाड्याची जागा वापरत असत. सरस्वती मंदिराचे स्वतंत्र असे क्रीडांगण त्या काळात नव्हते. दादाच्या सहवासात बौद्धिक चर्चा, काव्यशास्त्र, विनोद काही होत नसे. व्यायाम, दंड बैठका, धावणे, मैलच्या मैल चालणे हेच गप्पांचे विषय असत. त्याच्याच पुढाकारामुळे आमच्या वर्गाची सहल सिंहगडला प्रथम गेली. मी गड चढताना थकलो, माझी दमछाक होऊ लागली. दादा म्हणाला, "तुला उचलून घेतो!" मला फार लाज वाटली. मी म्हणालो, "नाही. मी हळूहळू चढतो. तू हो पुढे." तो झपाझप चढून गेला; पण मी व इतर मुले थोडी रेंगाळलो. म्हणून तो परत खाली आला. मग त्याच्याबरोबर आम्ही शेवटपर्यंत न थांबता गेलो. त्यानंतर मी आणखी दोन वेळा तरी सिंहगडला गेलो असेन; पण दादाने दिलेल्या संथेमुळे पुढच्या सिंहगडच्या सहलीत गड चढण्याचा फार त्रास झाला नाही. दादाची माझी पाचवीनंतर परत कधी गाठ पडली नाही; पण त्याच्या मैत्रीपासून मला एक लाभ झाला. त्याने उत्पन्न केलेल्या व्यायामाच्या आवडीमुळे माझी प्रकृती अगदी ठणठणीत झाली. पुढे 1945-46 मध्ये दमा सुरू होईपर्यंत मी फारसा आजारी पडल्याचे मला आठवत नाही.

- मधु लिमये
(लेखक समाजवादी विचारवंत लेखक आणि संसदपटू होते)

Tags: समाजवाद समाजवादी विचारवंत आत्मचरित्र आत्मकथा आत्मकथन संसदपटू साधना डिजिटल madhu limaye socialism socialist party MP Load More Tags

Add Comment

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/ https://ojsstikesbanyuwangi.com/ https://ejournal-uniqbu.ac.id/ https://revistas.uca.es/index.php/hachetetepe https://revistas.uepg.br/index.php/olhardeprofessor